आनंदी राहायचे असेल तर या काही गोष्टी करून पाहूया..
टीम आपलं मानसशास्त्र
आयुष्य साधं असावं, सोपं असावं आणि ते अधिकाधिक समाधानी असावं, यासाठी प्रयत्न करायला हवेत. आणि त्यातच आनंद सापडतो. सगळ्यांशी प्रेमाने वागणे आणि एकमेकांना प्रेम देणे, प्रेमळ माणसे शोधणे हाच आपला छंद असायला हवा. त्यातून मग कोणताही मानसिक त्रास होत नाही.
आत्ताचा काळ अनेक प्रकारच्या संकटांचा आहे. अशी संकटे मानवजातीवर यापूर्वी अनेकदा आली आहेत. त्या त्या काळात मोठी हानी झालेली असली, तरीही माणसानेही कधी हार मानलेली नाही. त्यांनी युक्ती करून, प्रयोग करून, काहीतरी मार्ग शोधून टिकून राहण्याचा प्रयत्न केला आहे.
आत्ताच्या संकटातही तेच होणार आहे. पण हे घडण्यासाठी आपण आनंदी राहायला हवे, हि मुख्य अट आहे. आनंदी राहायचे असेल तर काही गोष्टींचे पथ्य पाळावे लागते. त्याशिवाय आनंदाचा अनुभव मिळत नाही. त्यासाठी खालील काही गोष्टी करून पाहता येतील.
♦ लोक काय म्हणतील याचा विचार करू नये, लोकांना त्रास न देता जगलो तर लोकांच्या प्रतिक्रियांची काळजी करायची गरज नाही.
♦ खोटं बोलायचं नाही, खोटं वागायचं नाही. म्हणजे त्या वागण्याचा आपल्याला आणि समोरच्यालाही त्रास होत नाही. आपण जसे आहोत तसेच राहणार आहोत. हे स्वीकारायचं आणि खुश राहायचं.
♦ आपलं नाव, आडनाव, पद, कंपनी, पगार याचा अहंकार करू नये. आपणच श्रेष्ठ बाकीचे कनिष्ठ असा भाव तर मुळीच असू नये. आपले पाय जमिनीवर असावेत आणि लोकांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करावा.
♦ आपल्यातही काही दोष असू शकतात, हे मान्य करायला हवे. आपण सर्वगुण संपन्न नाही, हे मान्य करणे आणि समोरच्या व्यक्तीमध्येही असलेले गुण-दोष स्वीकारणे, हे चांगल्या स्वभावाचे लक्षण असते. ते लक्षण आपल्यातही असायला हवे. त्याच अनुषंगाने आपल्यातील दोष शोधावेत, ते सुधारावेत.
♦ आता कोणत्याही गोष्टीचा हव्यास धरण्यात अर्थ नाही. आपली गरज किती आणि आपली क्षमता किती याचा विचार करून मर्यादित गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टातून समाधान मिळवण्याचा विचार करावा. भौतिक सुखाचा हट्ट नको, त्यासाठी मनाविरुद्ध तडजोडी नकोत. जे मिळेल त्यात सुखी राहावे. आणि त्यातच आनंद शोधला पाहिजे.
♦ जो जन्माला आला आहे, त्याचा मृत्यू अटळ आहे. आपणही त्यापैकीच एक आहोत. ही जाणीव सतत मनात ठेवायला हवी. मग जी गोष्ट अटळ आहे, त्यावर फार विचार करूनही काही होणार नाही. म्हणूनच रोजचे आयुष्य सुखाने जगाचे, स्वतः मजेत राहावे. लोकांना मजेत राहू द्यावे.
संदर्भ – संध्यानंद.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

