Skip to content

आपली दुःखे ही कायम इतरांपेक्षा कमी समजावीत.

आपली दुःखे ही कायम इतरांपेक्षा कमी समजावीत.


मिनल वरपे


आपण प्रत्येक बाबतीत इतरांसोबत तुलना करत असतो. आपले नातेवाईक, मित्र मैत्रिणी, शेजारी असो नाहीतर कामातील सहकारी… माझ्या मैत्रिणीने जसा ड्रेस घेतला तसाच मलासुद्धा पाहिजे आहे, शेजाऱ्यांच्या घरात एखादी नविन वस्तू आली मग ती मोठ्यात मोठी असो नाहीतर अगदी झाडू सुद्धा असेल तरी आपल्याला सुद्धा ते घ्यायचं च असते.

एखाद्या नातेवाईकांचा मुलगा चांगला शिकत असेल तर आमच्या मुलाची जरी तेवढी क्षमता नसेल तरी त्याला सुद्धा तेच शिक्षण आम्ही देणार, ऑफिस मधील सहकाऱ्याने एखादा मोबाईल घेतला तर मलासुद्धा तसाच लेटेस्ट मोबाईल पाहिजे असे एक ना अनेक बहुतेक बाबतीत आपण इतरांशी तुलना करून तेच करायचा प्रयत्न करतो.

इतरांच्या सुख सोयी बघून अगदी सहज जस आपल्याला त्यांच्या सुखाची तुलना आपल्याशी करता येते म्हणजेच एखादा वरून आनंदी दिसला, त्याच्याकडे चार शोभेच्या वस्तू दिसल्या की तो सुखी आणि मी बघ… माझ्याकडे तर काहीच नाही..माझी परिस्थिती किती बिकट आहे.. पण तरी मलासुद्धा त्या सर्व सुखसोयी पाहिजेच आहेत ज्या मला दिसतात आणि त्यासाठी धडपड करण्याची
सुरवात आपण करतो….

जर सुखाची तुलना करायला आपल्याला एक क्षण सुद्धा पुरेसा ठरतो तर दुःखाची तुलना करताना आपण का मागे पडतो????

मी दुःखी आणि माझं दुःख ते सर्वात मोठं दुःख… आणि अशावेळी जर कोणी बोललं की अरे तू आजूबाजुला बघ तुझ्यापेक्षा जास्त दुःख इतरांना आहे तर अशावेळी आपण आपल्या दुःखात इतकं गुरफटून जातो की आपल्याला आजूबाजुला बघण्याची इच्छा शिल्लक नसते.

फक्त आपण दुःखात असू त्या क्षणाला इतरांचे दुःख बघून स्वतःच दुःख विसराव असे नाही तर जगताना अस जगायचं की आजूबाजुला घडणाऱ्या सर्व चांगल्या वाईट घटनांतून आपण काहीतरी शिकवण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सुखाच्या मागे धावून आपल्या हातात कधीच समाधान मिळणार नाही. इतरांच आनंद आणि सुख याची तुलना आपण आपल्या आयुष्यासोबत केली तर जगण्याचा आनंद आपल्याला कधीच मिळणार नाही कारण सुखाच्या शोधात अपेक्षांचं ओझं वाढत जाते आणि मिळते ती निराशा.

पण तेच जर आपल्याला हे मिळालं आहे त्यात आनंदी राहिलो आणि इतरांच्या दुःखाची तुलना आपल्या दु:खासोबत केली तर त्या क्षणाला आपल्याला धैर्य मिळते कारण जर समोरचा दुःख सहन करून जगतोय तर मी का दुःखात अडकून रडत बसायचं अशी जगण्याची प्रेरणा आपल्याला मिळते.

म्हणतात ना.. जर एखादा मोठ्या गाडीत बसलेला असेल तर त्याने दुचाकी गाडीवर बसलेल्या व्यक्तीकडे पाहावं, दुचाकी गाडीवर जाणाऱ्या व्यक्तीने सायकल वर फिरणाऱ्या व्यक्तीकडे पाहावं, सायकल ने फिरणाऱ्या व्यक्तीने पायी चालणाऱ्या व्यक्तीकडे पाहावं आणि पायी चालणाऱ्या व्यक्तीने पाय नसलेल्या व्यक्तीकडे पाहावं…

कारण आपल्याकडे जे आहे त्यामधे आपण कधीच समाधानी नसतो.आणि आपल्याकडे जे आहे त्यामधे आपण कधीच सुख मानत नाहीत जेव्हा आपण आपल्यापेक्षा जास्त दुःख असणाऱ्या व्यक्तीकडे पाहतो तेव्हा आपलं दुःख कमी वाटेल.

आपल्या आजूबाजूला असे बरेच व्यक्ती आहेत जे त्यांचं दुःख हसत हसत स्विकारतात..दुःखाला सामोरे जाताना जे कधीच रडत नाही, कमजोर पडत नाहीत तर तो वेळ त्या दुःखाला दूर करण्याच्या प्रयत्नांना देतात.

जर तुलना करायची असेल तर इतरांना होणाऱ्या त्रासाची, दुःखाची करा कारण तेव्हाच आपल्याला आपल दुःख क्षुल्लक वाटेल.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!