कोणाशी किती शेअरिंग करावी, यालाही मर्यादा हव्याच !!
टीम आपलं मानसशास्त्र
आरती आणि दिपेश हे एकमेकांचे खूप चांगले शालेय मित्र होते. तब्बल १५ वर्षानंतर दोघांचीही सोशल मीडियावर नव्याने भेट झाली. दोघेही एकमेकांशी बोलायला फार उत्सुक. आरती हि पुण्यात तिच्या पतींसोबत राहते तर दिपेश त्याच्या बायकोसोबत नाशिकला असतो. बोलता-बोलता दोघांनाही वेळेचं आणि भुकेचं भान राहत नव्हतं.
इतके दिवस कोठे होतास, तू अचानक कसे काय लग्न केलेस करणार नव्हतीस ना, कुठे जॉब करतोस आता, तुझे पती काय जॉब करतात, तुझी बायको स्वभावाने कशी आहे वगैरे प्रश्नांची अदलाबदली झाली. कारण काळाने निस्टवलेली मैत्री आज पुन्हा एकत्र आली होती. म्हणून हे सर्व प्रश्न निघने तर स्वाभाविकच होते.
कारण एकमेकांना पुन्हा जाणायचे होते, नव्याने पुन्हा ओळखायचे होते. ती वर्षा असते का ग तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये, तो अभिजित सध्या काय करतोय रे अशा प्रश्नांनी अक्खी मित्रांची टोळी डोळ्यासमोर धूम माजवत होती.
एकमेकांचे पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर, घराचे ऍड्रेस ट्रान्सफर झाले. दोघांनीही आपल्या मैत्रीबद्दल आप-आपल्या जोडीदाराला सांगितले. चांगली ओळख करून दिली. व्हिडिओ कॉल झाले. आणि नाशिक वरून पुण्याच्या घरी जायचा दिवस ठरला. छान पैकी भेट झाली. वन नाईट स्टेयिंग मध्ये मस्त पार्टी झाली.
दुसऱ्या दिवशी आरती आणि तिच्या पतीचा निरोप घेऊन दीपेश आणि बायको नाशिकला रवाना झाले. मैत्री आणखीन घट्ट होत होती. पण या मैत्रीला कोणत्याही प्रकारचा डाग लागू द्यायचा नाही, याबद्दल दोघेही मनोमनी सामंजस्य होते. म्हणूनच कि काय आपल्या मैत्रीबद्दल ती दोघेही जोडीदाराशी ट्रान्सपरंट राहत होते.
इथपर्यंत सर्व काही ठीक सुरु होते. आता मैत्री आली कि व्यक्तिगत रुसवे-फुगवे, चर्चा आणि महत्वाचं म्हणजे शेअरिंग आलीच कि. आणि जिथे शेअरिंग आली तिकडे ‘हे कोणाला सांगू नकोस, हे माझं खूप पर्सनल आहे, मी फक्त तुलाच सांगत आहे’ अशा अनएक्सपेक्टेड गोष्टी सुद्धा सांगितल्या जातात. कारण घट्ट मैत्रीचा विश्वास असतो तो.
मुळात लग्न झालेल्यांनी आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त शेअरिंग अजिबात कोणाशी करू नये, हे जरी योग्य नसलं तरी अशी कृती करताना स्वतःच्या भावनांचा नीट काळजीपूर्वक विचार करायला हवा. जेणेकरून पुढच्या परिणामांचा अंदाज येऊ शकेल.
कारण अपेक्षेनुसार इथे आपला प्रॉब्लेम तर कमी होत नसून तर समोरच्याचाही प्रॉब्लेम आपण वाढवून ठेवतो. पुष्कळ वेळेस जोडीदाराव्यतिरिक्तही इतरांच्या सहवासाची गरज आपल्याला भासते. मग ते मित्र असतील, नातेवाईक, सहकारी कोणीही असू शकतात. या सगळ्यांसोबत कोणत्या गोष्टींची शेअरिंग करायला हवी आणि ती सुद्धा किती करायला हवी याचे भान ठेवल्यास निदान पुढचे प्रॉब्लेम तरी निर्माण होणार नाही.
आरतीच्या मनात कित्येक दिवसापासून अनेक भावना दडलेल्या होत्या. ऐकून घेणारं जवळपास कोणीही नसल्याने दिपेश तिला एक हक्काचा मित्र भेटला होता. म्हणून ती त्याला हक्काने सर्व काही सांगत असे. पण त्या सांगण्यामागे तिची अशी कोणतीही अपेक्षा नव्हती कि दिपेशने तिला प्रत्यक्ष मदत करावी.
परंतु आपली मैत्रीण एका समस्येत आहे, म्हणून आपली तिला मदतीची गरज आहे हे दिपेशला काय कोणालाही वाटणे स्वाभाविकच आहे. म्हणजेच एकदा ही लिंक सुरु झाली कि आपण आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी भरभरून द्यायला मागे-पुढे पाहत नाही.
आता हि एक बाजू झाली, पण याची दुसरीही बाजू लक्षात घेऊया. आरतीकडे तिचा स्वतःचा नवरा आहे, मग दिपेशने पुढे-पुढे का करावं, असं दिपेशच्या बायकोला वाटणं हि सुद्धा एक स्वाभाविक गोष्ट आहे. मग ती मनात तग धरून असेल किंवा व्यक्त होत असेल. ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वानुसार.
पण यामध्ये दिपेश आणि त्याच्या बायकोचे एकमेकांशी असणारे संबंध बिघडण्याची शक्यता वाढते. तसेच आरती दिपेशकडे व्यक्तिगत गोष्टी शेअरिंग करायला लागली आहे, ते हि अनेक दिवसापासून, हे जेव्हा आरतीच्या नवऱ्याला समजेल तेव्हा त्या दोघांमध्येही संबंध बिघडतीलच.
इथे असा प्रसंग डोळ्यासमोर उभा करा कि जोडीदाराला त्रास होईल अशी कोणतीही वागणूक ठेवण्याचा नाही दिपेशचा हेतू होता, नाही आरतीचा. नाही दोघे एकमेकांशी अतिशय पर्सनल चाट करत होते. केवळ आरतीला एक मित्र म्हणून दिपेशकडे व्यक्त व्हायचे होते आणि दिपेशला सुद्धा एक मैत्रीचं कर्तव्य म्हणून मदत करायची होती.
मग चुकलं कुठे ? चुकलं इथेच कि दोघांनीही काही प्रोटोकॉल किंवा नियम पाळले नाहीत. मैत्रिणीला किंवा मित्राला केलेली काही वेळेसाठी किंवा केव्हातरी केलेली मदत हे सामान्य आहे. परंतु सतत केलेली शेअरिंग आणि सतत केलेली मदत हे कोणत्याही जोडीदाराला रुचणारही नाही आणि पचणारही नाही.
कारण आपण जोडीदारापेक्षा समोरच्या व्यक्तीला जास्त महत्व देतोय किंवा समोरच्यात वाहवत जातोय हि असुरक्षितता तुमच्या घरातली शांतता बिघडवून ठेवते.
म्हणून मित्र मंडळी असो किंवा कोणीही असो त्यांच्या सततच्या पुकारणेला किती आंजारायचं-गोंजारायचं याचे भान ठेवायला हवं.