एक प्रसंग घडतो…आणि सगळं संपल्यासारखं का वाटतं ?
टीम आपलं मानसशास्त्र
आपल्या आयुष्यात कधी कोणता प्रसंग घडेल हे सांगता येत नाही आणि घडणारे प्रत्येक प्रसंग हे एकसारखेही नसतात. तसेच पुष्कळ वेळेस त्या प्रसंगात आपण प्रत्यक्ष इन्व्हॉल सुद्धा नसतो, परंतु आपल्याही अंगलट तो प्रसंग आलेला असतो.
अशा सर्व कमी-जास्त तीव्रतेची प्रसंगे ज्यावेळी घडतात, त्यावेळी मन, भावना, विचार आणि कृती अशा सर्व ठिकाणी शून्यता दाटून येते. मग त्या प्रसंगात आपण जबाबदार होतो का?, आपली काही चूक होती का? याबद्दल सारासार विचार आपण करू शकत नाही. किंबहुना आपल्याला करताच येत नाही.
कारण आपण त्या प्रसंगाच्या खूप खोलवर गेलेलो असतो. मन अस्वस्थ होते, शरीर पूर्ण ढिले पडते, काहीच करायची इच्छा होत नाही, झोप लागेल कि नाही याबद्दल शंका असते, भूक नसतानाही आपण जेवत असतो, पोट भरले आहे कि नाही याबद्दल काहीच जाणीव उरत नाही.
चला काही केसेस पाहूया…
♦ संगीता प्राथमिक शाळेत मराठी हा विषय शिकवते. मुलांचे स्पोर्ट्स आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेणे याबद्दल संगीताला प्रचंड आवड आहे. आपल्या हातून एकतरी विद्यार्थी असा घडावा ज्याची दखल राष्ट्रीय पातळीवर व्हावी असे तिला नेहमी वाटे. तशी मेहनत सुद्धा ती मुलांकडून करून घेत असे. याच अनुषंगाने तिची एक विद्यार्थिनी राष्ट्रीय पातळीवर खेळताना पराजित झाली आणि तो प्रसंग संगीताच्या जिव्हारी लागला.
दोन दिवस सोडून शाळेच्या कमिटीची बैठक बोलविण्यात आली. हि बातमी कळताच संगीता शून्य अवस्थेत गेली. भिती, अस्वस्थता, थकवा, चिंता, अतिविचार या सगळ्यांनी एकदमच प्रवेश केला.
दोन दिवस तिचे असेच गेले. त्यानंतर शाळेच्या कमिटीची बैठक संपन्न झाली. त्यात विद्यार्थिनीचे कौतुक तर झालेच पण संगीताचे विशेष कौतुक झाले. राष्ट्रीय पातळीवर शाळेचे नाव उंचावल्याबद्दल शाळेकडून संगीताला मानचिन्ह आणि वीस हजार रोख बक्षीस मिळाले.
♦ राहुल त्याच्या कौटुंबिक कलहात पूर्णतः अडकलेला आहे. कामावरून त्याला घरी जायची सुद्धा अजिबात इच्छा होत नाही. सतत बायकोकडून मिळणारे टोमणे याला तो पार वैतागला आहे. याच प्रसंगात त्याने एकदा बायकोवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. पण क्षणार्धात परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने हात लगेचच मागे घेतला.
राहुलच्या माहेरचे शिस्तीने अत्यंत कडक. त्यामुळे त्यांच्यापर्यंत जर हि बातमी गेली तर माझे काय होईल, मुळात मी त्यांच्यासमोर घडलेला विषय मांडू शकेल का, जर मांडताच आला नाही तर मी स्वतःला माफ करू शकेल का.. अशा अतिविचारांमध्ये राहुल पूर्णतः भरकटला.
बायकोने अत्यंत चलाखीने आपली बाजू सावरून माहेरी फोन केला. पण राहुल साठी तो फोन समाधान देणारा होता. माहेरकडून प्रतिक्रिया आली कि, ‘तुमच्या दोघांच्या वादासाठी इथे अजिबात फोन करू नका, तुम्ही दोघांनी एकमेकांना सांभाळावं यासाठी तुमच्या लग्नाची गाठ आम्ही बांधून दिलीये. म्हणून कृपया या कारणासाठी फोन करू नका’
हे ऐकताच क्षणी राहुलच्या मनावरचं पुष्कळ ओझं तात्काळ गळून पडलं.
वरील या दोन्ही प्रसंगांचा जर बारकाईने अभ्यास केला तर असे निदर्शनास येईल कि संगीता असो कि राहुल असो दोघीही प्रसंगाच्या खूप खोलवर विचार करू लागले आणि त्यामुळे वास्तवात घडणाऱ्या शक्यता त्यांच्यासाठी अनभिज्ञ झाल्या.
राहुल आणि संगीता हि केवळ उदाहरणं आहेत, आजचा लेख आणखीन चांगल्या पद्धतीने स्पष्ट करण्यासाठी. आपण सगळ्यांनी सुद्धा नक्की याचाही विचार करावा कि नेमकं पाणी जिरतंय कुठं ?
आपणच अतिविचार करून स्वतःवर ‘भावनिक शून्यता’ हि स्थिती ओढवून तर घेत नाहीयोत ना ? म्हणजे कल्पनेतलं विश्व आणि प्रत्यक्ष येणारा प्रसंग यांमद्ये खूप तफावत तर नाहीये ना ?
प्रश्न इथे इतकाच आहे कि, जे काही आपल्या पुढ्यात येणार आहे, त्याबद्दल नकारार्थीच विचार करून आपण आपली कार्यक्षमता का विचलित करून घेतोय …. ?
कदाचित या लेखाने तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवून दिली असतील!



Same here…I am feeling now…its the impact of overthinking…thank u for this..article