Skip to content

घरामध्ये टेन्शन निर्माण झाल्यास अशावेळी काय करावे ?

घरामध्ये टेन्शन निर्माण झाल्यास अशावेळी काय करावे ?


टीम आपलं मानसशास्त्र


एखादे कुटुंब म्हटलं कि ज्याप्रकारे आनंद, सुख, समाधान किंवा सकारात्मक बाबी आल्या तर त्याचप्रमाणे नकारात्मक बाबी सुद्धा आल्याचं कि. अन त्याही मोठ्याप्रमाणातच कायम अनुभवलेल्या असतात. प्रत्येकाचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि विचार करण्याची पद्धत हि वेगवेगळी असल्याने काही वेळेस मन जपलीही जातात आणि तोडलीही जातात.

कुटुंबावर जेव्हा एखादा निर्णय घेण्याचा प्रसंग ओढवतो तेव्हा हेच निरनिराळे डोकी एकत्र येऊन संघर्ष निर्माण करतात. संघर्ष त्याच ठिकाणी निर्माण होतो जेव्हा एकमेकांच्या मतांतरामध्ये खूपसे अंतर असते.

माझेच बोलणे खरे आहे, असे ठासून बोलण्याची वृत्ती, समोरच्याच्या मतांना अत्यंत नगण्य महत्व देणे, किंबहुना अजिबात न देणे हि प्रमुख कारणे घरातील टेन्शन आणखीन खराब आणि दूषित करण्याला कारणीभूत असतात.

म्हणजेच ओढवणारा प्रसंग हा तर बाजूलाच राहतो, आणि एकमेकांची डोकी एकमेकांना शाब्दिक टक्कर देत असतात. असे घर वर्षानुवर्षे प्रगती करताना आढळून येत नाही. ते त्याच ठिकाणी थांबते. अशा घरातील लोकांनाच अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधी जडतात.

त्यामुळे घरात अजिबातच टेन्शन उद्भवणार नाही हे काही वास्तव नाही. टेन्शन उत्पन्न करणारी असंख्य घडामोडी एका पेक्षा जास्त व्यक्ती असणाऱ्या घडतच राहणार. परंतु त्याठिकाणी एकमेकांची मते समजून घेऊन, एकमेकांना हवी तशी स्पेस देऊन, एकमेकांचा सन्मान आणि आदराने वागणूक देऊन येणाऱ्या कोणत्याही तीव्रतेच्या प्रसंगांमध्ये निर्णय घेण्यास अनुकूल वातावरण उत्पन्न होण्याची शक्यता ही वाढते.

तसेच एकमेकांची मते स्वीकारल्यामुळे ‘मला सुद्धा या घरी सामावून घेतले जाते किंवा माझ्या मतांना विचारात घेतले जाते’ हि भावना घरातील प्रत्येक सदस्यांपर्यंत एकदा कायमची पोहोचली कि कोणत्याही टेन्शनमध्ये एखादे घर फार काळ अडकत नाही.

अशा घरातल्या माणसांची निर्णय घेण्याची क्षमता हि सर्वसामान्यांपेक्षा उत्तम असते. कारण या ठिकाणी प्रत्येकाला प्रत्येकाचा स्पेस मिळालेला असतो. तसेच हवे तसे कुटुंब योग्य मानसिक समाधान देणाऱ्या दिशेकडे नेण्यासाठी योग्य ते स्वातंत्र्य मिळालेले असते.

तरीही टेन्शन निर्माण करणाऱ्या घटना घडल्यास अशा वेळी काय करता येईल ??

⇒ कितीही टाळले तरी रोजच्या दिवसात काहीना काही कारणांमुळे आपल्या सगळ्यांच्या घरात टेन्शन असतं. तणाव तयार झाला आणि तो वाढत गेल्यास गोष्टी अजून गुंतागुंतीच्या होत जातात. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते. ते जर टाळायचे असेल तर वेळीच अलर्ट होणे आवश्यक असते.

⇒ तणावाच्या प्रसंगी आपल्या भावनेच्या भरात बोलणे किंवा कोणतीही कृती करणे टाळा. शक्य झाल्यास वेगळ्या रूममध्ये जा. थोडा वेळ जाऊ द्या. मनात येणाऱ्या भावना काढा. सुरुवातीला कठीण वाटेल, मात्र मनातले विचार कागदावर उतरले कि त्यातील गुंता कमी होतो. आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टीचा राग आला आहे किंवा ताण आला आहे ते समजते.

⇒ अस्वस्थ वाटत असल्यास आंघोळ करणे. हा उपाय थोडा वेगळा असला तरी बहुतेकांना त्याचा फायदा होतो, हे निश्चित !

⇒ नामस्मरण करणे. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. मात्र असे केल्याने आपले मन वेगळीकडे वळण्यास मदत होते.

⇒ मित्र-मैत्रिणींशी चर्चा करणे. घडलेल्या प्रसंगाबद्दल योग्य आणि समर्पक मित्र-मैत्रिणींशी चर्चा केल्यास तात्पुरते का होईना भावनांचा निचरा होतो आणि आपल्याला काही काळापुरते रिलॅक्स वाटते.

⇒ शक्य असल्यास चालण्यासाठी बाहेर पडणे. चालणे हा व्यायामप्रकार ही उपयुक्त आहे. शिवाय ताण वाढलेल्या जागेपासून दूर राहिल्यानेही फायदा होतो. उत्पन्न झालेला ताण क्षुल्लक वाटायला लागतो.

⇒ विनोदी चित्रपट पाहणे किंवा स्वतःचे मनोरंजन होईल अशी गोष्ट निवडणे. हि पद्धत अत्यंत लाभदायक ठरू शकते. ताणाने व्यापलेल्या तुमच्या मनाची जागा एकदा मनोरंजनाने घेतल्यास तुमच्या जाणिवा अधिक वास्तव रुपाला येण्यास मदत मिळते.

वरील हे उपाय केल्यास ओढवलेला प्रसंग जरी पूर्णपणे नामशेष होत नसला तरी मनात असणाऱ्या त्या प्रसंगाची तीव्रता नक्कीच कमी झालेली असेल. कारण काही मिनिटाआधीच तुम्ही तुमच्या मनाची ऊर्जा काही काळापुरती दुसरीकडे इन्व्हेस्ट केलेली होती.

आणि आता समोर असणाऱ्या प्रसंगाबद्दल नव्याने विचार करण्याची संधी तुम्हाला मिळालेली असेल…

म्हणून एकदातरी करून पहा !!



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!