आई-मुलाची संघर्षगाथा – दारूचा व्यवसाय ते कलेक्टर ऑफिस !
माधुरी पेठकर
मला माझ्या गोष्ट सहज मिळाली नाही. किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली.
उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी कि वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता.
मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली. पण ती डगमगली नाही कि कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे.
माय सांगते, मी लहान होतो. दुधासाठी रडायचो, पण दारू पिणार्यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेम्ब टाकायचे. म्हणजे मी गपगुमान झोपून घेईन. मोठा झालो आणि मग दारू पिणाऱ्यांना चणे, फुटाणे, चाकण आणून देऊ लागलो.
हे काम करणं भागच होतं. पण म्हणून मायनं आम्हाला फक्त याच कामाला जुंपलं नाही. मोठ्या भावाला आश्रम शाळेत घातलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत. शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो. घरी येऊन अभ्यास करत होतो. पेन, पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे, पण शिकायला छान वाटत होतं.
आमच्या जमातीत शिकायला जाणारी आमची हि पहिलीच पिढी होती. पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामे करण्यासाठीच. एकदा परीक्षा होती. ओट्यावर बसून अभ्यास करत होतो. दारू प्यायल्या आलेल्या एकाने मला चकणा आणून देण्यास सांगितलं, पण परीक्षेमुळे मी सरळ नाही सांगितलं.
समोरचा चिडला आणि शिकून असा कोणचा डॉक्टर – इंजिनिअर होणार असं म्हणून मला हिणवलं. मायला ते शब्द खूप लागले आणि होईल माझं पोर डॉक्टर – इंजिनिअर असं ठामपणे म्हणून गेली.
त्या माणसाच्या हिणवण्यानं मला खूप वाईट वाटलं. आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचीही आपल्याला हक्क नाही का, असा विचार आला. पण क्षणभरच, मायनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता. हा विश्वास खरा करायचं ठरवलं.
पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. गावापासून १५० किमी दूर होती शाळा. माय आली होती सोडवायला. मायपासून दूर कसं राहायचं या विचारणाचं रडायला आलं. मायही खूप रडत होती. पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं.
मायची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं हि संघी अशी वाया जाऊ द्यायची नाही. संधीचं चीज करायचं. मी घरापासून दूर राहून शिकत होतो. मन लावून शिकत होतो. दहावीला उत्तम गुणांनी पास झालो. बारावीला ९७ टक्के गन मिळाले आणि स्वतःच्या गुणांच्या जोरावर मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला.
कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची सोया झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशीप मिळाल्या. त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीकसारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती. मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो. पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालू होता. तो बंद केला असता तर पैसे कसे पुरवता आले असते.
एम.बी.बी.एस च्या शेवटच्या वर्षाला होतो. एकीकडे इंटरशिप चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास. मायचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती. बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा कैच गंध नव्हता. मायला तर मी फक्त डॉक्टरकीच करतो आहे, असं वाटत होतं. युपीएससीची परीक्षा काय असते? कशासाठी असते? कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहित नव्हतं.
तिनं तर तोपर्यंत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदारही आलेला बघितला नव्हता. आणि मी आयएएस ऑफिसरची तयारी करत होतो. वर्ष संपलं आणि माझ्या एका हातात एम.बी.बी.एस ची पदवी आणि दुसऱ्या हातात यु.पी.एस.सी क्रॅक केल्याचा निकाल होता.
घरी मोठ-मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसिदार, पुढारी मायला काही कळतंच नव्हतं कि इतकी लोकं का येत आहेत. मी मायला सांगितलं कि मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला. पण मी लगेच सांगितलं कि मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना.
मी म्हटलं कि डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो आहे. मायला एवढंच कळत होतं कि आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे. माझे नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांना सुद्धा ऐकून छान वाटलं. पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही काळात नव्हता. लोकांनी तर ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत माझं कौतुक केलं.
माझी पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. २०१२ पासून माझी माय आता माझ्या सोबत आहे. इथे मला करण्यासारखं खूप आहे. नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा. शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची, सुधारणांची नितांत गरज आहे आणि ते करण्यासाठीच मी या पदावर आहे.
वयाच्या ३१ व्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे. कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोट्या संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसलो असतो. इथे पोहोचेपर्यंत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षानं मला आज काय दिलं हे मी महत्वाचं मानतो.
आज ३१ व्या वर्षी माझ्याकडे काय नाही ? जगण्याचे हरप्रकारचे अनुभव घेतले आहे. पोटाला पीळ पाडणारी भूक अनुभवली आहे आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारूड नावाचा भिल्ल समाजातला तरुण जेव्हा आयएएस ऑफिसर होतो, भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते.
इथेही काहीतरी बदलतंय, घडतंय याची जाणीव होते. लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढं जरी माझ्या तरुण मित्रांनी या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे.



Khup Ch pranadayak…