न्युनगंड
सौ. भारती गाडगिलवार
न्युनगंड यालाच inferiority complex असेही म्हणतात. सगळ्यांमध्येच थोड्याफार प्रमाणात न्युनगंडाची भावना असतेच. न्युनगंड म्हणजे कमीपणाची भावना होय. आपल्यात काही तरी कमी आहे अशी भावना.
आत्मविश्वासाची कमी म्हणजेच न्युनगंड होय. प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्ती पेक्षा भिन्न असतो. प्रत्येकात त्याची त्याची स्वतःची गुण कौशल्ये असतात. आपण त्याच्या सारखे का नाही म्हणून झुरत राहण्या पेक्षा आपल्यात काय श्रेष्ठ आहे याचा शोध लागला की कोणताही न्युनगंड कोणत्याच व्यक्तीच्या मनात घर करु शकत नाही.
उदाहरणार्थ……..
एका खेड्यात एक शेतकरी रोज शेतातील विहिरीतुन पाणी घेऊन येत असे. त्यासाठी तो दोन बादल्या काठीला दोरीने बांधून पाणी आणत असे.
विहिरीवर दोन्ही बादल्या भरुन जायला निघत असे त्यावेळी दोनपैकी एक बादली जी त्याच्या डाव्या बाजूला असे त्याला एक छोटेसे छिद्र होते. त्यातुन थोडे थोडे पाणी गळत असे. शेतातुन घरी जाईपर्यंत त्या बादलीतील जवळपास अर्धे पाणी गळुन जात होते.
असे रोज होत होते. एक दिवस त्या गळणाऱ्या बादली कडे पाहून चांगली असलेली बादली म्हणाली, “बघ, मी किती मालकाच्या उपयोगी पडते आहे. पुर्ण पाणी त्याच्या घरापर्यंत नेते, नाहीतर तु बघ, निम्मे पाणी वाटेत सांडत येते.” हे ऐकून त्या छिद्र असणाऱ्या बादलीला वाईट वाटते.
दुसऱ्या दिवशी शेतकरी जेव्हा दोन्ही बादल्या घेऊन विहिरीकडे निघतो, तेव्हा ती गळकी बादली त्याला म्हणते, “मी तुझी मेहनत वाया घालवते आहे. निम्मेच पाणी मी घरापर्यंत नेते आहे, तु दुसरी नवी बादली का घेत नाहीस?”
यावर शेतकरी हसुन म्हणतो, “वेडी आहेस का? तुला माहित नाही तुझ्या नकळत तु किती छान काम करते आहेस. नीट बघ, आपल्या वाटेवरच्या डाव्या बाजूला छान हिरवळ फुललेली आहे. त्यात सुंदर फुले देखील उमलली आहेत.
हि डावी बाजू किती चैतन्याने रसरसलेली आहे. ही तुझ्या बाजुची डावी बाजू आहे. ही तुझ्या त्या गळक्या थेंबाची कमाल आहे. आता उजव्या बाजूला पाहा. दुसऱ्या बादलीतुन एकही थेंब गळत नसल्याने कोणतीच हिरवळ तेथे दिसत नाही. फुले तर नाहीच नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून मी देवपुजेला फुले नेतो आहे, ती याच डाव्या बाजुची आहेत. माझ्या या देवकार्यात तुझ्यामुळेच जी फुले फुलली त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तळाशी पडलेल्या छिद्राचे तु अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस.”
हे ऐकून ती गळकी बादली शहारली. मनापासून आनंदीत झाली.
तात्पर्य दोष कोणामध्ये नाही तर, सगळ्यांत आहे. त्यामुळे मी चांगला तो वाईट असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. पण त्या दोषातुन जर कोणाचे चांगले होत असेल, तर तो दोष त्या व्यक्तीने अभिमानाने मिरवावा.
आधी थोडा काळ इतर लोकं याला नावे ठेवतील पण अंतिम सत्य पाहिल्यावर तेही नतमस्तक होतील. समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही.
न्युनगंडाची सुरुवातच मुळात तुलनेने होते. तो खुप हुशार आहे तु नाही, ती गोरी आहे तु सावळी आहेस, तो गाणे खुप सुरेख म्हणतो, चित्र खुप सुंदर काढतो इ. असे वाक्य इतरांना बोलताना आपल्यामध्ये त्याच्यासारखे काहीच नाही म्हणून आपल्यात कमीपणाची भावना रुजते, त्यातुनच आत्मविश्वासाची कमतरता निर्माण होते.
कोणा इतर व्यक्तीमुळे आपल्यात न्युनगंड निर्माण होत असेल, आत्मविश्वास कमी होत असेल तर तो काढून टाका.
कोणतीही व्यक्ती सर्वगुण संपन्न कधीच नसते. तर तिलाही कधीं कधीं अपयश येतेच. पण त्यावर ती मात करुन पुन्हा यशस्वी होते. मनुष्याने चांगल्या गोष्टी पाहाव्यात ज्यातुन आत्मविश्वास वाढीस लागेल.
आपल्यात ज्या गोष्टी खुप छान जमतात त्यांचा विस्तार करावा. जसं की कोणी गाणे गातो, कोणी नृत्य, कोणी रांगोळी, कोणी भाषण चांगले देतो याप्रमाणे व्यक्तीने त्याला अवगत असलेल्या कलेला ओळखुन महत्व दिले तर तो त्या कलेत श्रेष्ठ सिद्ध होतो.
म्हणजेच त्या कलेला वाढविण्याचा आत्मविश्वास त्यास असतो. आणि एकदा आत्मविश्वास असला की तो हे करु शकतो तर त्याला त्याच्या न्युनगंडावर नियंत्रण मिळवता येते नक्कीच. मनुष्याने कायम लक्षात ठेवावे कोणताही न्युनगंड हा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे निर्माण होतो.
जगात असा कोणताच प्रश्न नाही की ज्याला उत्तर नाही. शोधाल तर सापडेल नक्कीच! गरज आहे तर आत्मविश्वासाची, हे मी नक्कीच करु शकतो या भावनेची!!
शकतात.