चैनीच्या गोष्टी नसतानाही रुबाबात जगणारी माणसंच खरी श्रीमंत.
मेराज बागवान
बारामती.
‘आनंद’ हा शब्द ऐकला की खूप अल्हाददायक वाटते. मनुष्य हा असा एक प्राणी आहे जो ह्या ‘आनंदाला’ नेहमीच शोधत फिरत असतो. पण त्याला त्याचेच समजत नाही की हे ‘आनंदाचे गाव’ आहे तरी कुठे? कारण तो त्याच्या प्रवासकडे दुर्लक्ष करतो.
प्रवासाला निघताना , वाटेत भेटणाऱ्या सुंदर सुंदर क्षणांना मुकतो आणि भल्या मोठ्या आनंदाला शोधण्याची धडपड करतो. पण काही केल्या त्याला स्वतःला अपेक्षित असलेला आनंद काही सापडत नाही.
कारण त्याची ‘आनंदाची’ व्याख्याच जणू निराळी च असते. पण त्याच्या हे लक्षात येत नाही, की रोजच्या आयुष्याच्या खडतर प्रवासात देखील आनंदाचे अनमोल क्षण विधात्याने आपल्याला दिलेले असतात आणि ते क्षण, तो ‘ आनंद’ आपल्या स्वागतासाठी कायमच उभा राहून आपली वाट पहात असतो.
पण हा भला मनुष्य हे सगळं धुडकावून भलत्याच वाटेवर जातो आणि फक्त ‘ आनंदाचे गाव’ धुंडाळीत बसतो.
अशीच गत आज आपल्या सर्वांची होत आहे. पण काही ‘दुर्मिळ’ माणसे याला नक्कीच अपवाद आहेत. कारण अशी माणसे स्वतःसाठी जगता जगता , समाजासाठी असे काही कार्य कायम करीत असतात की त्यांना आयुष्याबद्दल कोणतीच तक्रार रहात नाही.
आलेल्या प्रत्येक आव्हानामध्ये अशी माणसे संधी शोधतात आणि स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य देखील आनंदमय करतात.
‘आनंद’ ही गोष्ट आयुष्य खूप महत्त्वाची आहे. पण मोठ्या गोष्टी मिळत नाहीत म्हणून दुःखी होणे हे तरी कितपत योग्य आहे? आपली स्वप्ने जरूर साकार करावीत.
पण कुरबुरी करण्यापेक्षा संघर्षाचा प्रवास कायम सुरू ठेवावा. आणि ह्या सगळ्या प्रवासात मिळणारे आनंदाचे सगळे छोटे-मोठे क्षण उत्साहात साजरे करावेत. म्हणजे मग हे ‘आनंदाचे गाव’ शोधत फिरायची वेळ येणार नाही.
काही जणांकडे राहायला घर योग्य घर नसते, खायची मारामार असते , अंगभर कपडे नसतात. पण आपल्याकडे तर ह्या गोष्टी भरभरून असतात.
आपल्यापेक्षा कमी चैनीच्या गोष्टी असलेल्यांकडे पहा , ते तर रोज ‘वडा-पाव’ खाऊन आनंद मानत असतात. घर नसले तरी, आनंद मात्र घरभर पसरलेला असतो त्यांचा.
कपडे नसले तरी , आयुष्य रुबाबात जगत असतात , ही जगावेगळी ‘आनंदी माणसं’……
खरंच… कितीतरी लोक आपल्या आयुष्यामध्ये ‘आनंदाचे गाव’
शोधण्यात आपल्या आयुष्यात येणारे छोटे छोटे आनंदाचे क्षण दुर्लक्षित करतात आणि मोठा आनंद, मोठं सुख मिळवण्याच्या हव्यासापोटी शुष्क जीवन जगत असतात.
Very good
Very good