कोणत्याही व्यक्तीच्या किंवा घटनेच्या फार टोकाकडे जाऊ नये.
आपलं मानसशास्त्र टीम
असं म्हणतात कि कोणत्याही व्यक्तीच्या अतिजवळ जाऊ नये किंवा तिला फार दूर लोटू नये. तसेच कोणतीही घटना फार जिव्हारी लावून घेऊ नये किंवा एकदमच तिला दुर्लक्ष करू नये. हे असं आपण पुष्कळदा ऐकून आहोत.
आज जरा त्यातला मतितार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया…
तुमच्या आयुष्यातली अत्यंत प्रिय व्यक्ती ज्यावेळेस तुमच्या मनाविरुद्ध वागायला आणि बोलायलालागते, त्यावेळी प्रचंड त्रास होतो ना ??
किंवा तुमच्या अगदी नियंत्रणातला प्रसंग जेव्हा तुमच्याच विरुद्ध उलटतो, तेव्हाही त्रास होतोच ना.
असा कोणताही व्यक्ती नाही ज्याने वरील या दोन गोष्टींचा कधी अनुभव घेतलेला नसेल. कधी ना कधी अशा व्यक्ती आणि प्रसंग आपले पाय जमिनीवर नाहीयेत याची आठवण करून देण्यासाठी येत असतात.
मग अशा व्यक्ती आणि प्रसंग आयुष्यात येऊ नये यासाठी काय करता येईल ?? तर सोप्पा उपाय आहे.
अशा व्यक्ती आणि प्रसंग आयुष्यात येतंच राहणार आहेत. इथे फक्त प्रत्येकाने आपआपली मानसिकता सांभाळणं आणि टोकाकडे न जाणं यासाठी आधीच भावनांना आवर घालायला हवा.
एकदा का भावना टोकाकडे गेल्या तर त्रास आपल्यालाच होतो. कारण टोकाकडे गेलेल्या भावनांना ते सगळं अचंबित करणारं असतं.
जसं कि अत्यंत काळजी, प्रचंड प्रेम, भक्कम विश्वास यांमुळे पाचही ज्ञानेंद्रिय एक्स्ट्रा पझेसिव्ह होतात. लहान जरी विरुद्ध गोष्ट त्या व्यक्तीकडून आढळली तर त्या पझेसिव्हला ते सहन होत नाही आणि त्रास आपल्यालाच होतो. याउलट काही देणं-घेणं नाही, दुर्लक्ष, मत्सरी भाव यांमुळे सुद्धा ती व्यक्ती किंवा प्रसंग जेव्हा समोर येतो तेव्हा सुद्धा आपल्यालाच त्रास होतो.
तसा त्रास होण्यामागची महत्वाची कारणं आहेत, त्यातलाच एक प्रकार म्हणजे आपली टोकाकडे गेलेली भावना. आणि त्यालाच वास्तव समजणं.
म्हणून भावना टोकाकडे नेतील अशा आपल्याला उत्तेजित करणाऱ्या अनेक गोष्टी सभोवताली घडत असतात. ते ओळखून आपल्या भावनांना सदैव वास्तव रूप दिलं कि निरर्थक त्रास होण्याचा काही प्रश्नच येत नाही.