वैचारीक दंगल आणि संविधान
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
प्रथमतः सर्वांना आपल्या बाबासाहेबांच्या जयंती निमित्त शुभेच्छा !
आज थोडसं सद्यस्थितीवर मत मांडणार आहे. म्हणजेच आपले थोर महापुरुष ज्यांच्या विचारातून भारताची समोर येणारी गुणवैशिष्ट्ये आणि त्याच महापुरुषांचा आधार घेऊन सद्याची चमकोगिरित मग्न असलेली तरुण सामाजिक चौकट. याबद्दल राजकारणी तर अग्रेसर आहेतच, पण याठिकाणी तरुणांचही मेंढ्या प्रमाणे वागण्याचा टक्का हल्ली वाढतोय.
याची प्रचिती मला भारताचे संविधान वाचत असताना आणि ऐकत असताना आली. सद्या वाचन सुरु आहे पण माहिती नाही की हे मला कुठल्या विचारा पर्यंत नेवून सोडतिल. पण इथपर्यंत ते संविधान इतकं कौतुकास्पद आहे की त्यामध्ये बाबासाहेबांनी पुष्कळ अंगांना स्पर्श केला आहे. यावरुनच अंदाज लावू शकतो की ती व्यक्ति किती बुद्धिमान होती. आणि त्याच बुद्धीचा, त्यांच्या समायोजन क्षमतेचा, सृजनशिलतेचा, सक्षम नेतृत्वतेचा आणि दूरदृष्टिचा यशस्वी प्रयोग म्हणजेच ‘भारताचे संविधान’ !
आणि या संविधानामध्ये समाजाला प्रबोधित करण्याची क्षमता आहे, असे वाटते. इतकी प्रचंड दूरदृष्टी या आपल्या संविधानात आहे.
पण बाबासाहेबांनी आपल्यासाठी इतक्या गोष्टी मांडून ठेवल्यात त्या आपल्याला वेचताही येत नाहीये. हेच दुर्दैव्य म्हणावे लागेल.
आज काही नादान राज्यकर्त्यांमुळे मला माझे बाबासाहेब एका विशिस्ट जातीपुर्ति, धर्मापुर्ती आणि पक्षापुर्ती मर्यादित असल्याचा भास होतो. याचे एकमेव कारण म्हणजे आपल्याला संविधान वाचण्यासाठी प्रोत्साहीतच केले जात नाही. त्यांच्या राजकीय पोळ्या कश्या भाजल्या जातील, म्हणून संविधान समजण्यापासून आपल्याला दूरच ठेवले गेले. (ज्या अर्थाने आज संविधान पसरायला हवं पण ते होताना दिसत नाहीये, म्हणून त्यावर काढलेला असा एक तर्क).
याच कारण म्हणजे बाबासाहेबांचे समानतेचे विचार कळतील आणि पटतील, मग यांच गलीच्छ राजकारण कसे चालेल.
असो ! ३ वर्षांपूर्वी प्रत्यक्ष आलेला एक अनुभव सांगतो. एकदा रेल्वेने प्रवास करत होतो. छानपैकी विंडोसीट मिळाली होती. समोरच एक ३०-३२ वयाचा तरुण बसला होता. रविवारचा दिवस असुनही तो नोकरी करायला चाललाय, असे एकंदरीत त्याच्या वर्तनावरून वाटत होते. त्याने त्याच्या बँगेतुन एक पुस्तक बाहेर काढले त्या पुस्तकाचे नाव होते, ‘भारताचे संविधान’ !
ते बघितल्या बघितल्या माझ्या मनात पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया अशी आली की हा मुलगा विशिष्ट जातीचा असावा. त्याच्याच शेजारी दोन महीला बसल्या होत्या. खरंतर त्याच दोन महीला विशिष्ट जातीचं प्रतिनिधित्व करीत होत्या. याचा पुढे प्रत्यय येईल.
त्यातल्या एकीने त्याचं कौतुक केलं आणि त्याच्यासमोर ‘जय भीम’ बोलल्या. तो मुलगा थोडासा सैरावैरा झाला कारण त्याचा चेहरा केविलवाणा झाला होता. पुढे त्या महीला म्हणल्या, अरे तू या जातीचा आहेस ना ! त्यावर तो पटकन उत्तरला, नाही !
त्याचे उत्तर ऐकल्यानंतर मी सुद्धा त्याच्या बाबतीत कसा चुकलो हे समजले. पुढे त्या महीला आपली बाजु सावरत म्हणाल्या, अरे वाह ! छान ! तरी सुद्धा तू हे पुस्तक वाचत आहेस, आम्हाला तुझा अभिमान आहे. त्या महिलेच्या या शेवटच्या वाक्याचा अर्थ मला काही समजला नाही, पण त्या तरुणाला असा काही समजला की त्याने ते पुस्तक बँगेत ठेवून दिले.
त्याचा नेमका अर्थ आज मला संविधान वाचत असताना समजत आहे, की मी आशा बाबतीत किती पूर्वग्रह दूषित होतो आणि किती वैचारीक दंगलीत अडकून पडलो होतो. या वैचारीक दंगलीमुळेच आपले बाबासाहेब आणि संविधान हे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत राहिलेत.
आता त्या महिलेने जरी सारवासारव करुन कौतुक केले असले तरी ते पाहून मागे बोलणारे सुद्धा खुप आहेत, मग तो कोणत्याही जातीचा व धर्माचा असू दे. जर एखाद्या व्यक्तीला थोर समाजसुधारकांच चरित्र वाचायचे असेल, तर त्याला ते उघडपणे वाचता येत नाही, आणि जर त्याने ते वाचलं, तर विशिष्ट जातिशी आणि धर्माशी आपलं नाव जोडलं जाईल, अशी एकमात्र भीती त्यांच्या मनात असते.
यावर सामान्यांना सुचणारा अगदी सोपा उपाय म्हणजे कोणालाही न घाबरता अशी पुस्तकं उघडपणे वाचायची. पण अशी पुस्तकं वाचनं हा काही हिमतिचा विषय नाही, तो तर एक आवडीचा विषय असला पाहिजे.
म्हणजे अशी पुस्तकं जरी आपण हिम्मत करून उघडपणे वाचली, तरी हे आजूबाजूच विचारांच दंगल कसं मिटवणार. मुळात एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला हिम्मत करावी लागत आहे, म्हणजेच कुठेतरी पाणी मूरत आहे.
आणि हे फक्त बाबासाहेब आणि संविधानपुरते मर्यादित नाहीये, तर शिवचरित्र, भगवतगीता, कुरान, बायबल आणि इतर बाबतीत असे लाखो-करोडो-असंख्य तरुण मनं असतील जी हे सर्व वाचण्याची इच्छा ठेवतात. पण हे उघडपणे वाचू शकत नाही आणि वाचलेलं संदर्भासहित मांडू शकत नाही.
कारण ‘विशिष्ट जातीचा’ असं हिणावले जाण्याची शक्यता जास्त वाटते. आज हेच वैचारिक दंगल गाडून टाकण्याची सर्वात जास्त गरज आहे. आणि ते संविधान वाचल्यानंतर आणि व्यवस्थित समजुन घेतल्यानंतरच होवू शकते, यावर मी ठाम आहे.
आजच्या आनंदी प्रसंगी केवळ दोनच गोष्टींची आशा या राज्यकर्त्याँकडून करूया. ती म्हणजे….
१) जास्तीत जास्त ‘भारताचे संविधान’ तरुणांपर्यंत कसं पोहोचेल, यासाठी Event Management सारखा भव्यदिव्य उपक्रम राबविने.
२) इंदु मील या जागेवर केवळ बाबासहेबांचा पुतळा नकोय, तर त्याच्या जोडीला बाबासाहेबांच्या नावाच आंतरराष्ट्रीय दर्जाचं वाचनालय ठेवणे, आणि ते ही फुकट ! अक्ख्या जगाला समजू दे की आपले बाबासाहेब काय होते ते !
जर वरील दोन गोष्टींच व्यवस्थित व्यवस्थापन झाले तर त्याच थोर पुरुषामुळे पुतळ्यापुरते काही नादान राजकारण्यांनी आखलेली चौकट तर दूर होईलच पण बाकीच्याही थोर पुरुषांकडे बघण्याची एक सखोल दृष्टी प्राप्त होईल.
संविधान वाचत असतानाचे फायदे
१) देखावा स्वाभिमान नष्ट होवून खराखुरा स्वाभिमान जागृत होईल.
२) समानतेचा खरा अर्थ उमगेल.
३) आपल्या राज्याकडे सरकारने कसं लक्ष द्यावं, हे शिकायला मिळेल.
४) दिर्घ परिश्रम आणि संयमातुन पुढे काय घडू शकतं, याचा साक्षात्कार होइल.
५) खैरलांजी, राहुल आणि इतर सारखे प्रसंग जेव्हा घडतात तेव्हा झेंडे हाती घेउन आंदोलन करण्यापेक्षा, त्या परिस्थितिकडे एकंदरीत कसं पाहणं अपेक्षित आहे, याच मार्गदर्शन लाभेल( कारण झेंडे हाती घेउन फ़क्त निवडणुक जिंकली जाते, पुढे काहीही होत नाही, राम मंदिराचा किस्सा आठवतोय ना !)
६) आणि खुप सारे…
हा सम्पूर्ण लेख मी त्यांना अर्पण करीत आहे, ज्यांनी संघर्षातुनही जीवन आनंदी कसं केलं जाऊ शकतं, याचा आम्हाला कानमंत्र दिला.
ते म्हणजे आपले बाबासाहेब !
(प्रस्तुत लेख हा लेखकाने ४ वर्षांपूर्वी लिहिला आहे).
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
खूप छान विचार आहेत सर
Best