लॉकडाऊन आणि पती-पत्नीमधील वाढत चाललेली डिस्टन्सिंग.
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
लॉकडाऊनच्या आधीचा काळ हा फार वेगळा होता. दोघेही सकाळी उठायचे. त्याची ऑफिसला जाण्याची धावपळ आणि तिची त्याला डब्बा करून देण्याची धडपड आणि ती जर नोकरी करत असेल तर मग आणखीन लवकर उठावं लागत होतं. या सकाळच्या वेळेत सुद्धा एकमेकांचं मानसिक भांडं हे एकमेकांना आदळायचंच. परंतु ऑफिसमध्ये गेल्यानंतर एकंदरीत सोशल ठिकाणी पाय ठेवल्यानंतर सकाळच्या वाजलेल्या भांड्याचा आवाज केव्हाच मधुर झालेला असायचा.
मग एकमेकांना फोन करून, ‘अहो, जेवलात का?’ किंवा तो ‘अगं, भाजी छान बनवली आहेस”.
हे असं रुटीन आठवून अजूनही मन कसं प्रफुल्लित होतं.
मग आत्ताच अशी चिडचिड, वादा-वादी किंवा भांड्यांचा आवाज सलग २-३ दिवस मनात घुमत राहणे हे असं का होत असावं?
याला विशेष असं मानसशास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे, लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात ‘कोरोना’ संदर्भात चिंता वाटत असली तरीही आता आपल्याला एकमेकांसाठी पुष्कळ वेळ देता येईल, याबाबत जोडप्यांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली असावी. परंतु कालांतराने त्याच्यातील मजेशीरपणा हा हळूहळू लोप पावत गेला. इथेच शास्त्र दडलंय आणि ते शास्त्र असं सांगतं की एकाच व्यक्तीचे चेहरे जर वारंवार समोर येत असतील तर त्या विशिष्ट व्यक्तीविषयीचा तोचतोचपणा याचा उदय होतो.
यावर उपाय म्हणून शास्त्र असं ही सांगतं की, जर तोचतोचपणा संपुष्टात आणायचा असेल किंवा उद्भवूच द्यायचा नसेल तर त्या नात्यांमध्ये नाविन्यपूर्ण असं सतत घडायला हवं..आणि जे काही नावीन्यपूर्ण कराल त्याचा आत्मिक आनंद हा दोघांनाही मिळायला हवा. मग ते नातं रटाळ वाटणार नाही, दुसऱ्याच गोष्टींचा राग एकमेकांवर निघणार नाही आणि तो राग किंवा मनात कटुता जरी असली तरी त्याठिकाणी वेळ आणि ऊर्जा जाऊ नये यासाठी काही विशिष्ठ एक्सरसाईझ किंवा ऍक्टिव्हिटी कौटुंबिक वातावरणात असायला हव्यात.
त्या पुढीलप्रमाणे….
केवळ तिनच एक्सरसाईझची सवय या पुढील लॉकडाऊनच्या दिवसात किंवा पुढील ९० दिवसात स्वतःला लावून घेऊया.. आता ९० दिवस का? कारण एखादा विचार किंवा कृती जेव्हा आपण रोज सातत्याने करू तर त्याची आपल्याला सवय होते. या सवयींची सवय होण्यासाठी पती-पत्नी दोघांनीही यात प्रत्यक्ष सहभाग घेणं जरुरीचे आहे.
१) “आजपासून मी हे करणार नाही”.
एक तक्ता तयार करा आणि त्याला वरील शिर्षक द्या. यामध्ये तुम्हांला ८ ते १० पॉईंट्स शोधायचे आहेत. ज्याठिकाणी तुमच्या पत्नी किंवा पतींसंदर्भात तुमचा सर्वाधिक वेळ आणि ऊर्जा वाया जात आहे. जसे की, ‘मी माझ्या पत्नीवर विनाकारण चिढतो’ किंवा ‘मी माझ्या पतीला खूप टोचून बोलते’. असे पॉईंट्स असल्यास तक्त्यात लिहिताना तुम्हांला ‘मी माझ्या पत्नीवर विनाकारण चिढणार नाही’ किंवा ‘मी माझ्या पतीला टोचून बोलणार नाही’. असे विरुद्ध वाक्य करून तुम्हाला ८ -१० पॉईंट्स शोधायचे आहेत.
जर आज पूर्ण तक्ता बनवला तर उद्यापासून १ महिना रोज सकाळी पाच मिनिटे तुम्हाला ते वाचून काढायचं आहे. तुम्ही ते का वाचणार, कारण आज मला असं वागायचं नाहीये, हे रोज सकाळच्या ५ मि. मध्ये तुम्ही ठरवणार. १ महिना झाल्यानंतर पुन्हा सकाळच्या ५ मि. मध्ये तो तक्ता घ्यायचा आणि ज्या पॉईंट्सवर तुम्ही उत्तमरित्या विजय मिळवलात, त्याच्यावर काठ मारायची आणि उरलेले पॉईंट्स पुढच्या महिन्यासाठी सुरू ठेवायचे.
याचा तुम्हांला सर्वात मोठा फायदा म्हणजे नवरा किंवा बायकोप्रती तुमची वाया जाणारी ऊर्जा आणि वेळ ही साठवून राहील आणि ते तुम्हाला तुमच्या चांगल्या ठिकाणी वापरता येईल. तीच आपली दुसरी एक्सरसाईझ आहे.
२) “आजपासून मी हे करणार”.
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत तुम्ही स्वतःसाठी, आपल्या जोडीदारासाठी, स्वतःच्या आणि जोडीदाराच्या आवडीनिवडीसाठी, कौटुंबिक जबाबदऱ्यांसाठी, पुढच्या करिअर प्लॅनिंगसाठी जास्तीत जास्त कसा वेळ काढणार आहात, याचा मिळून एक तक्ता तयार करा. ज्यामध्ये त्या-त्या वेळेसमोर तुम्ही काय-काय ऍक्टिव्हिटी करणार आहात हे टाका. जेणेकरून मागच्या जुन्या निरर्थक सवयी मध्ये डोकावणारच नाहीत.
आत्तापर्यंत मोकळ्या वेळेत जुने दुःखी प्रसंग मग त्याविषयी अतिविचार नकळत डोकं वर करत असे. पण या दोन एक्सरसाईझ जितकं तुम्ही प्रामाणिकपणे कराल, त्यात सातत्य ठेवाल तितकं तुम्हांला हळूहळू सकारात्मक अनुभव यायला लागतील.
कारण पहिली एक्सरसाईझ तुमच्या जोडीदारविषयी वाया जाणारी ऊर्जा आणि वेळ वाचवत आहे आणि तोच वेळ आणि ऊर्जा तुम्हाला एकमेकांसाठी कुठे वापरायचं आहे, याची दिशा तुम्हांला दुसऱ्या एक्सरसाईझ मध्ये मिळणार आहे. फक्त प्रामाणिकपणा आणि सातत्य टिकून रहायला हवं.
३) मेडिटेशन, व्यायाम आणि छंद जोपासा.
आपण जेवतो त्यातनं आपल्याला जास्तीत जास्त शारीरिक ऊर्जा मिळते आणि मेडिटेशन आणि छंद जोपासून त्यातनं आपल्याला मानसिक ऊर्जा मिळते. तुमच्या दोघांमधलं जे वेगळंपण आहे ते बाहेर यायला हवं. अगोदर खूप करायला आवडायच्या पण सध्या गडबडीमुळे करता येत नाही. अशा सर्व गोष्टी बाहेर काढा.
वाचन, लेखन, कविता, चित्रकला, हस्तकला, नृत्य, गाणी ऐकणे ई. तुमच्या आवडीच्या गोष्टी दैनंदिन जीवनात पुन्हा नव्याने सामील करा. रोज अशा गोष्टींना २ ते ३ तास वेळ द्या.
तसेच रोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी मेडिटेशन करायचे विसरू नका. कारण सध्या सोशल मीडियातल्या बातम्यांमधून येणारं नैराश्य आणि त्याचा अप्रत्यक्ष एकमेकांवर होणारा परिणाम यावर जर कोणतं रामबाण मानसिक औषध असेल तर ते मेडिटेशनच आहे.
वरील या एक्सरसाईझ पुष्कळ पती-पत्नी करतही असतील आणि यापेक्षा उत्तम करत असतील आणि त्यांना रिझल्ट सुद्धा मिळत असेल. पण हा संपूर्ण लेख त्यांच्यासाठी ज्यांच्यामध्ये या लॉकडाऊनच्या काळात तोचतोचपणा आलाय आणि त्यातनं सतत वाद, भांडणे होत आहेत.
हा लॉकडाऊन संपेल तेव्हा संपेल, संपल्यानंतर पुन्हा संबंध मधुर होतीलही. पण आज तुमची वेळ जशी सरत आहे ती अशीच पुढे ढकलण्यापेक्षा आजच्या वेळेचा सदूपयोग करायला काय हरकत आहे..
म्हणजे एकमेकांच्या मनाचं डिस्टन्सिंग वाढणार नाही…
नवनवीन व्हिडिओसाठी YouTube चॅनेल
SUBSCRIBE करा!
??
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया“
क्लिक करून सामील व्हा!
??
खरे आहे आयुष्य भर संसार केला पण आता निवृत्त जीवन जगतोय पण एकमेकांचे दोष जास्त का दिसतात व माघार घेण्यास कोणाची तयारी नसते त्यामुळे छोटी भांडणे सतत होतात यावर काय करावे
Khoop Chaan. Achuk upay.. Aapal Nat japnyasathil