आनंद विकायचा आहे ! कोणाला पाहिजे आहे का ?
आपल्याकडे दूध जसे उतू जाते तसे सध्या सोशल मीडियाच्या पोस्ट उतू जात आहेत. प्रत्येक जण कुठला न कुठला फोटो घेतोय आणि टाकतोय सोशल मीडियावर….. हा पहा हा नवीन धबधबा, हे पहा हा नवीन ठिकाण, हे पहा नवीन धरण, या इथे हे तुम्हाला खुणावत आहे या लवकर आणि घाण करा…!
मला एक सांगायचे आहे, या फोटो नंतर खालच्या कॉमेंट्स जरा वाचत चला ना…! नुसता फोटो ढकलला म्हणजे तुमची जबाबदारी संपली का ? नाही..! तर इथं पर्यटन कसं झालं पाहिजे याचा विचार करणे देखील तुमच्या हातात आहे. एखादी गोष्ट तुमच्या स्वतःच्या मालकी हक्कात असेल तर त्याचे प्रमोशन जरूर करा… कारण तो तुमचा बिजनेस… तुमचा चरितार्थ होऊ शकतो. परंतु ज्या गोष्टीवर तुमचा *मालकीहक्क* नसेल तर त्या गोष्टीची किती वाट लावायची ? याचा जरा तरी आपण माणूस म्हणून विचार केला पाहिजेच…. कारण की आपण ज्या वेळेस हा धबधबा, तो धबधबा, हे ठिकाण, ते धरण, हा किल्ला म्हणून सांगतो, त्यावेळेस सोशल मीडियामुळे (बहुदा आपल्याकडे पैसा जास्त झाल्यामुळे) लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्या ठिकाणी दर शनिवारी-रविवारी जातात आणि तो भाग खराब करून येतात मग तो घाण झालेला भाग स्वच्छ करायची जबाबदारी कोणाची ? सरकारची ?
तुम्हाला जरा देखील याची कल्पना नाहीये की, तुम्ही निसर्गात जाऊन किती घाण करत आहात आणि तुम्ही सोशल मीडियावर हे फोटो टाकून निसर्गाचा किती ऱ्हास करत आहात.
निसर्ग बघण्यासाठी खरच खूप चांगला असतो, परंतु तो कसा पाहावा याची काहीतरी नियम असतात. जे आपल्याकडून फॉलो होत नसतील तर आपण तिथं न गेलेलंच बरं, असं माझं मत आहे.
शिवाय थोडा विचार करा की, आपण किती मीडिया ऍडिक्ट झालोय की प्रत्येक गोष्ट आज आपण शेअर करतो, आणि सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर आपल्या मनाला मानसिक समाधान मिळते…( हे असं ?)
म्हणजेच मी जर एखाद्या ठिकाणी जाऊन आलो आणि तिथले फोटो जर सोशल मीडियावर अपलोड केले नाहीत. तर माझ्या मनात बेचैनी निर्माण होते. मला त्रास व्हायला सुरूवात होतो. मला असं वाटतं की मी जिथे जाऊन आलो ते सगळ्या जगाने पाहिले पाहिजे. त्यांनी मला असं म्हटलं पाहिजे की, वॉव, तिथे जाऊन आलास ? किती सुंदर आहे मग माझ्या मनाला कुठेतरी हळुवार थंड हवा आणि ओला पावसाचा गारवा जाणवतो. अन्यथा ते कायम अग्नि सारखे धगधगत असते.
म्हणजे माझ्यातील आत्मशांती ही सोशल मीडिया ठरवू लागलेला आहे. याची पुसटशीदेखील कल्पना लोकांना नाहीये. आनंद, आनंदीवृत्ती, मानसिक समाधान याची संकल्पनाच बदललेली आहे. या तिन्ही गोष्टी सोशल मीडियावर तुम्हाला किती लाईक येतात यावर ठरवल्या जातात.
म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट जी तुमच्या आयुष्यात सर्वसामान्यपणे करता, ती जर सोशल मीडियावर तुम्ही अपलोड केली नाही, तर तुम्ही या जगात खूप मोठा गुन्हा करत आहात, असं तुम्हाला वाटतं…. किंवा तुम्ही एकटे आहात… तुम्ही थकला आहे… तुम्ही म्हातारा झाला आहे… तुम्हाला कळत नाहीये… तुम्ही वेडे आहात… असं तुम्हाला वाटतं.
सोशल मीडियावर तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राने जरी, किती सुंदर आहे हे..! असं टाकलं तर तुम्हाला जगातला सर्वात मोठा आनंद मिळतो (असा ?)
हे अगदी असंच झालेलं आहे. प्रत्येकाच्या बाबतीत, आणि मग लोक आनंद शोधत आहेत की, तो आहे कुठे ? तो आनंद सध्या तुम्ही सोशल मीडिया च्या हाता मध्ये दिलेला आहे. म्हणजे तुमचं *फेसबुक आणि तुमचं व्हाट्सअप* हे ठरवणार की तुम्ही किती आनंदी व्हायचं ? कधी आनंदी व्हायचं ? कधी सुख मानायचं ? कधी हसायचं ? कधी रडायचं ? तुमच्या शरीरातील तुमच्या मनातील प्रत्येक भावना सध्या सोशल मीडियाठरवत आहे आणि ही गोष्ट नोट करून घ्या की, या गोष्टीचा अतिरेक इतका वाईट होणार आहे की, तुम्ही कल्पनादेखील करू शकणार नाही…(याच्या पुढे काय होईल हे लिहत आहे मी पुढल्या आर्टिकल मध्ये)
म्हणजेच तुम्ही जर चिखलात पडला आणि त्याचा फोटो एखाद्याने सोशल मीडियावर अपलोड केला तर, कदाचित तुम्ही नैराश्याने ग्रासले जाल… बीपी, हार्टबीट वाढेल, शरीरात व मनात आमूलाग्र बदल होतील आणि तुम्ही आत्महत्या देखील कराल…(इतकं त्याच्या हातात गेलोय आपण..) भारतात सध्या सर्वात मोठी शक्ती आहे ती म्हणजे तरुण, आणि तोच तरुण पिढीचा प्रत्येक युवा आज मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेला जागोजागी आपल्याला दिसेल, किव्हा मग फोटो काढताना दिलेस.. मोबाईलवर आजकाल बोलणे कमी संवाद कमी आणि फोटो, सेल्फी, व सोशल मीडिया जास्त झालाय..ते संवादाचं साधन आहे हे कित्त्येक लोकं विसरून देखील गेलेले आहेत.. तुमचं सगळं जग तुमच्या हातात आलं आहे आणि त्याच्याशिवाय तुम्ही नाही राहू शकत..!
इथपर्यंत आपला स्वभाव आपले विचार सध्या सोशल मीडियावर अवलंबून आहेत.
त्यामुळे सोशल मीडियाचा वापर कितपत, कशा पद्धतीने करायचा ? हे थोडं विचार करुनच ठरवावे लागेल. तुमचा अनुभव जर असेल आणि त्यातून जर काही शिकायला मिळत असेल, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर निश्चित तो अनुभव शेअर करा..!
तुमच्याकडील चांगल्या गोष्टी असतील, ज्या समाजात काही चांगले बदल घडवत असतील, तर निश्चितच त्या देखील शेअर करा…!
एखादी माहिती, लेखन किव्हा भावभावना, ज्यातून तुम्ही प्रकट व्हाल, किव्हा तुमच्या ज्ञानात भर पडेल, असे काही असेल तर जरूर टाका..!
तुमचा एखादा सुंदर फोटोग्राफ असेल जो इतरांना पाहून आनंद देईल, किव्हा त्यातून माहिती मिळेल, ज्यामुळे त्याचा चांगला वापर होईल, तर तो निश्चितच शेअर करा…!
परंतु या शेअर करण्याच्या नादात स्वतःचं अस्तित्व, स्वतःच्या आनंद, स्वतःची समाधानाची वृत्ती, सोशल मीडिया सोबत शेअर करू नका, कारण की आज तुमच्या सर्व भावनांवर सोशल मीडिया ने कंट्रोल घेतलेले आहे. हे कंट्रोल ज्यादिवशी त्या मिडिया कडून ऑपरेट केले जाईल, त्यानंतर तुमची लाइफ *टोटली डिस्ट्रॉय* होणार आहे याची कृपया नोंद घ्या…(एक छोटेसे यंत्र, आपल्या भावना नियंत्रण करत असते ?)
कोणताही फोटो टाकताना आता विचार जरूर करा की, त्याचे ठिकाण सांगणे आणि तो फोटो टाकणे, हे खरंच गरजेचे आहे का ?
निसर्गाची वाट आपणच तर लावतोय आणि काही दिवसांपूर्वीच माझं एक यावरच आर्टिकल होतं की तो उधळतो तेव्हा आपलं छोटस अस्तित्व आपल्याला लक्षात येतं.. एकदा माळीण तर एकदा तीवरे धरण..!
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
छंद जोपासण्यासाठी
क्लिक करून सामील व्हा!
??
सुंदर सुटसुटीत व मनाला भीडणारी मांडणी
Chhan
Its a real situation….jinki willpower strong hogi vo hi badal skte hai