मुलांच्या हट्टीपणाला आपण बळी पडत आहोत का?
हल्ली सहज उपलब्ध होणाऱ्या सुख-सुविधा पूर्वी म्हणजे आपल्या वेळेस उपलब्ध नव्हत्या. आपले बालपण हे साधारण परिस्थितीतच गेले आहे…. किंवा जरी सगळ्या सुविधा उपलब्ध असल्या तरी आपले कधीही फालतू लाड पुरवले गेले नाहीत. काटकसर करणे, कोणतीही वस्तू जपून वापरणे असे अनेक योग्य संस्कार आपल्यावर झालेले आहेत.
हे सगळं लिहिण्यामागचे एकमेव कारण आहे कुठेतरी आपण आपल्याला ज्या सुख-सुविधा लहानपणी मिळाल्या नाहीत त्या आणि त्याहीपेक्षा जास्त आपण आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी एखादी वस्तू मागण्यापूर्वीच आपण त्यांना ती उपलब्ध करून दिलेली असते. ती वस्तू कुठून कशी आली? त्यासाठी किती मेहनत करावी लागली असेल? खरंतर, याच्याशी आपल्या मुलांना काहीही देणंघेणं नसतं.मुलांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट पालकांनी त्यांना दिलीच पाहिजे अशीच त्यांची मानसिकता झालेली असते आणि आपणही त्यांचे हट्ट पुरवणे हेच आपले कर्तव्य समजतो.परिणामी आपण एखाद्या दिवशी जर आपल्या मुलाला त्याने मागितलेली एखादी वस्तू देऊ शकलो नाही, त्याचा हट्ट पुरवू शकलो नाही तेव्हा हीच आपली मुलं आपल्यावर ओरडतात, आपला अपमान करतात, आपल्याला उलट बोलतात, अपशब्द बोलतात, लायकी काढतात…..
हे सर्रास होत आहे प्रत्येक घरामध्ये, याबाबतीत आपण कुठेतरी चुकत आहोत असं मला वाटतं. आपण लहानपणी हट्ट करायचो तेव्हा लगेच आपल्या फर्माईशी पूर्ण होत नसायच्या तेव्हा आपले आई-बाबा आपल्याला प्रेमाने सांगायचे, आज नाही आपण घेऊ शकत, परंतु नंतर नक्की घेऊन देईन तेव्हा आपण रडायचो आदळ-आपट करायचो परंतु कधी आई-वडिलांना दोष देऊन त्यांचा अनादर, अपमान केल्याचे आठवत नाही….
आपण मागितलेली गोष्ट आपल्याला मिळायची परंतु काही दिवसानंतर…. तोपर्यंत आपण विसरूनही गेलेलो असायचो आणि अचानक ती वस्तू आपल्या समोर दिसल्यावर जो आनंद व्हायचा तो अवर्णनीयच होता….त्यामुळेच सहनशीलता, परिस्थितीशी जुळवून घेण्याचे बाळकडू हे आपल्याला लहानपणापासूनच मिळालेले आहे.
परंतु हल्लीच्या मुलांमध्ये या सहनशीलतेचा, सद्य परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या गुणांचा अभाव पाहायला मिळतो… हल्लीची मुलं लगेच हायपर होतात, चिडतात, रडतात, वैतागतात, स्वतःला त्रास करुन घेतात, इजा करून घेतात…. मनाच्या कणखरतेचा प्रचंड अभाव या ठिकाणी दिसून येतो…
हारणं म्हणजे काय? हल्लीच्या मुलांना माहीत नाही… प्रत्येक गोष्टीत त्यांना जिंकायचं असतं…. प्रत्येकजण इथे एकमेकांशी स्पर्धा करतो, इथे कुणालाही हार पत्करायची नसते. अशी मानसिकता घातक आहे. हार पचवण्याची शिकवण त्यांना आपल्यालाच द्यावी लागेल, इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशीच स्पर्धा करायला लावून,हळूहळू मुलांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी आपलीच आहे..
मुलांनी मागितलेली एखादी वस्तू आपण त्वरित देण्यासाठी सक्षम असू तरीही ती वस्तू लगेच उपलब्ध करून न देता काही काळ त्यांना त्या गोष्टीसाठी वाट बघू द्यावी म्हणजे त्यांना कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला अवगत होईल. हे संस्कार लहानपणापासूनच मुलांवर होणे गरजेचे आहे.
कित्येक पालकांसाठी त्यांच्या मुलांनी केलेल्या अवास्तव मागण्या, या पुरवणं देखील आवाक्याबाहेरचं असतं… आणि पालकांनी जर त्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर ही मुलं चुकीचं पाऊल उचलतात….. अत्यंत संवेदनशील विषय आहे हा….
अशी अनेक प्रकरणं आपल्याही ऐकण्यात, पाहण्यात आली असतील?
खरंतर आपण सगळे सुजाण पालक आहात.अशा विषयावर आपल्या कडूनही काही उपाययोजना अथवा योग्य सल्ले अपेक्षित आहेत जेणेकरून अनेक पालकांना याचा उपयोग होईल कशी हाताळायची अशी परिस्थिती? जेव्हा मुलं हट्टाला पेटतात, कोणाचंही ऐकत नाहीत, काय करता येईल अशा वेळी?
हल्लीच्या लहान मुलांना आणि मोठ्या मुलांना देखील सांभाळणं ह्या डिजिटल युगात खरच खूप अवघड होऊन बसलं आहे….
मला तर असं वाटतंय आता आपल्याला ह्या पिढीच्या मुलांना कसं हँडल करायचं? कसं सांभाळायचं? याचे क्लास लावावे लागतील की काय?
कमेंट्स मध्ये तुमचे अमुल्य सल्ले अपेक्षित आहेत…. अनेकजण लेख वाचण्या सोबतच कमेंट देखील वाचत असतात त्यातूनही काही पालकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील…..
कारण हा विषय अतिशय संवेदनशील आहे….
धन्यवाद!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
आजचं मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे.
प्रत्यक्ष घरी येऊन घरातल्या वातावरणातच आपण कॉउन्सिलिंग करतो, कारण यथायोग्य कॉउन्सिलिंग हा त्यामागचा मुख्य उद्देश. कृपया याची नोंद घ्यावी !
धन्यवाद !
अतिशय छान वाटला, मुलांना लहानपणापासूनच चांगले धडे दिले पाहिजे, So Thanks
This is very important subject now
खूप संवेदनशील विषय आहे, आपण ज्या मुलांसाठी धडपडत असतो ती मुले कशी बनताहेत ह्याचे मूल्यांकन होणे खरच गरजेचे आहे. विभक्त कुटुंब पद्धती मूळे मुलांवर संस्कार होत नाही असे मला वाटते, कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याकडे त्यांना देण्यासाठी पुरेसा वेळच भेटत नाही,