परिचित नसलेला मनुष्य जेव्हा गोड बोलून ओळख वाढवतो तेव्हा तो सगळ्यात जास्त धोकादायक असतो.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
कामापुरता मामा, ताकापुरती आजी अशी एक म्हण आहे. याचा अर्थ असा जेव्हा गरज असेल तेव्हाच गोड बोलणे. आपला स्वार्थ साधण्यासाठी नातं तयार करणे, गोडी गुलाबी लावणे. अशी मानसिकता असलेली बरीच माणसं आपल्या आयुष्यात येत असतात, संपर्कात येत असतात. अश्या लोकांना एरवी आपल्या आयुष्यात काय चालू आहे, आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत याच्याशी काही देणं घेणं नसतं.
गरज सरो वैद्य मरो अशी यांची मनोभूमिका असते. आपल्याला जे काही हवं आहे ते मिळवण्यावर यांचा भर असतो. ही जी माणसं असतात ती प्रत्येक वेळी आपल्या परिचयाची असतील असं नाही. जी माणसं आपल्या ओळखीची असतात, संपर्कातील असतात त्यांच्याबद्दल आपल्याला थोडीतरी माहिती असते. त्यांचा स्वभाव आपल्याला माहीत असतो.
पण अनोळखी माणसं, परिचय नसलेली माणसं जेव्हा आपल्याशी गोड गोड बोलून नात तयार करायचा, ओळख वाढविण्याचा प्रयत्न करतात ते जास्त धोकादायक असतं. आताचा जो काळ आहे त्यात खरी प्रामाणिक नाती तयार करणं, ती जपणं खूप कमी झालं आहे, एक आव्हान होऊन बसलं आहे.
स्वतःचा स्वार्थ साधण्यावर लोकांचा भर जास्त आहे. त्यासाठी कोणत्याही थराला जायला माणूस तयार आहे. आणि ही अशी माणसं आपल्याला ठिकठिकाणी भेटणार आहेत. हा धोका आपल्याला जाणवणारच आहे. त्यामुळे आपल्याला जर हा धोका टाळायचा असेल, यापासून वाचायचं असेल तर स्वतः वर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे.
कधी विचार केला आहे, अनोळखी असूनही काही काळात ती व्यक्ती आपल्या जवळची होऊन जाते, स्वतःला हवं ते साध्य करून जाते आणि आपल्या हातातून सर्व निसटत जातं. अस का होत? कारण ही लोक माणसांना वाचण्यात, त्यांचा अभ्यास करण्यात पटाईत असतात. समोरच्या व्यक्तीशी कसं बोललं की ती आपल्या जवळ येईल, आपल्याशी जोडली जाईल हे या लोकांना माहीत असतं.
माणसाची एक प्रवृती आहे. माणूस दुःखाशी लगेच जोडला जातो. म्हणजे काय तर समोरच्याने स्वतःच काही दुःख सांगितलं, आपलं काही दुःख ऐकून घेतलं की आपण लगेच त्या माणसाशी कनेक्ट होतो. आपल्या मनस्थितीतून जाणारी व्यक्ती किंवा आपली मनस्थिती समजून घेणारी व्यक्ती आपल्याला मिळाली की आपल्याला ती जवळची वाटू लागते. ही गोष्ट खरी आहे की समजून घेणाऱ्या सर्वच व्यक्ती वाईट हेतूने वागणाऱ्या नसतात.
परंतु, ज्या माणसाला आपल्याबद्दल काहीच माहीत नाही, ज्या माणसाशी आपली तुटपुंजी ओळख आहे अशी व्यक्ती जर खूप जास्त गोड बोलून ओळख वाढवत असेल तर ते धोकादायक आहे. त्यामुळे आपण कोणासमोर किती व्यक्त व्हायचं, कोणाला आपल्या किती जवळ येऊ द्यायचं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. प्रत्येक माणसामध्ये कमतरता आहेत, पडत्या बाजू आहेत. परंतु ह्या गोष्टी दुसऱ्याला फायद्याच्या ठरू देऊ नका. या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी स्वतः सक्षम व्हा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
तुमचे लेख मी खूप मन लावून वाचत असतो.खरच त्या माध्यमातून प्रत्येक समस्यांवर मात करण्यासाठी नवी ऊर्जा मिळत असते…आणि भरकटलेले मन स्थिर होत असते.खूपच छान.आपलं.मानसशास्त्र प्रत्येक व्यक्तीने वाचावे असे मला वाटते आहे.स्वतः माझ्या जीवनामध्ये तुमचे लेख वाचून कृती करीत आहे.व माझ्यामध्ये हळूवार बदल होत आहेत…तुम्हाला माझ्या तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा सर…🌹🌹