Skip to content

आपल्या बायकोशी किंवा नवऱ्याशी एकनिष्ठ न राहिल्यास घडून येणारे दुष्परिणाम वाचा.

आपल्या बायकोशी किंवा नवऱ्याशी एकनिष्ठ न राहिल्यास घडून येणारे दुष्परिणाम वाचा.


काव्या धनंजय गगनग्रास

(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)


नवरा बायको हे नात जितकं भक्कम, पवित्र आहे तितकंच ते नाजूक आहे. अनेक धाग्यांनी ते बांधल गेलेलं असत. त्यात प्रेम, आदर, एकमेकांशी असलेले बोलणं, वागणं आणि सर्वात महत्त्वाचा असतो तो विश्वास. अश्या या धाग्यांनी हे नात गुंफलेल असत. यातील कोणत्याही धाग्याला धक्का लागला तर त्याचा परिणाम पूर्ण नात्यावर होण्याची शक्यता असते.

अनेक नवरा बायको एकमेकांवर प्रेम दर्शवतात, एकमेकांसाठी वस्तू आणण असेल, बाहेर जाणं असेल हे सर्व असत. पण जिथे आदर गरजेचा असतो, जिथे आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवणं गरजेचं असत तिथे जर तस झालं नाही तर हळू हळू नात्यात दुरावा निर्माण होतो.

नवरा बायकोच्या नात्यात जश्या या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत तसचं महत्त्वाचं आहे एकमेकांसोबत एकनिष्ठ राहण. म्हणजेच काय, तर ज्या व्यक्तीला आपण मनाने, शरीराने आपलं मानलं आहे तिच्यासोबत ते नात व्यवस्थित टिकवणे. आपल्या आयुष्यात तिची/त्याची जी जागा आहे ती कोणालाही न देणं. हे नात पूर्ण सन्मानाने व आदराने निभावणे. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला यात न येऊ देणे.

पण अस होतच अस नाही. अनेकदा नवऱ्याचे किंवा बायकोचे लग्ना बाहेर संबंध असतात. कारण काहीही असू शकतात, एकमेकांशी पटण, आर्थिक समस्या, लैंगिक आयुष्यात येणाऱ्या समस्या. पण जिथे खरच एकत्र बसून काहीतरी सोल्युशन शोधल पाहिजे तिथे अश्या बाह्य संबंधामुळे नवरा बायको मधील जी एकनिष्ठता असते ती तुटते. कारण अस खूप कमी वेळा होत की हे संबंध पार्टनरला समजत नाहीत. कश्याही पद्धतीने ते नवरा किंवा बायकोला समजून येत. हे एकनिष्ठ न राहणं जरी वेगवेगळ्या कारणांनी झालं असेल तरी त्याचे दुष्परिणाम व्हायचे ते होतात. ते कोणते ते पाहू:

१. विश्वास कमी होतो: जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला सोडून कोण दुसऱ्याशी नात जोडता तेव्हा तो त्या नात्याचा विश्वासघात ठरतो. तुम्ही फक्त तुमच्या पार्टनरचा आदर तोडता अस नाही तर त्या नात्याचा त्यात अनादर होतो. ज्या व्यक्तीशी आपण जन्मभराच नात जोडलेले आहे त्यामागे काहीतरी कारण असत. जरी नात्यात काही ताण तणाव असेल तरी बाहेर संबंध ठेवणं हे त्यावरच उत्तरं असत नाही. यामुळे नात्यात अविश्वास निर्माण होतो. पार्टनरचा तुमच्या वरचा विश्वास निघून जातो, कमी होतो.

२. तुमच्या पार्टनर मध्ये अपराधीपणा निर्माण होतो: जेव्हा नवरा किंवा बायको बाहेरचे संबंध ठेवतात आणि त्याविषयी जेव्हा त्यांच्या पार्टनरला समजत तेव्हा त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. जर माझा नवरा, किंवा बायको अशी वागत आहे तर याचा अर्थ मीच कुठेतरी कमी पडलो/पडले. माझ्यातच काहीतरी कमी आहे नाहीतर ती/तो अस का वागले असते अस वाटू लागतं. बरेचदा हे प्रमाण बायकांमध्ये जास्त असत. कारण आपल्या समाजामध्ये पण जर नात्यात काही प्रॉब्लेम आले तरी बायकोला दोषी ठरवण्याच प्रमाण जास्त असत. तुला नीट नवऱ्याला सांभाळता आलं नाही अस म्हटल जात. याचा अर्थ पुरुषांच्या बाबतीत अस होत नाही अस बिलकुल नाही. ही गोष्ट दोघांच्याही बाबतीत होते. पण बायकांना त्यांचे दुःख निदान मोकळे करण्याची मुभा असते. दुर्दैवाने पुरुषांना मात्र तसे करता येत नाही. त्यामुळे दुःख आतल्या आत साठवून अनेक नवरे मानसिक समस्याना सामोरे जातात.

३. मुलांवर चुकीचा परिणाम होतो: आपल्याला अनेकदा अस वाटत की मुल तर काय लहान आहेत, त्यांना काय समजत. पण अस नसत. मुलांचं आयुष्य हे बऱ्याच प्रमाणात त्यांच्या लहनपणीच्या आठवणींवर, घटनांवर आधारलेलं असत. फ्रॉइड पण हेच सांगतो की अनेक मानसिक आजार हे लहानपणीच्या गोष्टींमध्ये ज्या मनात दाबून टाकलेल्या आहेत त्यातून आलेले असतात. जेव्हा नवरा बायकोमध्ये या गोष्टी घडतात. जेव्हा दोघांपैकी कोण एकाचा बाहेर संबंध असतो तेव्हा त्याचा परिणाम मुलांवर होतो. आपल्या पालकांमध्ये आलेला दुरावा त्यांना जाणवतो. आणि या वयात मुलांचे आदर्श हे त्यांचे पालकच असतात. त्यामुळे ते त्यांच्या गोष्टीचं अनुकरण करत असतात. अश्यामध्ये जर हे सर्व अनुभव त्यांना आले तर त्यांच्या पुढच्या जीवनात जी नाती येणार असतात त्यावर या आधीच्या गोष्टी येतात. तसचं आपल्या आई किंवा बाबा ज्यांचे बाहेर सबंध आहेत त्यांच्या बद्दल ही मनात तिरस्कार येतो कारण त्यांनी कुठेतरी यांना फसवेलेल असत. त्यामुळे जर नात या दोघांचं असल तरी पूर्ण घर त्यात होरपळून निघत.

कोणत्या नात्यात मतभेद नसतात, समस्या नसतात. माणूस वेगळा, स्वभाव वेगळा म्हटल्यावर अस होत. पण याचा अर्थ आपण बाहेर संबंध ठेवण अस होत नाही. एकत्र बसाज बोला परत एकदा विचार करा, हे नात कुठे जाऊ शकत हे पाहा कोणाचीतरी मदत घ्या. पण अस आपल्या आयुष्यात तिसऱ्या माणसाला आणून आणून आपण एकच नाही तर अनेक आयुष्य खराब करतो. शेवटी नात तयार करणे सोपी गोष्ट आहे पण ते निभावणं साधी नाही. ते तेवढंच संवेदनशीलपणे निभवाव लागतं.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

9 thoughts on “आपल्या बायकोशी किंवा नवऱ्याशी एकनिष्ठ न राहिल्यास घडून येणारे दुष्परिणाम वाचा.”

  1. खूप छान…खूप काही यात शिकण्यासारखं ….

  2. अनुराधा पाटील

    खूप छान…! पण दोघांनीही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांना जाणलं पाहिजे, एकमेकांना वेळप्रसंगी साथ दिली पाहिजे, एकमेकांची मनं जिंकली पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांचा आदर केला तरच… ही नाती खूप छान राहू शकतात आणि टिकू शकतात…! 🙏

  3. चांगली माहिती मिळाली आहे पण नाते टिकवण्यासाठी सामंजस्याने राहिले पाहिजे पण ते दोघेही बरे राहिले पाहिजे
    यात स्त्रिया बऱ्याच गोष्टी फोनवर दुसऱ्याला पती विषयी सांगितले जाते त्या मुळे ही नाती टिकू शकत नाहीत

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!