Skip to content

नवरा-बायकोमध्ये वाद होतात…याची महत्वपूर्ण ७ कारणे.

नवरा-बायकोमध्ये वाद होतात…याची महत्वपूर्ण ७ कारणे.


सोनाली जे.


नवरा आणि बायको दोन भिन्न लिंगी व्यक्तिमत्त्व , दोन भिन्न परिवारात वाढलेले , संस्कृती , विचारसरणी , वातावरण , आर्थिक , सामाजिक दर्जा भिन्न , आजूबाजूचे वातावरण भिन्न , नातेवाईक , शिवाय शैक्षणिक पातळी कधी समान तर कधी भिन्न , असे अनेक बारकावे लक्षात घेवून कुठे तरी जमेल असे वाटले की मग लग्न पक्के ठरले जाते. प्रेम विवाह असेल तर वेगळ्या गोष्टी.

नवरा – बायको मध्ये खूप चांगले नाते असेल तरी काही वेळेस वाद होतातच .या वादांची प्रमुख कारणे पाहूया.

पण हे सांगण्याचा उद्देश काय बरे ? तर अशा दोन वेगळ्या व्यक्तीमत्वांना लग्नासारखे बंधन मन आणि शरीर याने एकत्र आणते. सुरुवातीला एकमेकांना समजून घेणे , आवडी निवडी , विचार यात ही वेळ जातो . नवीन असताना एकमेकांना समजून घेण्याकडे जास्त कल असतो. त्यामुळे नवऱ्याला बायकोची एखादी गोष्ट आवडली नाही तरी तो adjust करून घेण्याचा प्रयत्न करतो. बायकोला नवऱ्याची गोष्ट आवडली नाही तरी ती adjust करते.

नवरा बायको म्हणले की तू तू मैं मैं होणारच . कधी दुरावा..मग विरह..त्या विरहातून एकमेकांची विनवणी , आणि मग परत एकत्र येण्याचा गोडवा असे हे चक्र सुरू असते. छोट्या कारणापासून मोठ्या कोणतीही कारणे वाद घडवू शकतात.ते त्यावेळची परिस्थिती , दोघांची मानसिकता , शारीरिकता , सभोवतालचे वातावरण यावर अवलंबून असते.

नवरा – बायको मध्ये खूप चांगले नाते असेल तरी काही वेळेस वाद होतातच .या वादांची प्रमुख कारणे पाहूया.
.याची महत्वपूर्ण ७ कारणे जाणून घेवू.

१. नवरा हा आधारस्तंभ असतो. विश्वास असतो. तो डगमगला की वाद होतात :

बायको ही हिंदू विवाह संस्कृती आणि पुरुष प्रधान संस्कृती प्रमाणे लग्नानंतर आपले माहेर सोडून सासरी येते. तेव्हा नवरा हा तिचा सगळ्यात जवळचा असे गृहीत धरून त्याच्या भरवशावर येते. घरातल्या इतर सगळ्या लोकांचे स्वभाव समजून घेताना नवऱ्यानं मदत करावी ही अपेक्षा असते. त्यात नवऱ्याला ही पूर्णपणे ओळखलेले नसते. त्याला ही समजून घेणे , त्याच्या आवडी निवडी , विचार त्यात आपल्या आवडी निवडी . विचार कधी कधी आपल्या आवडी निवडी ना इतरांच्या करिता मुरड घालावी लागते.

जर नवरा समजून घेणारा , समजून सांगणारा. , नवीन घर , माणसं , त्यांच्या खान पान पद्धती , संस्कार, विचार यात खूप फरक असतात. ते आत्मसात करताना नवरा हा हुकमी एक्का असतो. आणि त्याने जर वेळी साथ दिली नाही तर मात्र बायको कोलमडते. Helpless वाटते तिला.
त्यात घरातले आर्थिक व्यवहार पद्धती , घरातले बारकावे माहिती नसतात.

यात नवऱ्याचा वाटा खूप असतो आणि त्याने बायकोला सांभाळून घेणे , चुकले तरी तिला समजावून सांगणे आणि हसत खेळत काही वेळेस स्वतः पुढाकार घेवून करणे किंवा घरातल्या इतर स्त्रियांना हक्काने मदत करण्यास सांगणे जरुरी असते.

त्यातून विश्वास , आपलेपणा वाढतो आणि सगळ्यात महत्वाचे secure feel होते. ते खूप महत्वाचे असते बायकांना.

काही वेळेस घरातल्या वयस्क मंडळी मुळे ही नवरा बायको मध्ये वाद होतात. बरेचदा बायको सासू जवळची म्हणून बऱ्याच गोष्टी सांगत असते त्यात चांगल्या ही आणि थोड्या वाद होत असतील त्या ही.आणि त्यातून सासू मुलाला त्या बोलत असते ..मग मुलगा उगीचच सगळे आईला कशाला सांगितले पाहिजे. किंवा या वयात त्यांना हे कशाला सांगितले. काय गरज होती. असे म्हणून वयस्क लोकांना सांगून ही मध्ये पडू नका असे बजावून ही ते त्यात पडत असतात आणि नवरा बायकोचे वाद अजून वाढतात.

थोडे दिवस समजून घेतले जाते. समजले जाते आणि थोड्या दिवसांनी असे झाले नाही तर बायको निदान समजून घ्या म्हणून नवऱ्या सोबत वाद घालते .तर नवरा मी काय काय करायचे ? नोकरी , बाहेरचे बघायचे का तुला सतत मदत करायची. तुझे तुला सांभाळता येत नाही का असे म्हणून वाद घालत असतो. तर काही वेळेस तो आधार देण्यास कमी पडतो. अश वेळेस त्याच्यावरचा विश्वास डगमगतो.

कारण तसे क्षुल्लक वाटले तरी प्रत्यक्षात तसे नसते. वारंवार घटनाऱ्या घटना कारणीभूत असतात वाद होण्यास.

२. एकमेकांना पुरेसा वेळ न देणे :

कामे ही न संपणारी असतात. जबाबदाऱ्या , कर्तव्य असतातच. त्यातून च एकमेकांना वेळ देणे आणि सोबत असणे . मग दिवसभरात काय झाले असेल ते मोकळेपणे बोलणे असेल , काही प्रॉब्लेम्स सोडविणे असेल , तर काही महत्वाचे निर्णय discuss करून घेणे असेल . जसे घर घ्यायचे , गाडी घ्यायची , मुलांच्या शिक्षणाचे काही निर्णय , लग्नाचे असतील , किंवा development दृष्टीने , घरातल्या वडीलधाऱ्या मंडळी त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील ते बोलणे , शेअर करणे , ऐकून घेणे ही जरुरी असते. एकानेच बोलण्या ऐवजी एकमेकांशी संवाद साधणे गरजेचे असते.

जेव्हा दोघांना ही एकमेकांशी बोलायला वेळ नसतो तेव्हा उगीच असे वाटत राहते की आपल्याला ती / तो टाळतो. आपली गरज संपली . बोलायला ही वेळ नसतो हे एक कारण ही नवरा बायको मध्ये वाद घडविण्यास पुरेसे असते.

नवरा घरात इतरांना वेळ देत असेल तर बायकोला वाटते की आपण जास्त हक्काचे , आपला अधिकार जास्त ..त्याने आपल्याला वेळ जास्त द्यावा .ही possesiveness ची भावना वाद होण्यास कारणीभूत ठरते.

३. शारीरिक संबंध समाधानकारक नसणे . कमतरता . तसेच भावनिक गरजा समजून घेणे :

नवरा – बायको यांच्या एकमेकांकडून अपेक्षा असतात.की काही वेळेस घर , बाहेर सगळे सांभाळता सांभाळता मानसिक थकवा येतो , सततचा ताण , काळजी यातून आपल्या पार्टनर ने आपल्याला थोडासा आधार द्यावा ..कधी तरी आपले कौतुक करावे की तू दमते ..खूप करावे लागते…एखादा पदार्थ छान झाला तर तुझ्या हाताला किती छान चव आहे..कौतुक करावे ही अपेक्षा बायकोची असतं. कधी आधार द्यावा मी आहे सोबत तू कसली चिंता करू नकोस..

सतत बायको ला हेच झाले नाही तेच झाले नाही , वेळेत एक गोष्ट होत नाही , शेजारची बघ , अशा तुलना ही त्रासदायक असतात..
तेच नवऱ्याच्या बाबतीत ही घडते..बायको ने दमून आलात एव्हढे म्हणले, आल्यावर पाण्याचा ग्लास दिला , फ्रेश मुड ने छान आवरुंन स्वागत केले तरी नवऱ्याला उत्साह येतो पण रोजच्या सवयी झाल्या की या छोट्या गोष्टींकडे लक्ष ही दिले जात नाही.

जसे भावनिक गरजा असतात तसे एकमेकांच्या शारीरिक गरजा समजून , ओळखून त्या क्षणी एकमेकांना वेळ देणे गरजेचे असते..
दोघापैकी कोणा एकाला आवड नसेल , एकाला जास्त आवड असेल तशी दुसऱ्या partner ची साथ नसेल तर शारीरिक जवळीक किंवा संबंध व्यवस्थित नसतील तर शारीरिक संबंध हे समाधानकारक नसतात. कोणा एकात काही कमतरता असेल तरी ही सुख मिळत नाही.

त्यामुळे ही नवरा बायको मध्ये सतत वाद होत असतात.

या खेरीज सुरुवातीला सगळे समाधानकारक असते. पण मुलं झाल्यावर स्त्रिया त्यांच्यात पूर्णपणे अडकून पडतात. त्यांची जबाबदारी , मुलांचे खाणे पिण , आवरणे , बाहेर घेवून जाणे , अनेक गोष्टी त्यांना शिकविणे , पुढे त्यांची शाळा , शिकविणे , सोडणे घेवून येणे , अभ्यास घेणे , इतर activities यातच बायको अडकून पडते. मुले लहान असताना वेगळी कारणे , मोठी झाल्यावर त्यांनी बघितले तर ही भीती बायकोला जास्त असते. त्यातून त्या नवऱ्यापासून दूर राहतात. किंवा तेव्हडा वेळ ही देवू शकत नाहीत.

तर याउलट स्त्री यांना सगळे सांभाळून हीआवड असते. पण पुरुष च त्यांची ऑफिस कामे , मुले यात गुरफटून जातात. आणि बायकोला वेळ देवू शकत नाहीत.

यातून बरेच वेळा कोणा एकाची गरज आहे म्हणून केवळ या गोष्टी केल्या जातात किंवा कधी एकमेकांना मन ही मारावे लागते. वारंवार असे घडत गेले तर नवरा बायको यांच्यात वाद घडून येतात.

४. मीच का करायचे / मलाच करावे लागते सगळ्यांचे :

नवरा आणि बायको खरे तर दोघेही संसारा करिता सारखीच धावपळ , कष्ट करत असतात. पुरुष बरेचदा अर्थार्जन करतो आणि स्त्री घर सांभाळते शिवाय आजकाल नोकरी करणाऱ्या महिला ही आहेतच.

नवरा ऑफिस , जाणे येणे , तिथला कामाचा ताण तणाव, बॉसचे bossing हे सहन करीत , आर्थिक कमाई शिवाय खर्च यांचा ताळमेळ घालत असतो..घरखर्च, लाईट बिल, वाणी समान , इतर टॅक्स, इन्शुरन्स, mediclaim, घराचे भाडे असेल तर ते नाही तर गृहकर्ज हप्ता, गाडी चा हप्ता असेल तो , गॅस , मुलांचे शिक्षण , क्लासेस , कपडे , सणवार, आजारपण, घरात येणारे पाहुणे असतील . आणि इतके करून सगळ्यांच्या भविष्याकरिता तरतूद .असंख्य हिशोब डोक्यात घोळत असतात .बजेट सांभाळता सांभाळता कसरत सुरू असते.. तरीही घरी आले की हसतमुख बायको जे म्हणेल त्याला हो ला हो ..की तिला दुखवयला नको..मुले असतील ती म्हणतील तसे, शिवाय आई वडील असतील तर त्यांना सांभाळून ..हा balance सांभाळताना परत हसत खेळत.

बायकोचे ही तसेच घरातले देवाचे असेल, स्वैपाक सकाळ संध्याकाळ , breakfast , मग भाजी घेवून येण्यापासून , निवडणे ते करणे असेल किंवा घरातली साफ सफाई असेल, कोणाचे आजारपण ,घरतल्या वृद्धांची काळजी असेल की मुलांना. शाळेत वेळेत पाठविणे, त्यांचा अभ्यास , डबे , मुलांना शाळेतून दमून आल्यावर काही खावू करून ठेवणे असेल , किंवा नवरा दमून आला म्हणून चहा खाणे असेल , येणारे पाहुणे असतील त्यांचे आदरातिथ्य असेल, शेजार सांभाळणे असेल , स्वतः नोकरी करत असेल तर तिथला कामाचा ताण , बॉस सगळे सांभाळून परत घरचे वेळेत होणे यात तारांबळ उडते..

मग कधी कधी घाई गडबड उडते अशावेळी दोघांचे असे होते की हे काम मीच का करायचे . मलाच सगळ्यांचे करावे लागते..
यातून एकेकांचे अहंकार दुखावला जातो .त्यातून वाद होतात.

५. एकमेकांच्या आवडी – निवडी न समजणे, न जपणे :

जसे कधी नवऱ्याला सिनेमाची आवड असते पण बायकोला नसते त्यामुळे ती त्याच्या सोबत जाण्यास विरोध करते .याउलट बायकोला बाहेर फिरण्याची आवड असते, पिकनिक असेल, नवीन जवळपासची स्थळे असतील , शॉपिंग मग घरासाठी , स्वतः साठी मुलांकरिता
तेच तेच सारखे काय करायचे , पैसे नको तिथे खर्च करायचे..असे म्हणून दोघांनाही. एकमेकांच्या आवडी न समजणे . किंवा जपता न येणे .त्यामुळे तू माझ्या आवडीचा कधी विचार करतच नाही तुला पाहिजे तसेच करायचे कायम हा एक वादाचा मुद्दा असतो..

६. मुलांची शिस्त : – मुलांचे अभ्यास :

बहुदा नवरा मुलांची बाजू घेत असतो .बायको मुलांना हे जागेवर ठेवा ते जागेवर ठेवा..हा पसारा काढू नका..मला आवरायला लागते नंतर ..हातासर्शी गोष्टी जाग्यावर ठेवा ..वेळेत उठून , अंघोळ करून आवरा . का तर तिची पुढची कामे कपडे धुणे वेळेत होते..

यावरून नवरा म्हणतो मूल च आहेत ग थोड्या त्यांच्या कलाने घे..मोठी झाली की आहेच हे सगळे आता जरा मोकळीक दे.. पण बायकोचे एक की जेवढ्या लवकर त्यांना शिस्त लागेल ते चांगले .. यावरून नवरा बायकोे मध्ये टोकाचे ही वाद होतात.

आई वडील दोघांचे ही ध्येय असते की मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, करियर घडवावे, चांगला जॉब , व्यवसाय करावा , मानाने आणि अधिकाराने मोठे व्हावे..

त्याकरिता दोघेही सगळ्या सुविधा मुलांना देत असतात..त्यातून जेव्हा मुले अभ्यासाचा कंटाळा करतात, खेळण्यात ओढा जास्त , मित्र मैत्रिणी ..तेव्हा नवरा उलट खुश असतो की मुलांचे सामाजिक वर्तुळ ही वाढत आहे पण आई मुलांच्या मागे सारखा अभ्यास करा , अभ्यास करा म्हणून मागे लागते..

यातून नवरा बायको मध्येच वाद होतात..की सारखे अभ्यास अभ्यास काय ..त्यांना रिकामा मोकळा श्वास घेवू देत.. थोडे बदल म्हणून इतर गोष्टी करू देत..तर त्यावरून वाद की एकदा ध्येय पूर्ण झाले की सगळे करता येते छंद असतील बाकी गोष्टी..पण बायको ला या स्पर्धेच्या काळात लक्षात येत नाही की मुलांना ही या रेस मध्ये थोडी विश्रांती लागते म्हणजे अजून जास्त प्रेरणेने ते पुढे जातात. थोडक्यात मुलांचा अभ्यास हा नवरा बायको मधला अजून एक वादाचा मुद्दा असतो.

७. काही खास तारखा, सण विसरले तर : –

नवरा बायको दोघांपैकी कोणीही एकमेकांचे वाढदिवस , anniversary असतील ते विसरले , किंवा बायको जास्त करून दिवाळी पाडवा , लक्ष्मीपूजन याकरिता काही खास गिफ्ट ची वाट बघत असतेच नवऱ्याकडून आणि अशा प्रसंगी तो विसरला किंवा आपण एकत्र जावू म्हणून राहून गेले तर त्यांच्यात वाद नक्कीच होता..एकच दिवस हक्काचा असतो तो ही विसरणे म्हणजे काय..

तसेच आहे नवऱ्याने अशा खास दिवशी surprise प्लॅन केला असेल आणि घरातल्या वयस्क लोकांच्या प्रोब्लेम मुळे असेल , मुलांच्या परीक्षा , अचानक आजारपण असेल किंवा बायको ला रजा नाही मिळाली, तिची घरकाम यात surprise प्लॅन उधळला गेला तरी दोघेही एकमेकांशी वाद घालतात मी एवढा प्लॅन केला तरी जमवू शकत नाही..बायको म्हणते असे surprise plan करावेत कशाला मी काय रिकामी असते का दिवसभर ..माझ्या मागे सतराशे साठ व्याप असतात. झाले वादाला तेवढे ही कारण पुरेसे झाले.

नवरा बायको मध्ये वाद होण्यास अनेक कारणे असतात. कधी आर्थिक घडी बसली नसेल , नोकरी सुटली असेल , तर कधी मित्र मित्रांच्या सोबत कायम पार्टी , तर घरात वेळ देत नसतात , अगदी फालतू कारण ही असतात. जसे चहा खूप गरमच का दिला ? तर याउलट गारच का दिला ? तर बाहेरचे व्यवहार येत नाहीत शिकून घ्यावे. काही करायची .नवीन शिकण्याची इच्छा नसते. असेही बोलणे वाद घडवून आणतात.

पण एक आहे जर नवरा बायको हे एकमेक तेवढेच हक्काचे असतील , जवळचे असतील , एकमेकात भावनिक , शारीरिक बंध घट्ट असतील तर सगळे वाद विसरून परत शांत आणि समजून घेणारे असतील तर संसार खरेच सुखाने आणि आनंदाने करतात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

5 thoughts on “नवरा-बायकोमध्ये वाद होतात…याची महत्वपूर्ण ७ कारणे.”

  1. manish Atrawalkar

    माहिती खूपच महत्वाची वाटली मी एक पुस्तक लिहित आहे .मला त्यासाठी खूपच महत्वाची वाटली .

  2. आणि होणारी बायको तिच्या नोकरीत ऑफिसमधील तरूण बाॅसशी स्त्रीसुलभ मर्यादा ओलांडून बोलत आहे , त्याची मैत्री स्विकारत आहे , त्याच्यावरच पूर्ण विश्वास ठेवत आहे, स्वतःच्या खाजगी बाबतीत सुद्धा त्याच्याच पूर्ण अधिकारात रहात आहे आणि होणाऱ्या नवऱ्याला अज्जिबात किंमत देत नाही आणि तिचे बाॅसकडे कटाक्ष टाकून बघणे हे सगळे होणाऱ्या नवऱ्याने बघितले तर काय करावे ?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!