वैवाहिक नाते निभावताना परस्त्री किंवा परपुरुष याविषयी आकर्षण वाटणे, हे सामान्य असू शकतं का?
सुधा पाटील
(समुपदेशक)
आकर्षण….हा तर निसर्गाचा नियमच आहे.मुळात सृष्टीत नर आणि मादी हे दोनच मानवी प्राणी असतात.त्यांच्याआकर्षणातूनच स्त्री आणि पुरुष यांच्यात मूळ नातं तयार होतं.आणि पुढे मग त्यांच्यातील प्रजोत्पादन…. नवीन जीवाची निर्मिती आणि मग त्यातून वेगवेगळ्या नात्यांचा उगम होत राहतो.या साध्या, सरळ घटना सर्वांनाच माहित आहेत.
पण समाज निर्माण होताना जन्माला आलेल्या संततीची जबाबदारी, संगोपन यासाठी लग्न ही संस्था निर्माण झाली.त्यातूनच मग कुटुंब, संस्कृती, संस्कार हळूहळू निर्माण होत गेले.फार पूर्वी किंवा अजूनही काही समाजात एकपेक्षा जास्त लग्नं केली जातात.त्यालाही आळा बसावा… कुठेतरी स्थिरत्व यावं यासाठी कायदे निर्माण झाले.हे सारं समाजात स्थिरत्व येण्यासाठी…..
मग मूळ मुद्दा हा आहे की,स्त्री आणि पुरुष यांच्यातील आकर्षण…..तसंही पृथ्वीवर अनेक देशांची संस्कृती वेगवेगळी आहे.पाश्चिमात्य देशात लग्नं होत असली तरीही विवाह बाह्य संबंध, किंवा पटत नसेल तर वेगळं होणं, रिलेशनशिप या गोष्टी सहज स्विकारल्या जातात.कारण त्या देशांची वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय प्रगती मोठ्या प्रमाणात झाली आहे.
कारण स्त्री आणि पुरुष यांच भिन्न लिंगी आकर्षण हे नैसर्गिक असतं.मुळात हे आकर्षण शारिरीक संबंध, सौंदर्य, विचार,स्वभाव यातून निर्माण होत असतं.तहान, भूक, शारिरीक क्रिया,सेक्स हे जितकं नैसर्गिक आहे तितकेच स्त्री आणि पुरुष यांच्यातील आकर्षण नैसर्गिक आहे.मुळातच माणसाच्या आवडीनिवडी, सवयी बदलत जाणाऱ्या असतात.सतत काहीतरी नवीन मिळावं हा माणसांचा नैसर्गिक स्वभाव असतो.
त्यामुळे लग्न झाल्यानंतर एखाद्या परस्त्री बद्दल किंवा परपुरुषाबद्दल आकर्षण वाटणं अगदी स्वाभाविक आहे.कारण हे नैसर्गिक आहे.आपल्या भारतीय संस्कृती मध्ये शारीरिक भूक भागविण्यासाठी लग्न व्हावं लागतं.(आजकाल यात बदल होत आहेत.नवीन पिढीचे विचार बदलत आहेत.हा भाग प्रगतीचाच आहे.) लग्नानंतरच्या संबंधाला विधायक संबंध मानला जातो.त्यामुळे लग्नं झालेल्या स्त्री किंवा पुरुषाने इतर पुरुष किंवा स्त्री चा विचार करायचा नाही.किंवा ते चुकीचे मानले जाते.
पण कुणीतरी म्हंटले आहे…. माणसांला घरात पोटभर मिळालं की, त्यांच बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष जातं नाही.त्यासाठी मग लग्न झालेली स्त्री किंवा पुरुष सर्वच बाबतीत समाधानी असावे लागतात.पण मुळातंच आपल्याकडे लग्नं ही रुप पाहून, देणंघेणं ठरवून लग्न केली जातात.त्यामुळे ती दांपत्ये एकमेकांच्या गरजा किती प्रमाणात भागवतात हा एक संशोधनाचा विषय आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात संसार हे केवळ तडजोडीवर चालतात.सामाजिक बंधनांमुळे उगाचंच संसार रेटले जातात.त्यातूनच अनेक विवाह बाह्य संबंध वाढत जातात.आणि हे पूर्णतः नैसर्गिक आहे.कारण भूक लागलेला माणूस अन्न शोधणारच! कारण भूक ही नैसर्गिक गरज आहे.अगदी तसंच शारीरिक संबंध,प्रेम,आधार, भावनिक ओढ, वैचारिक आधार, मानसिक पाठबळ या गोष्टी माणसांच्या नैसर्गिक गरजा आहेत.
लग्न झाल्यानंतर या गरजा पूर्ण होत नसतील तर साहजिकच परस्त्री किंवा परपुरुष यांच्याकडे मनं ओढली जातात.हां…आता आपली सामाजिक चौकट याला गैर मानत असली तरीही माणूस त्यांच्या नैसर्गिक गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करतोच.
एक उदाहरण पहा…. लग्न झालेली स्त्री असो किंवा पुरुष तो चित्रपटातील हिरो किंवा हिरॉईन यांचे फॅन बनतात.मला सलमान खूप आवडतो.मला कॅटरिना जबरदस्त आवडते.काय तो हिरो दिसतो ग!….आई शप्पथ! काय त्या हिरॉईनची फिगर आहे….अशी वाक्ये सर्रास लग्न झालेले स्त्री किंवा पुरुष वापरतात.मग हे काय आहे?
मुळात नैसर्गिक आकर्षण आणि लग्न या दोन भिन्न गोष्टी आहेत.लग्नं झालं म्हणजे हे आकर्षण संपतं असं नाही.आणि खूपदा आपण एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याची तारीफ करतो.एखाद्या पुरुषांच्या सिक्स पॅकचं कौतुक करतो.हे सारं नैसर्गिक असतं.मुळात स्त्री आणि पुरुष यांच्यातील आकर्षण हे मरेपर्यंत असतंच असतं.म्हणूनच तर आता अनेक सिंगल व्यक्ती पार्टंनर शोधताना दिसतात.
लग्न ही एक शारीरिक, मानसिक, सामाजिक गरज आहे.यातून माणूस तृप्त नाही झाला तर तो घटस्फोट घेतो.दुसरा जोडीदार शोधतो.ज्यांना हे शक्य नसतं ते विवाह बाह्य संबंध ठेवतात.किंवा मानसिक आजारांना बळी पडतात.पण तोच माणूस शांत आणि आनंदी राहू शकतो जो त्याच्या नैसर्गिक गरजा पूर्ण करू शकतो….
मुळात लग्नानंतर परस्त्री बद्दल आकर्षण किंवा परपुरुषाबद्दल आकर्षण हे अगदी नैसर्गिक आहे.याकडे पुन्हा आपण किती पारदर्शी नजरेतून पाहतो हे महत्त्वाचे आहे.म्हणूनच नैसर्गिक जीवन समजून घ्या.चुकीची सामाजिक पद्धती किती आचरणात आणायची हे ज्याचं त्यानं ठरवावं.
कारण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात.सारेच विचार साऱ्यांना पटतात असं नाही.पण पृथ्वीवर तेच घडतं जे नैसर्गिक असतं.म्हणूनच स्त्री आणि पुरुष यांच्यातील आकर्षण हेही नैसर्गिक असतं.ते लग्नानंतर पूर्णतः ब़ंद होत असं नाही.हां…ओपनली काही गोष्टी बोलायला मर्यादा येतात हे नक्की! पण आकर्षण हे तेव्हाच निर्माण होत जेव्हा एखादी गोष्ट मनाला मनापासून आवडते.
आणि हे आवडणं हेही नैसर्गिक असतं.आणि ते मरेपर्यंत असतंच असतं.मग तिथे परस्त्री किंवा परपुरुष हा भेद येतंच नाही.म्हणूनच लग्नानंतर परस्त्री किंवा परपुरुष याविषयी आकर्षण वाटणे हे नैसर्गिक असतं.त्यात गैर असं काहीच नसतं.किंवा त्यावरून एखाद्या व्यक्तीला वाईट किंवा चुकीचे ठरवू नये.
या समाजात कित्येक जोडपी अशी आहेत की जी लग्नानंतर काही वर्षांनी दुसरी व्यक्ती आवडली म्हणून सामोपचाराने वेगळं होतात.तिथे एक उच्च अशी वैचारिक पातळी असू शकते.किंवा नैसर्गिक गोष्टींची जाणिव असते.ते उगाचंच कशाचाही बाऊ करीत नाहीत.पण जे नैसर्गिक आहे त्याला कोणतीही परंपरा, नियमावली आडवू शकत नाही.मग तुम्ही ती गोष्ट मान्य करा अथवा नका करू!….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख खूप आवडला.
आपण या लेखात जो विषय घेतला तो अतिशय संवेदनशील आहे.तो मनाला भिडणारा आहे. नैसर्गिक आकर्षण हे सनातन आहे. त्याला खोटं ठरवू शकत नाही व ते लपवू शकत नाही. ते लपवू पाहणाऱ्यांना अजूनच क्लेशदायक होत असते. समाजामध्ये कितीही नैतिकता याविषयी असली तरी शेवटी माणसाचे मन त्या नैसर्गिक आकर्षणाच्या पलीकडे जाऊन स्वतःला आनंद कसा मिळेल याचाच विचार करीत असतो. समाज स्वास्थ्याचा विचार केला तरी त्यावर मात नैसर्गिक आकर्षणच करीत असते व त्यामुळेच जीवनात हा जिवंतपणा वाटतो.
मनुष्याच्या नैसर्गिक गरजा खुप असतात. अन्न वस्त्र निवारा या मुलभुत नैसर्गिक गरजा आहेत आणि इतरही अनेक प्रकारच्या गरजा आहेत. परंतु प्रगतीशील समाजामधे काही हळूहळू काही निर्बंध आलेले आहेत ते समाजाच्या कल्याणासाठी आहेत. जसे काही-मूत्र आणि शौच विसर्जन ही पण नैसर्गिक गरज आहे परंतु त्यासाठी काही नियम आहेत. कोणी उघड्यावर ते करु शकत नाहीत. मुलभुत गरज आहे म्हणून कोणी कुठेही घर बांधू शकत नाही त्याचेही काही नियम आहेत. म्हणून केवळ नैसर्गिक गरज आहे असे म्हणून गैरव्यवहार करणे याचे समर्थन हाऊ शकत नाही.
लेख आवडला.मनाला पटण्यासारखं आहे पण भारतात या गोष्टी साजेशा नाहीत. तुम्ही म्हणताय की आता प्रगती होतेय.. नाही ही भारतासाठी अधोगतीची सुरुवात आहे. कुटुंब व्यवस्था काही वाईट नाही..त्यात अडथळा आहे तो पुरुष प्रधान संस्कृतीचा… सेक्स ही नैसर्गिक भुक आहे आणि ती कुटुंब व्यवस्थेतून भागवता येते. या व्यवस्थेला सुसंस्कारित विचार मिळाली तर भारताला सेक्स साठी परदेशीय संस्कृती ची आवश्यकता वाटत नाही.