Skip to content

खरंच आपण इतके बिझी झालोय का ??

मनातील विचारांचा – संवाद. स्वतःशीच …


एखादी घटना अशी घडते आयुष्यात की त्याची नेहमी रुखरुख लागते, खूपदा एखाद्या आजारी माणसाला भेटायला जायचं असतं पण काही कारणाने जात येत नाही, खरंतर मनापासून जायचे ठरवले असते पण आज जाऊ, उद्या जाऊ अस करता करता जाणं राहून जाते, मग कळतं की ती व्यक्ती आता जगात नाही, कायमची ही गोष्ट मनात राहून जाते. तीच गोष्ट आप्तेष्टांच्या बाबतीत होते. कुणाच्या घरी काहीतरी कार्यक्रम असतो, आपण येणारच अस त्यांनी गृहीत धरलेलं असतं… नेमकं अगदी सगळं प्लॅनिंग झालेलं असताना न टाळता येणार काम पुढ्यात येऊन ठाकतं.. पुन्हा तेच होतं, आपण जाऊ शकलो नाही याची टोचणी लागून राहते.

कधीतरी एखादा महत्वाचा फोन करायचा असतो. काही वेळातच करू असा विचार करत तो फोन मात्र करायचा राहून जातो, मध्येच काही काम आठवतं अन त्या फोनचा चक्क विसर पडतो, वेळ पुढे सरकत असते. परत परत वाटतं की चुकलेच आपले ही गोष्ट प्रथम करायला हवी होती. पुन्हा चुटपुट.

असंच घरातील जेष्ठ व्यक्तींच्या बाबतीतही होत. नकळतपणे त्यांनाही आपण गृहीत धरतो. आपला थोडासा वेळ हवा असतो त्यांना, पण ढीगभर कामांच्या डोंगरात आपण स्वतः ला इतकं बुडवुन घेतो की इतकी क्षुल्लक गोष्ट लक्षातच येत नाही पण महत्वपूर्ण नाते दृष्टीआड कधी होते हे कळतही नाही. अन गरज नसताना गैरसमज वाढीस लागतात, आपलीच माणसं दुखावतात… दुरावतात.. ही महत्वाची वेळ मात्र मुठीतून वाळूसारखी निसटत जाते. पुन्हा आपण स्वतः ला बजावतो की, इथुन पुढे अस नाही वागायचं. पण पुन्हा येरे माझ्या मागल्या. हे काही मुद्दामहून कोणी करत असे नाही, पण तणाव आपलं काम बरोब्बर करतो. मग इतकं सगळं करूनही निराशा पदरी येते.

वेळेच्या गणितात कधीतरी आपण स्वतः नापास होतो, इतरांसाठी तर सोडाच पण स्वतःलाही वेळ देता येत नाही, स्वतः वर सुद्धा हा अन्याय नाही का? नीट विचार केला तर जाणवते कितीतरी गोष्टी करायच्या राहिल्या आहेत… मुक्त फिरणं राहिलंय… नातेवाईकांना कित्तीतरी दिवसांत कामाशिवाय भेटलोच नाहीये… मुलांशी अभ्यास सोडून कोणत्याही अवांतर गम्मत गप्पा मारल्या नाहीत. गारेगार हवेत मनाशी गाणी गुणगुणत चंद्र, चांदण्या मोजल्या नाहीत.. गच्चीवर जाऊन मित्रांसोबत गप्पांची मैफल रंगली नाहीये… प्रसन्न मनाने देवळाच्या पायरी वर निवांत बसलो नाही.. आवडत्या पारिजातकाखाली वाकुन फुलं वेचली नाहीत… लहान होऊन आईच्या कुशीत शिरलो नाहीय… एकांतात बसून जुन्याच आठवणी काढुन गालातल्या गालात हसलो नाहीये, अश्या कित्तीतरी हव्याहव्याशा गोष्टी आपण विसरतोय का? छोट्या गोष्टीत लपलेला मोठा आनंद विसरतोय का आपण?

कामाचं टेंशन.. डेडलाईन पूर्ण करण्याची धडपड, तीव्र स्पर्धा, वाढती महागाई.. उत्तम जीवनशैली मिळवण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी, वाढत्या अपेक्षा, इच्छा पुर्ण करण्यासाठी किती ही धडपड.. ज्यांच्या साठी हे सगळं करतो, त्यांना खरच याची जाणीव असते? खरतर ही जाणीव स्वतःलाही नसते… धावत राहणं.. पळत राहणं.. अगदी सतत ही सवय होऊन जाते, मनात विचार इतके की अवेळी आलेला पाहुणा सुद्धा नकोसा वाटतो, खरच हे आहे का जीवन? हे असं व्हावे असे अपेक्षित आहे का आपल्याला? हा प्रश्न उपस्थित होतो.

बघा विचार करून स्वतःशीच खरच आपण इतके बिझी असतो ?


सदर लेख हा सोशल मीडियावर कॉपी-पेस्ट असून आम्ही आमच्या पातळीवर या लेखाचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्नही केला. शेवटी उत्तमोत्तम लेख आणि सेवा वाचक रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी नाईलाजाने असा मार्ग अवलंबावा लागत आहे. वाचकांपैकी जर कोणाला खरा लेखक समजल्यास कृपया माहिती द्यावी. धन्यवाद!



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया
error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!