Skip to content

त्रास दिलेल्यांना त्यांचा त्रास रिटर्न केल्यामुळे आपलं दुखणं थांबणार नाही.

त्रास दिलेल्यांना त्यांचा त्रास रिटर्न केल्यामुळे आपलं दुखणं थांबणार नाही.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“आई मी उद्यापासून शाळेत जाणार नाही. मला कोणी सांगायचं पण नाही.” गौरव रागातच आईला म्हणाला, ते देखील शाळेतून आल्याबरोबर. रागात तो काय करत होता त्यालाच समजत नव्हत. दप्तर एका बाजूला टाकल. हात पाय न धुता ओरडुनच सांगितल मी शाळेत जाणार नाही. त्यानंतर जो बाहेर निघून गेला तो अगदी तिन्हसांजेच्या वेळी आला. ते पण बाबा कामावरून परत यायचे म्हणून. घरी आला पण राग मात्र तसाच होता. त्याची छोटी बहिण प्राची, जेव्हा त्याच्याकडे आली आणि खेळासाठी आग्रह करू लागली तेव्हा तो तिच्यावर देखील ओरडला.

यावेळी मात्र जानकी म्हणजेच त्याच्या आईला राग आला. त्याने एकतर त्याच्या रागाचं कारण सांगितल नव्हत. त्यात तो छोट्या बहिणीवर पण ओरडला. तेव्हा ती मधे पडून म्हणाली, “गौरव तू शाळेतून आल्यापासून तणतणत आहेस. शाळेत काय झालं तेही ती नीट सांगत नाही. काहीतरी झालं असेल मान्य आहे. पण दुसऱ्या कोणाचा राग तू तिच्यावर का काढतोस? तुझी लहान बहीण आहे ना! अस करू नये.”

आता मात्र गौरव रडवेला झाला. “बोला तुम्ही सर्वजण मलाच बोला, तिथे शाळेत चूक नसताना ओरडा मिळाला, त्यात तू पण मलाच बोल.” त्याच बोलण ऐकून जानकीला वाईट वाटलं. एरवी तो कधी इतका रागवलेला तिने पाहिलं नव्हत. आज काहीतरी झालं होत खर. पण ती काही विचारेल त्याआधी तो परत तिथून निघून गेला. बाहेर जाऊन बसला. तिला समजलं तो आता बोलणार नाही. बाबा आल्यावर त्यांना तरी सांगेल म्हणून तिने आग्रह केला नाही. काही वेळाने बाबा घरी आले.

गौरव तेव्हा बाहेरच एका बाजूला बसला होता. त्यांनी त्याला पाहिलं व आत गेले. बसला असेल सहज म्हणून त्यांनी लक्ष दिलं नाही. आत गेल्यावर त्यांना समजलं की त्याच आल्यापासून बिनसलं आहे. आल्या आल्या प्राची पण छोट तोंड करून म्हणाली, दादा मला ओरडला. तिला त्यांनी समजावलं व ते बाहेर आले. तेव्हा हा असच मातीत रेघोट्या मारत बसला होता. ते बाजूला येऊन बसले तरी त्याने लक्ष दिलं नाही. मग त्यांनीच बोलायला सुरुवात केली.

“गौरव, काय म्हणते शाळा, काय काय चाललय?” “मला नाही जायचं शाळेत!” गौरव रागातच म्हणाला. “अरे अस अचानक काय झालं? आधी तर तुला सुट्टी आवडायची नाही. एक दिवस पण शाळा न चुकवणारा तु, आता म्हणतोस शाळेला नाही जाणार. कोण काही बोलल का तुला. सर ओरडले का? मला सांग बघू काय झालं?” “बाबा मला नाहीच जायचं शाळेत! ती शाळा पण चांगली नाही, शिक्षक पण आणि मुल पण.” गौरव पुन्हा तेच म्हणाला.

“गौरव पण अस काय झालं की तुला सर्वजण वाईट वाटत आहेत. मला सांग, नक्की काय झालं?” त्यावर गौरवने सांगायला सुरुवात केली. त्यांच्या वर्गात गावातल्या एका मोठ्या असामीचा मुलगा पण शिकायला होता. गावात त्याच्या वडिलांना खूप मान. त्यांचा हा मुलगा त्यामुळे शाळेत सर्व शिक्षक पण त्याच्याशी नीट अदबीने वागत. त्याला खरतर शिक्षणात फार रस नव्हता.

उलट इतर मुलांच्या खोड्या काढ, त्यांना काहीतरी दुखवण्यासारख बोल यात त्याला जास्त आनंद मिळे. बर मुल पण त्याला जरा घाबरून असायची. त्याचा तो जास्त फायदा घेई. गौरव पण त्यातलाच होता. तो त्याला घाबरत होता अश्यातला प्रश्न नाही. पण उलट उत्तर देणे, किंवा भांडाभांडी करणे असल तो करत नसे. चेतनला म्हणजेच त्या मुलाला तेव्हढ बास होत. त्यात गौरवची परिस्थिती बेताची होती. याच्याकडे जसं अभ्यासाचं नवनवीन साहित्य असे तस गौरवकडे नसायचं. त्यावरून पण तो गौरवला हिणवायचा.

हा बघा, गरीबचा पोरगा आला, शी याचे कपडे किती घाण आहेत. वर्गातल्या सर्व मुलांसमोर तो त्याला अस बोलला होता. गौरवला या गोष्टीचं खूप वाईट वाटे. सुरुवातीला त्याने शिक्षकांना सांगायचा प्रयत्न केला. पण त्यांनी फार दाद दिली नाही. आपण सोडून द्यायचं अस त्यांनी सांगितल. यामुळे चेतनला अस वागायला अजूनच मुभा मिळाली. एक दिवस तर त्याने एका मुलाच्या सायकलची हवा काढली व नाव मात्र गौरवचे सांगितले. शिक्षक शहानिशा न करता गौरवलाच ओरडले. तरी त्याने घरी काही सांगितले नाही.

पण आज मात्र चेतनने कहर केला. त्याने स्टाफ रूममध्ये जाऊन शिक्षकांची काही महत्त्वाची कागदपत्रे विस्कळीत केली. एका मुलाला गौरवाला निरोप द्यायला सांगितला की त्याला सरांनी बोलवलं आहे. जेव्हा गौरव तिथे गेला तेव्हा तिथे कोणीही नव्हते. तो आत गेला, पाहिलं तर सर्व अस्ताव्यस्त होते. तेव्हड्यात शिक्षक आले. त्याच्याशिवाय तिथे कोणीही नव्हते. त्यामुळे परत त्याच्यावरच नाव आले. कारण नसताना ओरडा मिळालाच त्याचबरोबर जे काम त्याने केल नाही ते त्याला नीट करावं लागलं.

“तुम्हीच सांगा बाबा, इतकं सर्व झाल्यावर मी का जाऊ शाळेत? तो चेतन सारखा मला तू गरीब आहेस, तुझ्याकडे काही नसत अस बोलतो. मी का ऐकून घ्यायचं त्याच? आज येताना मी त्याला चांगलच सूनवून आलो आहे. फार ऐकलं त्याच. मी उद्या समजा शाळेत गेलो आणि त्याने परत अस काही केल तर मी त्याला खरच मारणार. कारण तो काही सुधारणार नाही. त्यापेक्षा मी शाळेतच जात नाही.”

इतका वेळ बाबांनी सर्व शांतपणे ऐकून घेतलं. त्यांना माहीत होत की गौरवची यात काही चूक नाही. पण तरीही त्याच्या बाबत जे होत होत त्याला तो ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत होता ते मात्र त्याचच नुकसान करणार होत. एक मुलगा त्रास देतो म्हणून तो शाळेत जायलाच नकार देणं यातून तो त्या मुलाचं नाही स्वतःच नुकसान करत होता. बाबा त्याला म्हणाले, “गौरव तू जे काही सांगितल ते सर्व मी ऐकलं. मला हे पण समजलं की तुझी यात सगळ्यात काही चूक देखील नाही. तो मुलगा तुला त्रास देतोय आणि त्याच तुला वाईट वाटणं अगदीच स्वभाविक आहे.

बर मी तुला अस देखील म्हणत नाही की आपल्यावर होणारा अन्याय सहन करावा. पण मला एक गोष्ट सांग, आज त्या मुलाशी तू भांडून आलास, त्याला सूनवलस आणि तू म्हणतो आहेस की परत त्याने तस काही केलं तर तू त्याला मारशील. सर्व मान्य आहे. पण मला सांग, हे सर्व करून तुला जो त्रास झाला तो कमी होणार का? आजचच बघ, तू त्याला बडबडून आलास , मग तर तुला बरं वाटायला हवं होत. पण अस झालं का? तुझा राग, तुझ वाईट वाटण, दुःख कमी झालं का? नाही ना! ते आहे तसच आहे. उद्या जरी तू त्याला मारलस तरी त्यातून जे होऊन गेलेलं आहे ते बदलणार का?

नाही. बर तो तुला काहीतरी म्हणाला, म्हणून तू तसा होतोस का? तु स्वतः ला हा प्रश्न विचार. समोरच्या माणसाने त्रास दिला म्हणून आपणही तसच वागणं हे त्यावरच उत्तर असू शकत नाही. तु नक्किच त्याचा त्रास रोखू शकतोस. पण त्यासाठी तुला स्वतः ला आतून भक्कम व्हावं लागेल. इतकं की त्याच्या कोणत्याही बोलण्याचा तुझ्यावर काही परिणाम होणार नाही. जेव्हा तू तसा होशील तेव्हा ते त्याला दिलेले उत्तर असेल. टोकाची भूमिका मग ती चांगली असुदे किंवा वाईट आपल्याला त्रासदायकच ठरते. तु त्याच सहन केलं किंवा त्याच्यासारख वागून त्याला त्रास द्यायचं ठरवलं. त्रास तुझाच वाढणार आहे.

कारण अस वागून तू तुझे मुळ गुण विसरतो. गौरव असा आहे का? नाही. जेव्हा आपण इतरांसारखे वागू तेव्हा त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला? जर आपला त्रास कमी करायचा असेल तर आपला स्वभाव कोणामुळेही बदलू द्यायचा नाही. तसच गोष्टी सोडून द्यायला शिकायचं. तु जितकं एखादी गोष्ट धरून ठेवशील तितका तुला जास्त त्रास होणार. एक महान तत्वज्ञ होते ते काय म्हणतात माहीत आहे? गौरवने विचारले. ते म्हणतात,

” The best revenge is to be unlike him who performed injury”.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *