तुम्ही स्वतःसाठी जगताय की इतरांची मनमर्जी सांभाळून जगताय.. याचं उत्तर या लेखात मिळेल.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
माणसाचा एकंदरीतच आयुष्य हे विविध नातेसंबंधांनी व्यापलेल आहे. फक्त रक्ताचीच नाहीत तर त्यापलिकडेही, सामाजिक, कार्यक्षेत्रातील अशी विविध प्रकारची नाती व्यक्ती निर्माण करत असते व ती जपण्याचा व वाढवण्याचा प्रयत्न करत असते. अशी नाती सांभाळताना, जगताना अनेकदा समोरच्याचा मान राखायला लागतो, मतं लक्षात घ्यावी लागतात, मर्जी सांभाळावी लागते. प्रसंगी माघार घ्यावी लागते. तसेच स्वतःच्या इच्छाआकांक्षांना मुरड घालावी लागते.
पण कोणत्याही गोष्टीला मर्यादा आहेत. एखादी गोष्ट अगदी कमी किंवा अति होऊन चालत नाही. नातं जपणं, वाढवणं या सर्व चांगल्या गोष्टी आहेत त्यासाठी कधीतरी समोरच्याची मर्जी वगैरे राखणं, शब्दाचा मान राखला या गोष्टी असल्या पाहिजेत. पण त्याचा अतिरेक होत असेल तर आपण स्वतःलाच हरवून बसलो आहोत.
कामाच्या ठिकाणी बॉस ची मर्जी सांभाळण्यासाठी, वरिष्ठांच्या पदाचा मान राखण्यासाठी अनेकदा मनाविरुद्ध काही काम करावे लागतात. वैवाहिक जीवनात असताना, नवीन नातेसंबंधात बऱ्याचदा नवऱ्याला आवडत तसेच वागणे, त्याची मन मर्जी सांभाळणे या गोष्टी होताना दिसतात.
कारण अगदी पूर्वीपासूनच आपल्याकडे मुलीला शिकवले जातात की नवऱ्याची मर्जी सांभाळणे गरजेचे आहे. आता काळ बदलत आहे परंतु अजूनही काही ठिकाणी असं होताना दिसतं. अनेक मुलं आई वडिलांच्या आग्रहाखातर त्यांचं मन सांभाळतात, त्यांच्या आवडीचं क्षेत्र निवडतात.
अनेकदा यश मिळवतात, काम करतात पण अशा या दुसऱ्याच्या मनमर्जीतून आपल्याला कितपत समाधान मिळतं? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आपण स्वतः साठी किती जगतो? आपल्या आवडीनिवडी, आपले स्वप्न आपण किती प्रमाणात जपतो? खूप कमी. आपल्या समाजात अनेक बायका या संसारासाठी खपतात. त्यांच अख्ख आयुष्य हे संसार चालविण्यात, मुलाबाळांचा सांभाळ करण्यात जात.
जेव्हा त्यांना विचारलं जातं की तुम्हाला काय आवडतं? काय करायचं होतं? त्यांचं उत्तर बरेचदा “माझं कसलं काय वेगळा असणार. आहे ते माझ्या माणसांसाठी, ते म्हणतील तसं.” फक्त बायकाच नाहीततर अनेक पुरुष आयुष्यभर स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी, आपल्या घरातल्यांसाठी जगतात, जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात आयुष्य घालवतात. या सगळ्यात स्वतः जगणं, आयुष्य एक्सप्लोर करणे हे कुठेतरी मागे पडत.
म्हणून इतरांची मना सांभाळताना त्यांची मर्जी राखताना आपला विचारही जरूर केला पाहिजे. कारण तुम्ही इतरांचे मन राखून कितीही आयुष्य जगलात आणि तुम्हाला सर्व मिळालं तरी समाधान मिळणार नाही माझं स्वतःचं अस मी काय जगलो? याच उत्तर तुमच्याकडे नसेल आणि स्वतःचा विचार करण, स्वतःसाठी जगण हा काही स्वार्थीपणा नाही.
आपण तर इतरांचा विचार करत आहोत तर स्वतःसाठी केला पाहिजे कारण शेवटी आयुष्य आपल आहे. आपण याचा विचार केला, आपण याच्यावर प्रेम केलं तर इतर करतील. तर आपल्या मताचा आदर करतील.
म्हणून इतरांचा मान राखताना स्वतःचा मर्जी राखायला शिका, स्वतःच्या मताचा, स्वतःच्या स्वप्नांचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आदर करा. आपला आयुष्य दुसऱ्यांसाठी म्हणून जरी घालवत असाल तरी तेव्हढ्याच शिकस्तीने स्वतःसाठी म्हणूनही जगा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

प्रत्येकालाच आपली कथा आपणच वाचतो आहे असे वाटते. जोडीदाराच्या पूढे जाणे शक्य झाले नाही. काय आता ऊरले ते तरी आनंदात जगायचे ठरवले आहे. तु बरोबर तर तुझ्या बरोबर नाही तर एकटी 🤗🤗🤗