अजून फक्त काही दिवस सहन करूया, असा सतत विचार करणाऱ्या माणसांची मानसिकता.
गीतांजली जगदाळे
(मानसशास्त्र विद्यार्थिनी)
आयुष्यात आपल्याला खूप काही करायचं असतं. नवनवीन जागा बघणं, नवीन गोष्टी अनुभवणं, नवीन माणसांना भेटणं, आणि नवनवीन व अनोखे अनुभव घेणं. असं खूप काही करण्याची अनेकांची इच्छा असते. जवळपास आपल्या सगळ्यांनाच रोजच्या दिनचर्ये व्यतिरिक्त बरंच काही वेगळं करण्याची इच्छा असते. लहान असताना सारं जग आपल्याला छान वाटत असतं, सगळीच माणसं चांगली वाटत असतात आणि जग ही सुंदर भासत असतं.
पण जस-जसे आपण मोठे होतो नवनवीन अनुभव घेतो, कधी चांगले तर कधी वाईट, तेव्हा आपल्याला कळत जग चांगलं किंवा वाईट नाहीए, पण त्यातली माणसं मात्र चांगली आणि वाईट नक्कीच आहेत. त्यातूनही जास्त अनुभव वाईट माणसांचे आले की माणुसकीवरचा विश्वासच उडल्यासारखं होतं. काही लोक अशी भेटतात की गरज नसताना परिस्थिती अवघड करण्याची त्यांना सवय असते. आणि अशा लोकांसोबत आपले संबंध असले की आपल्याही आयुष्यातल्या गोष्टी खराब करायला हे कमी करत नाहीत. त्यातून आपला स्वभाव सहनशील असला की विषयच संपला. ही लोकं बराच काळ आपल्या आयुष्यात तळ ठोकून राहतात कारण आपण यांना सहन करत असतो. सहनशीलता खूप चांगला गुण आहे. पण तो कधी आणि कुठे दाखवायचा हे मात्र कळणं फार गरजेचं आहे, नाहीतर अशी लोकं त्याचा गैरफायदा घेतात.
परिस्थिती किंवा गोष्टी अवघड बनवणाऱ्या व्यक्तींना कधी-कधी जाणीव ही नसते की ते परिस्थिती अवघड करतात. मात्र काही माणसे हेतुपूर्वक त्रास देण्यात ही पटाईत असतात. कधी कधी ही माणसं घरातले कुटुंबीय असू शकतात तर तिथे ठीक आहे कारण mutual नात्यांमध्ये थोडं आपलं थोडं त्यांचं हे दोन्ही कडून सहन केलं जात असतं आणि ते आपल्याला करावं लागतंच. पण आपल्या संपर्कातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चुकीच्या गोष्टी आपण सहन केल्याचं पाहिजेत असं नाहीए. आणि नुसता विचार करणं की पुढल्या वेळी मी याच ऐकून घेणार नाही किंवा याला माझं काम बिघडवून देणार नाही, एवढं पुरेसं नाहीए. त्यासाठी अंमलबजावणी ही करणं गरजेचं आहे.
आपल्या पैकी बरेचसे लोकं न आवडत्या क्षेत्रात काम करत असतात. घर चालवायचं, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या म्हणजे मन मारून हे सगळं करावंच लागतं ,अजून थोडे दिवस करू मग पुढचा विचार करू असं म्हणत-म्हणत आला दिवस ढकलत राहतात. हे चूक की बरोबर खरंतर कोणीच सांगू नाही शकणार, कारण ते म्हणतात ना गरजवंताला अक्कल नसते. आणि असली तरी गरजेपुढे ती चालवता येत नाही.
पण सतत सहन करण्याचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर काय परिणाम होतं असतो याचा विचार आपण करतो का? विचार केला तरी मानसिक स्वास्थ्याचा विचार करणं, त्याची काळजी घेणं ही एक प्रकारची luxury च वाटत असते अनेकांना. म्हणजे शारीरिक किंवा मानसिक स्वास्थ्यापेक्षा बऱ्याच गोष्टी महत्वाच्या वाटू लागतात. गरज कधी ना कधी संपत असते, किंवा खूप कमी वेळा परिस्थिती अगदीच हाताबाहेरची असते तेव्हा सहन करण्याव्यतिरिक्त आपल्याकडे पर्याय नसतो. पण जेव्हा पर्याय असतो तेव्हा मात्र आपण सहन करतोय ती गोष्ट गरजेची आणि आवश्यक आहे का याचा विचार नक्की करावा.
जिथे गरज आहे जस की, कामाच्या ठिकाणी घर चालवायला पैसे हवेत म्हणून आपण काही गोष्टी चुकीच्या असल्या तरी सहन करतो, पण काही ठिकाणी मात्र असं दिसून येत की गरज नसताना माणसे इतर माणसांची बकवास ऐकून घेतात, त्यांचा त्रास सहन करतात, अगदी ते नातेवाईक नसताना देखील,.मग असं प्रश्न पडतो की काय असेल बरं या लोकांची मानसिकता?
१. सगळ्यात मुख्य पॉईंट म्हणजे बऱ्याच लोकांना काय सहन करावं आणि करू नये यातला फरक नीट समजत नाही. आपण सहन करतोय हे त्यांच्या लक्षात येतं पण हे थांबायला हवं हे त्यांना कृतीत करता येतं नाही, त्याच हेच कारण असतं. जो बिहेविअर सहन करतां येण्यासारखा नाहीए त्याला ‘नाही’ चा sign board दाखवणं त्यांना जमत नाही. आणि त्यामुळे फक्त काही दिवस सहन करू म्हणत-म्हणत ते सहनच करत राहतात.
२. अशा लोकांना आतून जो आत्मविश्वास असायला हवा स्वतःसाठी स्टॅन्ड घेण्याचा, तो त्यांच्यात कमी असतो. म्हणजे बाकी बरीच कामे जरी ही लोकं आत्मविश्वासाने करत असली तरी स्वतःसाठी जिथे उभं राहण्याची गरज आहे, आपला विश्वास, आपली नैतिक मूल्ये जिथे जपण्याची गरज असते तिथे त्यांना स्टॅन्ड घ्यायला जमत नाही.आणि म्हणूनच अजून फक्त काही दिवस सहन करूया असा म्हणत म्हणत ते दिवस ढकलत राहतात. बऱ्याचदा चुकीचं वागणं-बोलणं लक्षात येऊन सुद्धा ही माणसं स्टॅन्ड घ्यायला घाबरतात.पण जेव्हा आपल्याला एखाद्याच्या वागणुकीचा किंवा इतर कशाचा त्रास होतं असल्यास आपल्याला ते बोलणं गरजेचं असतं.
३. कधी-कधी भूतकाळात घडलेली एखादी घटना ही स्टॅन्ड घ्यायला नकार देत असते. जसे की भूतकाळात एखादी घटना घडली जी की चुकीची होती आणि आपण त्यासाठी स्टॅन्ड घेतलेला असतो पण त्याचे परिणाम असे होतात की, आपण योग्य साइडला असूनदेखील आपणच चुकीचे ठरवले गेलेले असतो. आणि त्यामुळे स्टॅन्ड घेण्यापेक्षा शांत राहून सहन करत बसण्याची सवय लागून जाते. पण एकदा तसं झालं याचा अर्थ नेहमीच होईल असं नाही. भीती वाटणं साहजिक आहे, पण तरीदेखील हिंमत करून जे योग्य आहे ते करण्याची गरज आहे. पुढच्या वेळी अजून शक्कल लढवून , मोठ्या आवाजात अशा गोष्टींचा विरोध करणं आणि त्यांच्याशी लढणं गरजेचं आहे.
४. आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही की, सतत सहन करणाऱ्या लोकांना काही वेळा जाणीवच नसते की ते खरंतर किती valuable आहेत. आपण प्रत्येकजणच खूप valuable असतो. पण या लोकांना स्वतःचीच किंमत कळलेली नसते. आणि जे त्यांच्याशी वाईट वागतात त्या सगळ्या गोष्टी ते deserve करतात असाही समाज कधी-कधी त्याचा होऊन जातो.कधी कधी अशा लोकांना आपल्याला जी वागणूक मिळतीये किंवा जे काही सहन करावं लागतंय त्यात वावगं असं वाटत नाही कारण आपली लायकी तीच आहे असा गैरसमज त्यांना असतो.
आपल्याला कित्तेक जणांना लहान असताना हे शिकवलंच जात नाही की, आपण किती महत्वाचे आहोत, आणि प्रत्येक माणसाकडे unique असं टॅलेंट असतं जे इतरांच्या उपयोगी पडू शकतं. याची जाणीव नसल्याने आपण अशा गोष्टी आपण सहन करत राहतो, आपल्यातच असणाऱ्या इन्फेरीयॉरिटी मुळे म्हणजेच स्वतःला कनिष्ठ किंवा कमी समजणाऱ्या समजामुळे.आपण अशा गोष्टी सहन करत राहतो ज्या सहन केल्या नाही पाहिजेत.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Very nice