प्रत्येकवेळी काहीतरी चांगलं घडेल याची नुसती वाट बघत बसू नका.
पुजा सातपुते
आपण सर्वजण खूप सारी स्वप्न बघतो आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो पण काही वेळेस काही स्वप्न अपुरीच राहतात. कधी आपल्या करिअरमुळे, कधी संसारामुळे, कधी नशिबामुळे तर बहुतेकदा give up करण्यामुळे.
स्वप्न पूर्ण न झाल्याने आपल्याला नैराश्य येतं. आपण केलेली मेहनत वाया गेली असं वाटतं आणि हळू हळू त्याचं रूपांतर डिप्रेशन मध्ये होतं. मग काहीच करायची इच्छा राहत नाही. नेगेटिव्ह विचार मनात यायला लागतात, चीड चीड वाढते आणि नकळत आपण स्वतःपासून आणि सर्वांपासून दुरावले जातो,स्वतःचं आयुष्य थांबवतो आणि चांगल्या वेळेची वाट बघत राहतो.
ही झाली एक बाजू. आता दुसऱ्या बाजूने विचार करूयात. स्वप्न पूर्ण झाली की किती बरं वाटतं. आपण अगदी सातव्या अस्मानावर असतो. एक नवीन उमेद मिळते. स्वतःसकट आपण इतरांनाही मोटिवेट करायला लागतो. आयुष्य खूप छान वाटायला लागतं.
आपलं मन हे खूप चंचल आहे. परिस्थितीनुसार त्यात सारखा बदल होत असतो. सतत काहीना काहीतरी विचार मनात येत असतात. आपल्या मनात आपण खूप काही करायचं ठरवतो आणि त्यासाठी चांगल्या वेळेची वाट बघत बसतो. कितीदा देवालाही साकडं घालतो, माझ्याबरोबर हे चांगलं झालं तर मी तुझ्या दर्शनाला येईन आणि चांगल्या वेळेची वाट बघण्यात आपला बराच वेळ असाच निघून जातो.
असं म्हणतात की निसर्ग सुद्धा त्यांचीच मदत करतो जे स्वतःच्या आयुष्यात बदल आण्यासाठी प्रयत्न करतात. आपण जे पेरतो तेच उगवतं. तसच आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असतं. म्हणून नुसती चांगल्या वेळेची वाट बघत बसण्यात काहीच अर्थ नाही.
प्रत्येकवेळी काहीतरी चांगलं घडेल याची नुसती वाट बघत बसू नका. आता जो वेळ आहे त्याचा सदुपयोग करा. तुमची महत्वकांशा वाढवा, स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवा की कितीही प्रॉब्लेम्स आले तरी हार न मानता त्यातनं तुम्ही मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकाल. प्रत्येकाला वाईट काळातनं जावं लागतं. सगळे दिवस सारखे नसतात. तसच वाईट दिवसांचही आहे. वाईट वेळ येते आणि निघून जाते. पण त्या वेळेत तुम्ही स्वतःला कसं घडवता हे खूप महत्वाचं असतं.
आयुष्यात फक्त विचार करून उपयोग नसतो. प्रॅक्टिकल खूप महत्वाचं असतं. वाईट वेळेला तुम्ही कसं हाताळता आणि त्याचं चांगल्यात कसं रूपांतर करता हे खूप महत्वाचं आहे. कठीण प्रसंग, परिस्थिती माणसाला घडवते नाहीतर बिघडवते आणि बरेचदा आपण आयुष्यातल्या सोन्या सारख्या संधी नुसत्या वाट बघण्यात घालवून टाकतो.
प्रत्येकाकडे चोवीस तास असतात. त्या वेळेचा तुम्ही कसा उपयोग करता यावर सगळं अवलंबून आहे. आजचं काम उद्यावर ढकलत बसले तर पुन्हा तो दिवस आणि ती संधी मिळत नाही. जास्त विचार केल्याने मनात काहूर निर्माण होतो आणि त्यातनं आपल्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे आपल्याला कळत नाही.
चांगली वेळ ही कधीच चालून येत नाही. ती आपल्याला आणावी लागते. पॉसिटीव्ह विचाराने, प्रयत्नाने आणि शांतपणाने. न घाबरता आणि न डगमगता प्रत्येक क्षणाचा योग्य वापर केला तर तुमचं आयुष्य हे कधीच एका ठिकाणी थांबून राहणार नाही. तुम्हाला रोज काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि स्वतः मध्ये पॉसिटीव्ह बदल करण्याची संधी मिळेल.
प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करा, काहीतरी नवीन शिका, वाचन करा, तुम्ही जर पॉसिटीव्ह विचार करायला लागले तर आपोआप सर्व चांगलं वाटायला लागेल. वाईट दिवसात हार न मानता जर तुम्ही तुमच्या भाविष्यासाठी पेरायला सुरुवात केली तर आपोआप तुमच्या आयुष्यात चांगली वेळ येणार आणि चांगल्या वेळेत जर तुम्ही तुमचे पाय जमिनीवर ठेवले तर वाईट दिवस झेलण्याची शक्ती देखील मिळणार.
आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि चांगल्या वेळेची नुसती वाट बघण्यात तुमचं व तुमच्या खास लोकांचा वेळ वाया घालवू नका. कधी कधी स्वतः बरोबर आपण नकळत इतरांनाही अडवत राहतो. प्रत्येक संधीचा फायदा घ्यायला शिका. फार तर फार अपयश येईल पण हेच अपयश तुम्हाला यशाकडे नेण्यास मदत करेल.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Very nice👍
मनाला खूप ध्येर्य देण्याचं काम आपल मानस शास्त्र करत असतं.