Skip to content

मी पणाच्या अविर्भावात जगणारी माणसे कायमच इतरांच्या प्रेम, आपुलकीपासून दुरावलेले असतात.

मी पणाच्या अविर्भावात जगणारी माणसे कायमच इतरांच्या प्रेम, आपुलकीपासून दुरावलेले असतात.


मेराज बागवान


प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते.प्रत्येकाला आपले एक मत असते.विचार असतात.तत्वे असतात. आणि एकंदरीतच प्रत्येकाचे असे एक ‘व्यक्तिमत्व’ असते. आणि असलेच पाहिजे.पण स्वतःचा विचार करता करता आपल्या सभोवताली असणारी माणसे विसरून नाही ना चालत? म्हणजेच फक्त ‘मी’ पणा असून उपयोग नाही. स्वाभिमान जरूर असावा, पण ‘मीच’ योग्य हा अविर्भाव काही कामाचा नाही.कारण ‘मी’ पणाच्या अविर्भावात जगणारी माणसे कायमच इतरांच्या प्रेम, आपुलकीपासून दुरावलेले असतात.

जेव्हा एखादी व्यक्ती फक्त मीच बरोबर, असे नेहमी मिरवीत असेल तर त्यावेळी इतरजण काय म्हणत आहेत याचा विचार केला जात नाही , त्यामुळे अनेकवेळा ही माणसे दुखावली जातात.त्यांची मते विचारात न घेतल्यामुळे त्यांना वाईट वाटते. सर्व काही मी म्हणेन तसेच व्हायला पाहिजे असा अट्टाहास ठेवला तर इतरजण त्या व्यक्तीच्या दूर जाऊ लागतात.आपुलकी हळूहळू कमी होऊ लागते.

अनेक जवळच्या नात्यांमध्ये, अगदी घरामध्ये देखील काही सदस्य ‘मी’ पणा धरून बसतात.’मी केले म्हणून झाले, मी नसतो तर कसे झाले असते,मी होतो म्हणून…वगैरे’ असे संवाद देखील काही घरात ऐकायला मिळतात.यामुळे काय होते, तर घरातील इतर सदस्य त्या व्यक्तीपासून हवी तशी जवळीक साधू शकत नाहीत.आपलेपणा राहत नाही.त्या व्यक्तीचे कौतुक करण्याऐवजी फक्त नावापुरती नाती उरतात, कारण प्रत्येक वेळी ती व्यक्ती ‘मी’ पणा दाखवत राहते.

पती-पत्नी च्या नात्यात देखील कित्येक वेळा ‘मी’ पणा आडवा येतो.’मीच का नेहमी समजून घ्यायचे, मीच का नेहमी माफी मागायची, मीच का प्रत्येकवेळी स्वतःहून बोलायचे’ असा दृष्टिकोन पहावयास मिळतो.ह्या ‘मी ‘ पणामुळे मात्र नाती दुरावतात.आणि प्रेम, जिव्हाळा हळूहळू लोप पावत जातो.

काही वेळेस मैत्रीच्या नात्यामध्ये देखील, ‘मीच का दरवेळी फोन करायचा, तिला गरज असेल तर करेल की, तिने फोन केला होता,पण मी नाही उचलू शकलो, मग करू दे जी त्याने फोन, त्याचेच काम असेल’ असे देखील काही संवाद पहावयास मिळतात. या सगळ्यात मैत्रितील ओढ लवकर तुटते.

आजकाल ‘सोशल मीडिया’ चा जमाना आहे.त्यामुळे आजकाल ‘आभासी बोलणे, चॅटिंग’ वाढले आहे.आणि यात देखील ‘मी’ पणा मध्ये येतो.’ मीच का स्वतःहून नेहमी मेसेज करायचा, मीच का वारंवार त्याचे स्टेटस पाहून रिप्लाय करायचे’ अशा प्रकारचा ‘मी’ पणा देखील नेहमीच सुरू असतो.यामुळे नात्यांमधील गैरसमज वाढीस लागतात आणि सुसंवाद खुंटतो.

पण खरेच गरज असते का एवढ्या पातळीवर ‘मी’ पणा मिरवण्याची? ही आपलीच माणसे आहेत ना, मग ग घेऊयात की समजून त्यांना.काय होते , स्वतःहून बोलले तर, काय होते , इतरांचे देखील मत विचारात घेतले तर? इथे कोणीच परिपूर्ण नाही.मग हा ‘मी’ पणा हवा कशाला?

‘मी’ पणा मुळे प्रेम लोप पावते.आपुलकी जिवंत राहत नाही.भावनिकता राहत नाही. नात्यांमध्ये सुद्धा व्यवहार येतो. मग माणूसपण कुठेतरी कमी पडू लागते.आणि शेवट, मी पणाच्या अविर्भावात जगणारी ही माणसे कायमच इतरांच्या प्रेम, आपुलकीपासून दुरावलेली जातात.

अशा व्यक्तींबद्दल माणसे विचारच करीत नाहित.त्यांना सन्मान देऊ शकत नाहीत.संवाद साधू शकत नाहित. उरतो तो फक्त ‘कोरडेपणा’. प्रेम ही तर खूप सुंदर गोष्ट आहे. त्याने जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो.पण ह्या मी पणा मुळे हे प्रेम देखील कायम ‘एकतर्फी’ च राहते. ‘मी’ पणा मुळे , समोरची माणसे दुखावली जातात. ते त्यांच्याबरोबर मन मोकळे करू शकत नाहीत.

अशा ह्या ‘मी’ पणा मुळे , अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ‘मी’ पणा असलेली व्यक्ती अनेकदा ‘एकटी’ पडते. कोणीच त्याला आपलेसे करू शकत नाही आणि ती व्यक्ती देखील कुणाची होऊ शकत नाही.

म्हणूनच स्वाभिमान जरूर असावा पण ‘मी’ पणा नसावा.चला तर मग , नाती जपुयात.कुणासाठी तरी थोडे स्वतःला ‘जुळवून’ घेऊयात. चुकल्यानंतर मोठ्या मनाने माफी मागूयात. इतरांची काळजी घेऊयात. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच अनेक नाती जपली जातात.आयुष्याला एक अर्थ प्राप्त होतो.प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वाढीस लागतो.आणि जिथे ‘प्रेम’ असते तिथे सकारात्मकता असते, जी प्रत्येकाला जीवन जगायला शिकवीत असते.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!