Skip to content

मला वेश्या व्हायचं नव्हतं – एक हुंदका !

एक हुंदका : मला वेश्या व्हायचं नव्हतं


सौ. माधुरी पळणिटकर

मोबा. 9921495533


वेश्या हा शब्द ऐकूनच काहीजण नाक मुरडतील तर असा विषय लिहायला का घ्यायचा असेही म्हणतील. तर काहीजण वाचण्याची तसदी घेणार नाहीत; परंतु हा व्यवसाय वाईट असला तरी या चक्रात कोवळ्या मुली व महिलांना बळजबरीने ढकलले गेले आहे.

या व्यवसायात अडकलेल्या सगळ्याच महिला स्वखुशीने येत नाहीत. ही त्यांची व्यथा आहे. तिच्या आत ‘स्त्री’ आहे. कुणातरी नराधमांच्या जाळ्यात अडकून तिच्या आयुष्याची राखरांगोळी झाली आहे. या व्यवसायात ज्या गरीब मुलींना जबरदस्तीने आणले जाते त्यांची तिथून सुटका कधीच होत नाही. त्यांच्यावर देहविक्रय करण्यासाठी अत्यंत क्रूर पध्दतीने अत्याचार केले जातात. कुंटणखाण्यात त्यांना डांबतात. गुरासारखे वागवतात.

वास्तविक ज्यांचा सहभाग हे कृत्य करण्यामागे असतो त्यांना कडक शिक्षा मिळायला हवी. त्यांना शोधून त्यांचीच धिंड निघायला हवी. कारण त्यांच्यामुळे एका स्त्रीवर प्रथम बलात्कार मग रोजच बलात्कार. लोक वेश्यांचा तिटकारा करतात; परंतु जे त्यांच्याकडे जातात त्यांना समाज चुकीचे ठरवत नाही.

पुरुषांच्यामुळेच वेश्या व्यवसाय चालतो. पुरुष वेश्याकडे गेले नाहीत तर हा व्यवसाय बंद होईल. मी टू द्वारे अनेक घटना उघडकीस आल्या; परंतु हेही सत्य आहे की कित्येक अभिनेत्री व मॉडेल्स अशाही असतात की ज्या फक्त प्रसिध्दी मिळवण्यासाठी हे कृत्य करतात.

वेश्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक उच्चभू्र समाजातल्या पण त्यांच्याकडे कधीच घृणास्पद नजरेने पाहिले जात नाही. दुसर्‍या गरीब वस्तीतल्या. पण दोघींच्या जीवनात तफावत आहे. मी टू मध्ये जे दिग्दर्शक व निर्माते समोर आले ते काय दर्शवते? हेच की तुम्ही कामांधच आहात, पण लोकांसमोर तुमची प्रतिमा चांगली आहे. स्त्रीचा वापर आणि व्यापार सुरु आहेच.

वेश्यांकडे ज्यांचे पाय पळतात त्यांचे संसाराचे सुख धुळीला मिळते. या व्यवसायामुळे एड्स, गुप्त रोगाचाही प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. या व्यवसायामुळे स्त्री जातीची आणि पर्यायाने संपूर्ण मानव जातीची अधोगती होत आहे. यातला मुद्दाही लक्षात घेण्यासारखा आहे. त्या आहेत म्हणून समाजातील महिला सुरिक्षत आहेत. कारण या वासनांधांना त्यांची वासनेची भूक भागविण्याची ही सोय आहे.

सध्या काही महिला किंवा मुली फक्त पैशांसाठी हा व्यवसाय करतात. पैशाची भूक भागविण्याकरिता शरीर विक्रय करणे त्यांना वावगे वाटत नाही. हाच आपली संस्कृती लोप पावल्याचा पुरावा होय. वेश्यांकडे जे पुरुष जातात त्यांना आपल्या पत्नीशी आपण प्रतारणा करत आहोत असे वाटत नाही. यात काहीच गैर नाही असे त्यांना वाटते. ज्या स्त्रियांचा ते वेश्या म्हणून उपभोग घेतात तिलाच समाजात नावे ठेवतात.

समाजात पुरुषाने काहीही केले तरी त्याच्यावर कुठलाही डाग लागत नाही. आता तर ‘कॉल गर्ल्स’चा धंदा उघडपणे सुरु झाला आहे. घरी मसाजसाठी बोलवा अशा जाहिराती दिसतात. त्याच्याखाली नंबर असतो.

अनैतिक मार्गाने सुरु असलेले हे वाढलेले अनैतिक व्यवसाय समाजाचीच अधोगती दाखवतात. प्रेम म्हणजे फक्त सेक्स हीच दुर्देवाने प्रेमाची व्याख्या झाली आहे. पाश्‍चात्य देशात हे सर्रास चालते.
आजकाल खूप जणांचे एक्स बॉय फ्रेंड व गर्लफ्रेंड असतात.

वेश्या व्यवसायाच्या दलदलीतून कशाबशा सुटलेल्या महिलांचा समाज स्वीकार करत नाही. त्यांच्यावर ‘वेश्या’ हा डाग लागला की त्यांचे आयुष्य, त्यांच्या इच्छा, त्यांच्या यातना याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश दिला जात नाही.

वेश्यांच्या मुलांना शिक्षणाची गरज काय? तिची मुलगी वेश्याच होणार आणि मुलगा दलाल असला विषारी विचार समाजातून व्यक्त होतो. वेश्या व्यवसाय हा जगातील सगळ्यात पुरातन व्यवसाय समजला जातो.

ग्रीक व रोमन काळातील ग्रंथांमध्ये वेश्यावृत्तीचे उल्लेख आढळतात. भारतामध्येही वेश्या व्यवसाय पूर्वापार चालत आला आहे. पुरुष प्रधान सामाजिक व्यवस्थेमध्ये स्त्रीकडे नेहमीच उपभोगाचे साधन म्हणून पाहिले जाते.

वेश्या व्यवसाय करणारी स्त्री कलंकित व हीन समजली जाते. तरीही वेश्या व्यवसाय समाज व्यवस्थेत टिकून आहे. कधी बाईची फसवणूक करत तिला वेश्या व्यवसायात ढकलले जाते. निरुपाय म्हणून कधी अनिच्छेने ती या व्यवसायात राहते. काहीजणी उघडपणे तर काही छुप्या पध्दतीने हा व्यवसाय करतात.

घरच्यांसाठी त्यांना पैसा कमवायचा असतो. तथाकथित सभ्य नोकर्‍या जेव्हा त्यांना मिळत नाहीत तेव्हा शेवटचा उपाय म्हणून या गरीब महिला वेश्या व्यवसायात येतात. या दुर्देवी महिलांच्या व्यथा समजून घ्यायला हव्यात. वेश्या व्यवसाय योग्य नाहीच.

अजूनही देवदासींच्या मुली देवदासी होतात. दुर्देवाने 16 वर्षांआतील मुलींना वेश्या व्यवसायात अधिक मागणी आहे. पुरुषांची कामांध वासना इतकी वाढत चालली आहे की कोवळ्या मुलींनाही ते सोडत नाहीत. वेश्या पण एक स्त्री असते तिलाही मातृत्वाची ओढ असते. पण इथे जर मुलीला तिने जन्म दिला तर कोठेवाले, दलालांना विशेष आनंद
होतो. कारण व्यवसायाच्या साधनात भर पडली. इतका किळसवाणा विचार त्यांच्या डोक्यात असतो.

कधी कोणी विचार केलाय ? या स्त्रिया कोणत्या परिस्थितीतून जात असतील ?

त्यांना इच्छेविरुध्द रोज शारीरिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. तिची मानसिक स्थिती काय होत असेल? अनेक वेश्या नेपाळी असतात त्यांच्याच घरातल्या लोकांनी त्यांना या नरकात ढकललेले असते. त्यांच्या जगात फक्त अंधार असतो. त्यांच्या जीवनात स्वातंत्र्याची सकाळच नसते.

चांगल्या घरातल्या विवाह करुन आणलेल्या काही मुली त्यांच्या नवर्‍याने विकल्याने वेश्या झाल्या आहेत. सहेली, एचआयव्ही, एड्स कार्यकर्ता संघ या पुण्यातील वेश्या व्यवसायातील महिलांसाठी काम करणार्‍या संघटना.

अनेक कारणांमुळे वेश्या व्यवसायात आलेल्या, समाजाने अव्हेरल्या गेल्याने सर्व नात्यांवरचा विश्‍वास उडालेल्या महिला संघटित झाल्या. मुलींनी या व्यवसायात येऊ नये म्हणून या महिला धडपड करत आहेत. जे माझं झालं ते दुसरीचं होऊ नये हा उद्देश या संस्थेतील महिलांचा आहे.

वेश्या वस्तीतील महिलांचे पुनर्वसन ही एक गुंतागुंतीची बाब आहे. पोलिसांच्या धाडी पडल्यावर त्यांना आधारगृहात डांबणे म्हणजे पुनर्वसन नाही. घर मालकीण आणि दलाल यांना क्वचितच अटक होते. अटक झालीच तर दंड भरुन ते तुरुंगातून सहीसलामत सुटतात आणि पुढच्या मुलींचा बळी घ्यायला मोकळे होतात.

या संस्थेत पुरुषांनी स्वत:हून बायकांना या धंद्यात ढकललेल्या स्त्रियांची संख्या जास्त आहेच. आपण कमवू शकत नाही म्हणून पत्नीला या दलदलीत ढकलून तिच्या कमाईवर चैन करणारे पती म्हणून मिरवणारे महाभाग आहेत.

काही महिन्यांपूर्वीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लाच म्हणून पोलिसांनीच शरीर सुखासाठी तीन तरुणींची मागणी केल्याचे उघड झाले. नागपूरमधील दोन पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणार्‍या महिलेकडून तीन वेश्या आणि 35 हजार रुपयांची मागणी केली. पोलीस उपनिरीक्षक दामोदर राजूरकर आणि पोलीस हवालदार शीतलप्रसाद मिश्रा अशी या नराधमांची नावे आहेत. जनतेचे रक्षण करणे हे पोलिसांचे काम पण अशा घटना हेच दाखवून देतात की आतले चेहरे हवस, कामांध वासनेचे आहेत. बाहेर एक चेहरा आतून दुसरा. असल्या नराधमांना कातडी सोलेपर्यंत पट्ट्याने मारले पाहिजे. अटक झालेल्या स्त्रीवर पोलीस चौकीत बलात्कार करणार्‍यांना अशीच
शिक्षा हवी.

स्नेहालय ही अहमदनगर शहरातील एक संस्था! या संस्थेची स्थापना 1989 मध्ये झाली. लालबत्ती भागात, देहव्यापार्‍यात अडकलेल्या महिला आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन समाजाला हे दाखवून दिलं आहे की वेश्यांचे पुनर्वसन व त्यांच्या मुलांचे पुनवर्सन हेही तितकेच आवश्यक आहे. त्यांनी विविध प्रकल्प राबवून शेती, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, व्यावसायिक प्रशिक्षण यातून त्यांचे आयुष्य सुखकर केले आहे.

उत्कर्ष आणि माहेर या संस्था वेश्यांच्या मुलांसाठी चैतन्य महिला मंडळाद्वारे पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या वस्तीतच पाळणाघरे चालवतात. त्यांची वेळ संध्याकाळी 6 ते सकाळी 9.30 आहे. मुले आईविना राहू शकत नाहीत. त्यामुळे हे दलाल या मुलांना गुंगीचे औषध देऊन झोपवतात. हे वास्तव समोर आल्यावर पाळणाघरांची निर्मिती केली गेली.

खरोखरच या वेश्यांचे जीवन जगणं नाही रोजचेच मरण आहे. वेश्या म्हटल्या की सगळ्याच वाईट हेच चित्र समाजात आहे. त्यांच्यावर अत्याचार करुन पुरुषांनी त्यांना वेश्या होण्यास भाग पाडलं.

वासनांध पुरुष कधी बलात्कार करतात, कधी निष्पाप कळ्यांना वेश्या बनवतात आणि समाज बलात्कारी स्त्रीला जगून देत नाही. त्यांचीही एक बाजू आहे. त्यांच्यातही एक स्त्री आहे. या नराधमांमुळे वेश्या
कलंकित आहेत.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “मला वेश्या व्हायचं नव्हतं – एक हुंदका !”

  1. जर मुलीला मोबाईल देणे बंद केले तर तिचा विकास कसा होईल या वर्तमान काळात सगळं ऑनलाईन झालंय. मो. द्यायला पाहिजे पण एका स्पेसिफिकेश वेळासाठी आणि त्यांना अलर्ट करायला पाहिजे, जागोजागी या वर जनजागृती साठी भाषण झाली पाहिजे, मोठ्यांनी प्रेमाने त्यांचे अनुभव लहान्यांन सोबत share करायला पाहिजे, आणि एक सगळ्यात मोठी गोस्ट मध्ये मुलीला घरातून एडुकेशन साठी काहीच कमी नाही झालं पाहिजे, तिचे विचार जाणून घ्यायला पाहिजे, तिच्या सोबत आई वडिलांनी एका मित्र मत्रिणीं सारखा स्वभाव ठेवायला. आणि स्त्रियांना या व्यवसायात अडकवायचे नसेल तर वयात आलेल्या मुलांनी आणि तरुण माणसानी स्त्रियांची respect करायला पाहिजे आणि मुलांनी सुद्धा एकाच मुली सोबत प्रेम करून आयुष्य सोबत काढायचं वचन दिल पाहिजे…. मुली मग काय या ek झाला ek असा शोधल…. कोवळ्या वयात असणाऱ्या, दुनियादारीची समज नसणाऱ्या मुलीच्या आब्रू सोबत खेळतात आणि स्वतःची हवंस भागवतात…… आणि मग तिला प्रेमाची सवय होते तर तिला सोडून देतात आणि नंतर त्याच मुलीला नाव ठेवतात…….. नालायक कुठले मर्द जात????
    माझ्या तोंडून काही अपशब्द निघाले असेल तर माफी असावी ?

  2. पहिला आपल्या मुलीला फोन द्यायच बंद केल पाहिजे कारण फोन मुळे मुली प्रेमात पडत आहे. आणि असे करून त्याना सेक्स ची लत लागते . व पहिला सोडून गेला कि दुसरा . दुसरा गेला कि तिसरा . न जाणे 1का मुलीच्या अविष्यात किती जण झाले . त्या मुळे मुलीला फोन देणे आपणच स्वता बंद केले तर खूप कृपा हुईल . आई वडील विचार करतात कि माझी मुलगी शाळेतील अभ्यास वेवस्थित करावे. व घरातील लोकांचे नाव मोठ करावी . पण तस काही होत नाही …… माझ्या कमेंट चा स्वीकार करावा…. धन्यवाद ????????

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *