Skip to content

पुष्कळदा ‘ पुढाकार कोण घेणार ?’ या एका गोष्टीमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.

पुष्कळदा ‘ पुढाकार कोण घेणार ?’ या एका गोष्टीमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.


हर्षदा पिंपळे


कोकणातील दुर्वा कॉलनीतील मोदक नावाच तिसऱ्या क्रमांकाच टुमदार घर म्हणजे सुकन्या काकूंच घर.सुकन्या काकूंची मुलं परदेशात नोकरीला असल्याने गणपतीला वगैरे येणं त्यांना शक्य व्हायच नाही.वर्षातून एकदाच दिवाळीला त्यांची मुलं घरी यायची.त्यामुळे कॉलनीतील रेवा आणि तिची झुंबड काकूंकडे गणपतीच्या सजावटीसाठी यायचे. पण यंदा रेवाही मदतीला नव्हती. कामानिमित्त ती बाहेरगावी गेली होती. त्यामुळे मुख्य कर्ता करविता नसल्याने बाकी कुणी यावेळेस पुढाकार घ्यायला तयारच नव्हतं.रेवासारखं कुणी स्वतःहून तयार नव्हतं.म्हणून सुकन्या काकू जरा चिडल्या होत्या.

“जरा म्हणून कुणाला पुढाकार घ्यायला नको.काही जबाबदारी वगैरे आहे की नाही…?दरवर्षी आपण इतकी छान तयारी करतो.मग यावेळी काय झालं..?सगळं काय रेवानेच करायच का…?आणि यावेळेस तर रेवाही नाही.काय करणार तुम्ही…?कोण करणार सगळं नियोजन…?गणपती तर जवळ आले आहेत.सगळा पसारा ,सगळी आवराआवर तशीच आहेत.कुणी काही करणार आहे की नाही ?”

सुकन्या काकू जरा तावातावानेच बोलल्या.

हे ऐकून चिंगी-मिंगी,बोक्या-मनी सगळ्यांनीच माना खाली घातल्या होत्या.माना खाली गेल्यामुळे काकूंना वाटलं की आता तरी यांना फरक पडला असेल.काकू वाट पहात होत्या की कुणीतरी पुढे येऊन म्हणेल

“मी करतो यंदा….तुम्ही निर्धास्त रहा.” पण खरं तर असं काहीही झालं नाही. सगळे माना खाली घालून आपापल्या घरी निघून गेले होते. काकू सगळं काही करण्यात तरबेज होत्या. पण मुलांमध्ये चांगले गुण वाढीस लागावे म्हणून त्या हा सगळा खटाटोप करायच्या.काकूंनी ठरवलं होतं जोपर्यंत कुणी काही पुढाकार घेत नाही तोपर्यंत आपणही काही करायच नाही. “बघुयात तरी कोण पुढाकार घेतय…?” असं म्हणत काकू उरलेली सुरलेली कामं आटपायला लागल्या.

गणपती यायला आता फक्त दोन दिवस उरले होते.पण कुणीच काही करायला आलं नव्हतं. शेवटी एकच दिवस उरला तरीही कुणी पुढाकार घेतला नाही.पण नंतर वेळ आली ती गणपती आगमनाची.सगळीकडे छान सजावट झाली होती.

सुकन्या काकूंच घर मात्र अजूनही सजावटीच्या प्रतिक्षेत होतं.कुणीच पुढाकार घेतला नाही म्हणून अवस्था जशीच्या तशीच होती.शेवटी नाईलाजाने काकूंनीच पुढाकार घेत आवराआवर केली आणि बाप्पाला घरी आणलं.आणि नंतर मात्र एकानेही पुढाकार न घेतल्यामुळे काय झालं…? हेही त्यांनी मुलांना समजावून सांगितलं.बोक्या-मनीचे तर चांगलेच कान पिळले.

पुढाकार घेणं किती आवश्यक असतं याविषयी चिंगी-मिंगीला चांगलच ज्ञान दिलं.

पहा,काकूंनी पुढाकार घेतला म्हणून बाप्पा सुंदर आरासामध्ये विराजमान झाले.काकूंनी पुढाकारच घेतला नसता तर गोष्ट पुढे गेलीच नसती.

आपल्या आयुष्यातही असे बरेच छोटे मोठे प्रसंग येतात तेव्हा आपल्याला पुढाकार घेणं आवश्यक असतं.आणि अनेकदा आपल्यापैकी बरेचजण पुढाकार घ्यायला मागत नाही. मी नाही म्हणून आधीच नकारार्थी मान डोलावतात. मी करतो म्हणून कुणीच पुढाकार घेत नाही.एखादी गोष्ट करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणं खूप महत्त्वाच असतं.अन्यथा कितीतरी प्रश्न कितीतरी गोष्टी या अनुत्तरित राहतात, अपूर्ण राहतात.

एकाने जरी पुढाकार घेतला नं तरी प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात होते. गोष्टी पुढे जायला लागतात. एकाच ठिकाणी त्या अडकून राहत नाही.इतकच नाही तर कधी कधी समोरचा पुढाकार घेईल असं गृहमंत्री धरून आपण स्वतःही पुढाकार घेत नाहीत. अशाने प्रश्न सुटणार तरी कसे…?

पुढाकार घेणं हे एक लीडरशीप स्किल आहे. आणि ते प्रत्येकाने शिकून घ्यायला हवं. कारण ती गरज आहे. आयुष्यातील प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील,आयुष्याच्या न पाहिलेल्या सुंदर वळणावर प्रवास करायचा असेल तर पुढाकार घेणं आवश्यक आहे. पुढाकार घेणं कम्पलसरी आणि नेसेसरी आहे. त्यामुळे हा येईल, तो येईल असा विचार करण्यापेक्षा स्वतःहून पुढाकार घ्यायला शिका.इतरांची वाट पाहण्यात   वेळ घालवाल तर आयुष्य आहे तिथेच पडून राहिल.

So…शक्य होईल तितकं, जमेल तसं पुढाकार घ्यायचा प्रयत्न करा.आणि आज नाही तर कधी याचाही विचार नक्की करा.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!