त्रास करून घेतला की कशाचा ही त्रास होऊ शकतो.
गीतांजली जगदाळे
जीवन सारे दोन क्षणाचे हसा तोवरी रडू नका,
व्यर्थ जीवाला नका त्रासवू बाऊ कशाचा करू नका!
फुलापरी हो जीवित अपुले दुसऱ्या दिवशी हो निर्माल्य,
भीती जनाची कशास धरीत सतत उराशी ते शल्य !
कोणी कुणाला बरे न म्हणती शिव्याशाप ते सर्वां देती ,
ऐसे असता चाड तयांची का बाळगिता दिनराती!’
वपु काळे यांच्या ‘दोस्त’ या पुस्तकातील ही कविता! किती मार्मिक आहे या ठिकाणी.. नाही ? जीवनात खूप अशा गोष्टी घडतात ज्या खरंच त्रासदायक असतात माणसाला, पण त्या जितक्या त्रासदायक असतात त्यापेक्षा जास्त काळ त्रास आपण करून घेत बसतो हे ही तितकच खरं.
जेव्हा आपण एखादा चांगला विनोद ऐकतो तेव्हा आपल्याला खूप हसू येत, पण तोच विनोद आपल्याला दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा आणि वारंवार सांगितल्यास आपलं हसू कमी होऊन एक क्षण असा येतो की त्याच चांगल्या विनोदावर आपल्याला थोडं ही हसू येत नाही. पण तेच मात्र आयुष्यात काही वाईट घडलं किंवा मनासारखं नाही झालं तर मात्र आपण कित्तेक वर्ष कित्तेक दिवस ते आठवून आठवून त्याच दुःख किंवा त्रास करत राहतो.
मग एकाच विनोदावर आपण परत परत हसत नसू तर एकाच गोष्टीवर आपण परत नव्याने त्रास कसा करून घेतो? म्हणजेच काय तर माणसाचं आयुष्य किंवा नशीब तितकंसं त्रासदायक नाही जितकं आपण त्याला बनवतो स्वतः गोष्टींचा त्रास ओढवून.
नीट बारकाईने विचार केला असता असं लक्षात येईल की आपण खूप सहजतेने आपल्याला त्रास देण्याचं बटण किंवा रिमोट इतरांच्या हातात दिलेला असतो. म्हणजे काही लोकांना तर शेजारच्याने नवीन टीव्ही घेतला या गोष्टीचा ही त्रास होऊ शकतो.. खरंच हे काय त्रास होण्याचं कारण आहे का? हा त्रास होतो म्हणण्यापेक्षा करून घेतला जातो असच म्हणणं योग्य ठरेल कारण ही काय वाईट घटना नाहीए ज्याने त्रास व्हावा, पण ही एक मानसिकता असल्या कारणाने एखादा मनुष्य त्रास करून घेतो.
आजूबाजूला बघितलं असता असं लक्ष्यात येईल की खरंच काही माणसांचं आयुष्य आपल्यापेक्षा किती अवघड असत म्हणजे अशी तुलना करणं चुकीचं च आहे म्हणा कारण प्रत्येक माणूस जसा अद्वितीय तसेच त्याच आयुष्य सुद्धा. आपली संकटे, आपले विचार, आपली परिस्थिती सगळंच कसं वेगळं असत त्यामुळे तुलना करणं चुकीचं आहे.
पण जिथे आपण सिनेमाला जायला मिळत नाही, हॉटेलिंग करायला मिळत नाही किंवा बरोबरीच्या मित्र-मैत्रिणींप्रमाणे गोष्टी करायला मिळत नाही म्हणून त्रासात असतो तिथे कोणीतरी एक वेळच्या अन्नासाठी तळमळत असत. खरे त्रास हे वेगळेच असतात आणि आपण करून घेतो ते वेगळेच. कारण खरे त्रास हे संपणारे असतात आणि आपण मनाने ओढवून घेतलेले न संपणारे! आहे त्यापेक्षा जास्त त्रास करून घेण्याची माणसाची वृत्ती फार वाईट!
या दोन क्षणाच्या जीवनात किती त्रास करून घ्यायचा, या जीवनात प्रत्येक गोष्ट ही काही काळापर्यंतच असते. जस की आनंद, दुःख , आई वडील , मित्र-मैत्रिणी, इत्यादी. त्यामुळे ज्या त्या काळात सगळं अनुभवायचं सगळ्याची मजा घ्यायची. त्रासात ही मजा करणारी, दुसऱ्याला आनंद देणारी काही माणसे बघायला मिळतील.
त्यामुळेच ते जर करू शकतात तर आपण का नाही, किमान इतर लोक आपल्या बद्दल काय विचार करतात, काय बोलतात या अशा गोष्टींपासून त्रास करून घेणं बंद केलं पाहिजे. कोणाकडे काय आहे आणि आपल्याकडे काय यापेक्षा आपल्याला गरजेचं आहे ते आपल्याकडे आहे ना मग झालं तर!
मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, न टळणारा, त्यामुळे कुठेतरी याचा सुद्धा किती त्रागा आपण करू घेतो याच्याकडे ही आपण लक्ष देऊ या. इतर लोक काय करतात यापेक्षा आपण काय करतो, कसे वागतो, कोणत्या गोष्टीवर आपली कशी प्रतिक्रिया असते आणि ती कितपत गरजेची असते, आपले विचार काय आणि कसे असतात याकडे थोडे लक्ष दिले असता आपले अर्ध्यापेक्षा जास्त त्रास तर इथेच संपून जातील.
त्यामुळे त्रास कसलाही असुद्या तो कितपत करून घ्यायचा आणि कधी आणि कसा थांबवायचा हे आपल्या हातात असत.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


