आपले विचार सकारात्मक बनवा!!
बी. के. नीता
मनुष्याचे जीवन अनेक रहस्यांनी भरलेले आहे. आपला वर्तमान फक्त या जन्माचा नाही परंतु पुर्वजन्माच्याअनेक घटनांशी जोडलेला आहे.‘कर्म सिद्धान्त’ ह्या विषयावर प्रकाश टाकणारे साहित्य आपल्याकडे आहे परंतु प्रत्येक कर्माची सुरुवात आपल्या मनात उठणाऱ्या संकल्पांनी होते. हे संकल्पांचे चक्र आपल्या मनाला तसेच बाह्य परिस्थितींना ही प्रभावित करते कारण आपल्या मनामध्ये असीम शक्ती आहे.
‘आपले मन एक चुंबक आहे, ते ज्याप्रमाणे विचार करते त्या अनुसार ते आकर्षित करते’ –Andrew Matthew .
प्रत्येक वस्तूची निर्मिती प्रथम विचारांमध्ये आणि मग ती भौतिक रुपात होते. यद् भवंतद भवन्ती अर्थात मनात येणारा सकारात्मक अथवा नकारात्मक विचार जर वारंवार येत असेल तर तो देखील वास्तवात बदलेल. म्हणून आपल्या मनाला प्रशिक्षित करायला हवे. जेणे करून ते सदैव सकारात्मक विचारच करेल. असे केल्याने आपलं जीवन सुखी व आनंदी होईल . प्रत्येक विचार एक ऊर्जा आहे व त्याचा परीणाम सर्वप्रथम शरीरावर होतो. उदाहरणार्थ – कैदी. फ्रान्स मध्ये एका कैद्याला फाशीची शिक्षा दिली गेली. ही बातमी ऐकून बाह्य मन आणि अंतर्मनावर प्रयोगकरणाऱ्याकाही डॉक्टरांनी त्या कैद्याला आपल्या वैद्यानिक प्रयोगाने मारण्याची कोर्टाकडून परवानगी मिळवली.
कैद्याला एक पलंगावर झोपवून त्याला त्याचा मृत्यू कसा होणार आहे हे सांगण्यात आले, ‘ आम्ही हळूहळू तुझ्या शरीरातील सर्व रक्त काढणार आहोत. शरीरातून एक बाटली रक्त काढल्यानंतर तुला थोडा घाम येईल….. दुसरी बाटली काढल्यानंतर तुला अशक्तपणा वाटेल…… तिसरीबाटली काढल्यानंतर डोळ्यासमोर अंधारी येईल…… चौथी बाटली काढल्यानंतर तुझी इंद्रीय काम करण बंद करतील….. मग तू बेशुद्ध होऊन पडशील आणि त्यानंतर हळूहळू तुझा मृत्यू होईल.
अश्याप्रकारे त्या कैद्याच्या शरीरातून एकेक बाटली रक्त काढलं जात आहे असा विश्वास दिला गेला. शेवटी तश्या अवस्थेतच त्या माणसाचा मृत्यू झाला. प्रत्यक्षातत्या कैद्याच्या शरीरातून फक्त एकच बाटली रक्त काढण्यात आल होत.नंतर त्याच्या नकळत त्याच रक्त घेण थांबवून दुसरच रंगीत पाणी पाईप मधून त्या कैद्यासमोर सोडलं जात होत. पण त्या कैद्याच्या मनात विचार येत होता, ‘हे माझं रक्त आहे आणि आता माझा मृत्यू अटल आहे……या सतत विचाराने त्याचा खरोखरच मृत्यू ओढवला.
आज मनुष्याच्या विचारांची गति वाढली आहे. पणत्याच बरोबर त्याचा स्तर खालावत चालला आहे. म्हणूनच मनोदैहिक (Psychosomatic ) रोग ही वाढत चालले आहेत. चिंता, भय, दुर्भावना, क्रोध, तणाव………अश्या विचाराने युक्त असलेले मन शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना ही रोगी बनवत आहे.
आपल्या प्रत्येक संकल्पांचा प्रभाव शरीर, संबंध, प्रकृती, वातावरण आणि संपूर्ण जीवनावर पडत आहे. एक शक्तिशाली विचार आपल्या जीवनाची दिशा तथा दशा बदलू शकतो. म्हणून आपण विचारांप्रति जागृत होणे गरजेचे आहे. मनुष्यांच्या मनामध्ये विचारांची शृंखला सतत बनत राहते पण ती कोणत्या दिशेला आपणास घेऊन जाते हे वारंवार तपासायला हवे.
ह्या विचारांना सकारात्मक व श्रेष्ठ बनवण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष्य देण्याची आवश्यकता आहे.
1. आपल्या संकल्पांना नकारात्मक बनवणारे साहित्य, व्यक्ति, दृश्य…… ह्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा कारण डोळे, कान, नाक, मुख……. ह्या कर्मेंद्रियाद्वारे जे ग्रहण केले जाते त्याचा परिणाम आपल्या नाजूक मनावर होत असतो. एकदा का आपण एखादी गोष्ट आपल्या मनात उतरवली तर त्याला बाहेर फेकणे कठीण होऊन जाते. मग ती घटना किती ही वर्षांपूर्वीची का न असो. जसे आजच्या युगात मनुष्य खूप Health conscious झाला आहे. काय खावे आणि किती प्रमाणात खावे ह्या बाबतीत खूप जागरूक आहे तसेच काय ऐकावे, पहावे, बोलावे ह्या विषयी ही सतर्क रहावे.
2. नकारात्मक बोल बोलणे टाळावे. आपल्याच बोलण्याचा प्रभाव आपल्या मनोस्थितीवर प्रकर्षाने होते. शांतपणे बोलण्याची सवय लावावी. क्रोधयुक्त, अहंकारयुक्त बोल काट्यासारखे टोचतात. ‘कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो’ हेस्लोगन लक्षात ठेवावे.
3. जेवताना TV बघणे टाळावे. अन्नाचा प्रभाव सरळ आपल्या मनावर होतो. म्हणून म्हटले जाते ‘जसे अन्न तसे मन’ अन्न ज्या विचारांमध्ये बनवले जाते त्याचा प्रभाव तर पडतोच म्हणूनच लहानपणी अन्न ग्रहण करायच्या आधी ईश्वराची आठवण करायला सांगायचे. अन्न शुद्ध करुन मग ते ग्रहण केले जायचे. पण समयानुसार सवयी बदलल्या. आता तान्ह्या बाळाला सुद्धा cartoon दाखवत अन्न भरवले जाते. ह्या सर्व चुकीच्या पद्धतींनी दिवसेंदिवस मनुष्याचे मन कमजोर होत चालले आहे.
4. मनाला शक्तिशाली बनवायचे असेल तर चांगले साहित्य वाचण्याची सवय लावावी. उत्साह वाढवणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या वाक्यांचा संग्रह करावा. जेव्हा कधी आपले मन उदास, दु:खी होईल तेव्हा त्या वाक्यांचा आधार घेऊन स्वतःला रोज प्रोत्साहित करावे.
5. आपल्या संपर्कामध्ये असलेल्या सर्व व्यक्तींबाबत शुभभावना ठेवावी. गुणग्राहक वृत्ती वाढवावी. हंसबुद्धी बनून जे चांगले आहे ते आत्मसात करावे ज्याने व्यर्थ व नकारात्मक विचारांचा नाश करू शकू.
‘मी माझ्या जीवनाचा शिल्पकार’ ह्यावाक्यामध्ये जीवनाची सारी रहस्य सामावली आहेत. सुंदरविचारांनी, सदभावनांनी आपण ह्या अमूल्य जीवनाला सुंदर बनवू शकतो. विचारांचे महत्व व त्यांचे होणारे परीणाम ह्यांची जागृती सतत ठेवली तर किती ही मोठे ध्येय आपण गाठू शकतो.
चला तर मग आपण ह्या मनाला सुंदर व श्रेष्ठ संकल्पांनी भरपूर करू या
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


