Skip to content

लग्न करणं हे शहाण्या माणसाचं काम नाही उरलं आता..

लग्न करणं हे शहाण्या माणसाचं काम नाही उरलं आता..


टीम आपलं मानसशास्त्र


साधनाने कधीच लग्न नाही करायचं असा निर्णय घेतला घरच्यांनी खूप समजावलं पण ती कोणाचही ऐकायला तयार नाही… आणि तिच्या या निर्णयामागे फक्त एक कारण नव्हतं तर अनेक कारणं होती.

तिच्या आई वडिलांचं सतत होणार भांडण ती लहानपणापासून बघत आलेली शिवाय ते इतके भांडायचे की त्यांना आपली मुलं लहान आहेत त्यांच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल याचं सुद्धा भान नसायचं..आणि भांडण करायला कारण सुद्धा अगदी लहान सहान .. शर्टच बटण तुटलं ते लावयच आई विसरली तर सुरू.. कधी बाबांनी सांगितलेल्या लिस्ट नुसार सामान आणलं नाही की पुन्हा सुरू.. एकमेकांच्या घरचे म्हणजेच सासू सासरे काय बोलले काही वेगळं वागले की तेथून आल्यावर यांचे वाद सुरू की ते असच का बोलले तसच का वागले…

साधनाची मैत्रीण तिने प्रेमविवाह केला आधी एकमेकांना खूप जीव लावणारे दोघं लग्नाचे काही महिने होत नाही तर एकमेकांवर संशय घ्यायला मोकळे झाले..जिथे आधी मित्र मैत्रिणी बोलले,भेटले ते चालत होत तिथे आज तू याच्याशी नाही बोलायचं.. तू तिच्याशी नाही बोलायचं असे एकमेकांना बंधन घालत नात्यातील विश्वास कमी झाला आणि ते एकमेकांना पूर्वीसारखे जीव लावत नाहीत.. नात आहे म्हणून पुढे दिवस ढकलायचे असा त्यांचा संसार…

आई वडिलांचं तर प्रेम विवाह नव्हत तरी ते एकमेकांशी सतत भांडतात आणि मैत्रिणीच प्रेम विवाह झालंय तरी ते सुद्धा असे वागतात. अशा एक ना अनेक कारणांमुळे साधना च लग्नाच्या बाबतीत असलेलं मत पूर्णपणे नकारार्थी झालं.

साधना असो किंवा अजून कोणी… बहुतेक सर्वांनाच लग्न म्हंटल की टेन्शन येते.. काहीना भीती असते ती जबाबदारी ची.. तर काहींना भविष्याची की आजपर्यंत मला सर्व सांभाळता आल पुढे सुद्धां जमेल की नाही… सासू सुनेचे वाद.. नणंद वहिनी यांच्यातील वाद.. जावांमधील वाद.. तर नवरा बायको या नात्यातील वाद, अविश्वास, संशय यासारख्या आजूबाजूला घडणाऱ्या रोजच्या उदाहरणांना बघून काही जण लग्न न करण्याचं निर्णय घेतात.

खरं तर येणाऱ्या प्रत्येक अडचणींना तोंड देण्याची तयारी असेल तर आपल्याला कसलीच भीती किंवा कसलीच चिंता राहणार नाही. पण आपण आपल्या दृष्टीआड असणाऱ्या किंवा ज्या अडचणी, जे प्रश्न येतील की नाही याची शाश्वती नसताना सुद्धा आधीच त्यांना घाबरतो.

जे दुसऱ्याच्या बाबतीत घडतं आहे तेच आपल्या बाबतीत सुद्धा घडेल की काय.. हा आपला सर्वात मोठा भ्रम आहे. प्रत्येकाचं आयुष्य, प्रत्येकाच्या जवळची माणसं, प्रत्येकाचे स्वभाव..वागणं बोलणं.. विचार करण्याची पद्धत ही नेहमी सारखीच असेल का??? नाहीना.. तरीसुद्धा आपण का घाबरतो.

जे त्याला आज हे प्रश्न पडलेत मलासुद्धा असेच प्रश्न पडतील या भितीपेक्षा माझ्या समोर जे असे प्रश्न निर्माण झाले तर त्यावेळी मी काय करू शकतो याचा विचार केला तर भीती राहणार नाही. लग्न हे असं नात आहे जे टिकवायचं कसं हे ज्याच्या त्याच्या वागण्यावर अवलंबून असते.

मी लग्नच करणार नाही असे ठरवण्यापेक्षा मी लग्न करेन. आमचं दोघांचं नातं छान जपेल. संकट कोणत्या नात्यात नसतात मग तेव्हा मी माघार घेत नाही मग या नात्यात सुद्धा येणाऱ्या संकटांना, अडचणींना आपण सामोरे जायचं हे जर ठरवल तर नक्कीच मनातील भीती दूर होईल.

आणि समजा लग्न केलं नाही किंवा या नकारार्थी विचारांमुळे ते झालंच नाही तर सुरुवातीचा काळ तुम्हाला सुखावेल, परंतु नंतर जे सोशल प्रेशर येईल त्याला तुम्ही सामोरे जायची सुद्धा तयारी ठेवायला हवी. तसेच शारीरिक-मानसिक गरजा याचं सुद्धा नियोजन तुम्हाला करता यायला हवं.

म्हणजे पुढील अडथळे येऊ नयेत, म्हणून आता तुम्ही जे टाळत आहात ते टाळून येणारी आव्हाने सुद्धा तुम्हांला पेलता यायला हवीत. नंतर पच्छाताप होण्यापेक्षा सामाजिक नियमानुसार त्या-त्या वेळी ती-ती कामं होणं सुद्धा जरुरीचे आहे.

मुळात आपल्या सगळ्यांचा लग्न या संकल्पनेला विरोध नसतो तर लग्नानंतर निर्माण होणारी नाती-गोती, जबाबदाऱ्या, हेवेदावे याचा आपल्याला अवतीभवती पाहून-ऐकून तिटकारा आलेला असतो. परंतु आताही लग्नाआधी आपले सगळ्यांशी असणारे संबंध काही सलोख्याचे नसतातच. म्हणून लग्न म्हणजे आयुष्य पालटून टाकणारी संस्था हि चुकीची अनैसर्गिक बाब आपण बाळगून असतो.

आपल्याला या सगळ्यांशी वेल अड्जस्ट करून स्वतःच मानसिक स्वास्थ्य जपायचं आहे, ही गाठ एकदा मनाशी पक्की बांधली तर काहीसे नकारार्थी विचार कमी झालेलं आढळतील.

नाहीतर लग्न टाळून एक वेगळं आयुष्य जगायचंच असेल तर तेथेही पुढील येणाऱ्या आव्हानांसाठी तयार असायला हवं.



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “लग्न करणं हे शहाण्या माणसाचं काम नाही उरलं आता..”

  1. वैयक्तिक जर सांगायचे झाले तर हे खरच आहे की कुणासोबत आपले आयुष्य शेअर करायचे म्हंजे कुठेतरी आपल्या पायात धोंडा अडकवून ठेवणे होय.माझे मत हे आहे की मे वयाची ३६ वर्षे संपवली आणखी फार फार तर ५० शी पर्यंत जाईल.तर लग्न ना करता आपण विरक्त होऊन आयुष्य जगावं असे माझे मत आहे.कारण की एकदा का तुमच्या आयुष्याची दिशा बदलली की सगळं आयुष्य बदलते हे मी सकारात्मक बोलत आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!