आपल्या हास्याने जग बदला पण जगामुळे आपलं हास्य बदलू नका.
मेराज बागवान
‘हास्याने आयुष्य वाढते’.आपण सगळेच हे वाक्य कधी ना कधी म्हणतो.पण प्रत्येक वेळी अंमलबजावणी करतो का ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. समस्या तर आयुष्यभर असतात.पण अनेकजण समस्या आल्या की चेहऱ्यावरील हास्य च लुप्त करून टाकतात.आणि समस्येचे लाड पुरवत बसतात.तुम्ही म्हणाल , हे लिहायला आणि वाचायला खूप छान वाटतंय, पण ‘ज्याचं जळतं त्यालाच कळतं’.पण थोडा शांतपणे विचार केला तर समजेल की , ‘हसायला पैसे नाही पडत, पण हास्य खूप मौल्यवान गोष्ट आहे’. म्हणूनच, आपल्या हास्याने जग बदला पण जगामुळे आपलं हास्य बदलू नका.
तुम्ही जर निरीक्षण करीत असाल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की, हसतमुख व्यक्ती, नेहमी हसणारी व्यक्ती जगातील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा सुंदर व्यक्ती असते, जीची तुलना कशाशीच आणि कोणाशीच होऊ शकत नाही.चेहऱ्यावर सुंदर असे हास्य असणारी व्यक्ती स्वतःचे आयुष्य तर फुलवत असतेच पण तिच्या आजूबाजूचे जग देखील सकारात्मक बनवत असते. हास्यात एक ऊर्जा असते, जी प्रत्येकाला एक नवीन चेतना देत असते. ताण हलका करते.डोके शांत करते आणि मन प्रफुल्लित , ताजेतवाने करते.म्हणूनच आपल्या हास्याने जग बदला. आपल्या एका सध्या हास्याने एवढ्या गोष्ट जर का साध्य होत असतील तर मग आपण का हसायचे नाही?
जगात अनेक वाईट, नकारात्मक गोष्ट घडतात.कधी त्या आपल्या वैयक्तिक असतात तर कधी सार्वजनिक.आणि त्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतो.पण अनेकदा बाहेर घडणाऱ्या गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावरील हास्य अनेकदा गायब होत्या. त्या सार्वजनिक गोष्टी आपल्या हातात नसतात, कधी कधी नियंत्रणात देखील नसतात.पण तरी देखील आपण त्याच त्याच गोष्टींचा विचार करून आपले हसू गमावून बसतो आणि मग परिस्थितीला दोष देत बसतो.पण त्या सगळ्या जगातील गोष्टी कायम नसतात.पण त्या तात्पुरत्या गोष्टींसाठी आपण आपले हासू कायमचे हरवून टाकतो.जेव्हा की , हास्य ती तर कायमस्वरूपी असणारी गोष्ट आहे.म्हणूनच जगामुळे आपलं हास्य बदलू नका.
आयुष्य नेहमी आपली परीक्षा घेत असते. मग आपण त्यावेळी अनेकदा देवाला, नियतीला आणि नशिबाला दोष देत बसतो.पण त्या विधात्याने , त्या निसर्गाने ‘हास्य’ ही एक अशी देणगी दिली आहे ती कायम आपली मदत करीत असते, अडचणींना सामोरे जाण्यासाठी बळ देत असते.पण आपण मात्र त्या जगामुळे आपले हास्य गमावतो.ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणारच.त्यावर अतिविचार करून काहीच उपयोग नसतो.आपण आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट कशी घेतो याने मात्र नक्कीच फरक पडतो.
त्यामुळे कायम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.ती म्हणजे , ‘काहीही झाले तरी मी माझ्या चेहऱ्यावरील हास्य कधीच हरवू देणार नाही’.कारण हास्य ही अशी गोष्ट आहे जी आपल्यापासून कधीच दूर जात नाही.अंतिम क्षणापर्यंत ती कायम साथ देते.मग अशा कायम साथ देणाऱ्या गोष्टीची आपण का साथ सोडायची? माणसे, गोष्टी कधीच कायम नसतात आपल्या आयुष्यात.प्रत्येकाबरोबर आपला प्रवास कोणत्यातरी वाळणावरती येऊन थांबतोच.मग पुन्हा नवीन माणसे, नवीन प्रवास…असे चक्र चालूच असते. ह्याला तुम्ही मी बदलू शकत नाही.त्यामुळे जे आहे ते हसत हसत स्वीकारणे गरजेचे असते.
तुम्ही म्हणाल,फक्त हसण्याने कसे काय सर्व काही ठीक होईल? आज जगात अशी अनेक माणसे आहेत, जी मोठमोठया संकटात,अडचणीत आहेत.क्षणोक्षणी त्यांना अनेक गोष्ट त्याग कराव्या लागत आहेत. पण तरी देखील त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य किंचित देखील कमी होत नाही.उलट ही माणसे आपली दुःखे बाजूला ठेवून इतरांच्या मदतीला स्वतःहून पुढे जात असतात. त्यांचे आयुष्य मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत असतात. कुठून येते त्यांना ही ऊर्जा? प्रत्येकजण असा वागू शकतो, फक्त गरज आहे ती विचार करण्याची आणि अंमलबजावणी करण्याची.
समाजाचा एक भाग म्हणून, कोणाच्या डोळ्यात आपल्यामुळे अश्रू असण्यापेक्षा चेहऱ्यावर हास्य असणे केव्हाही चांगले.हास्य असणारी व्यक्ती समाजात उठून दिसते.ती नसेल तेवढी यशस्वी पण तिच्या केवळ हास्याने देखील अनेकजण यशस्वी होऊ शकतात.एवढी ताकद त्या हास्यात असते.आयुष्यात कितीही ताण असो, त्या ताणामुळे आपले हसू बिघडले नाही पाहिजे. कोणालाच, कोणत्याच गोष्टीला तुमचे हासू हिरावण्याचा अधिकार विधात्याने दिलेला नाही, अगदी तुम्हाला स्वतःला देखील नाही.
म्हणूनच ‘हास्य’ मी नैसर्गिक पण तितकीच अनमोल गोष्ट नेहमी आयुष्यात बाळगून ठेवा. मग खूप साऱ्या गोष्टी हळू हळू बदलू लागतील.ज्यामुळे तुमचे आणि इतरांचे देखील आयुष्य मार्गी लागेल.
‘सो….स्माईल प्लिज…..’
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
खूप छान अप्रतीम …🙏🙏