मनाने एकट्या पडलेल्या स्त्रियांनी अस्वस्थ वाटत असल्यास काय करावे ?
हर्षदा पिंपळे
कळ्या कोमेजतात कधी कधी,बहुधा फुलणं त्या विसरत असाव्यात….!
कधी कधी स्त्रिया मनाने एकट्या पडतात. आणि त्यांच्या या एकटेपणामागे वेगवेगळ्या प्रकारची कारणं असतात. प्रत्येक स्त्रिच्या मनाचा एकटेपणा हा वेगवेगळा असतो.कारण प्रत्येक स्त्री ही वेगवेगळी असते.काही स्त्रियांची घालमेल दिसून येते तर काही स्त्रियांची घालमेल कधीच दिसून येत नाही. मनातला एकटेपणा कित्येकदा तिच्या चेहऱ्यावर दिसून येतच नाही.मनात आसू नी ओठांवर हासु अशी ही स्त्री ओळखणं जरा कठीणच जातं.
तो मनाचा विचीत्र असा एकटेपणा किती त्रास देत असेल त्यांच्या मनाला खरच सांगता येत नाही. कुणाचा नवरा वाईट असतो तर कुणाचा नवरा कायमचा सोडून गेलेला असतो. कुणाला घरातील सगळं करूनही त्रास सहन करायला लागतो.कुणाला मानसिक तर कुणाला शारीरिक छळ सहन करावा लागतो.
कधी कधी मनातील साचलेल दुःख कुणाला सांगता येत नाही. मित्र-मैत्रीणी असतील तरीही घरची उणीधुणी घरीच ठेवावी या विचाराने कुणासमोर या स्त्रिया व्यक्तच होत नाही.कामाच्या ठिकाणी होणारा त्रास तर सहसा बोलावासाच वाटत नाही. नोकरी जाऊन आर्थिक चणचण भासू शकते हा विचार सतत खात राहतो.कधी कधी आलेलं आजारपण आणि विचारांची वाढती घालमेल यांमुळे स्त्री कधी कधी एकटी पडते.तिच्या मनाची अस्वस्थता हळुहळू वाढायला लागते.काय करावं हे स्त्रियांना कळत नाही. किंवा अनेकदा मार्ग दिसत असूनही स्त्रिया सहन करायला प्राधान्य देतात.
पण खरं तर अस्वस्थ वाटत असेल तर स्त्रियांनी काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. कारण कायम अस्वस्थ राहण्यात काहीच तथ्य नाही. स्त्री हसत असेल तर सगळं घर कसं हसतं-खेळतं राहतं.पण हीच स्त्री जर अस्वस्थ असेल तर घरही सुन्या मैफीलीसारखच भासतं.
तर मनाने एकटं पडलेल्या स्त्रियांनी अस्वस्थ वाटत असल्यास
साधारणपणे काही गोष्टी कराव्यात—–उदाहरणार्थ
♦ कटू आठवणी विसरणे -ज्या गोष्टींमुळे एकटेपणा जाणवतोय, मन अस्वस्थ होतय त्या गोष्टी हळुहळू विसरायचा प्रयत्न करणे.कारण जोपर्यंत आपण कडू आठवणी विसरत नाहीत तोपर्यंत आपलं मन चलबिचल होतच राहतं.म्हणूनच काही गोष्टी विसरायला शिका.
♦ काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणे.रोज तेचतेच करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला प्राधान्य द्या. हवं तर रोजची एखादी गोष्ट स्किप करा.पण काहीतरी नवीन-वेगळं करायला विसरू नका.आणि नवीन गोष्टी करताना कोणताही संकोच मनात बाळगू नका.
♦ जे आवडतय त्यासाठी वेळ द्या. आवडणारी गोष्ट करण्यासाठी आधी प्राधान्य द्या. कारण आवडीच्या गोष्टी केल्या तर मनाला समाधान मिळतं.मन शांत होतं.
♦ मोकळेपणाने संवाद साधायला हवा. ज्या व्यक्तीला मनातील घालमेल सांगावीशी वाटते त्या व्यक्तीला ते सांगायला संकोच करू नका.कारण नेहमीच संकोच केला तर मनातील गोष्टी मनातच दडून राहतील.
♦ आणि एखादा पुरूषाषी/मित्राशी बोलावसं वाटत असेल तर जरूर बोलायला हवं.कारण सगळेच पुरुष/मुलं हे वाईट नसतात. समजून घेणारे कितीतरी पुरुष आहेत. त्यांच्याशी बोला.व्यक्त व्हा. मोकळे व्हा.
♦ दगदग कधीच संपत नसते.म्हणून अशावेळी तरी स्त्रियांनी पुरेशी विश्रांती घ्यायला हवी. थकलेल्या मनाला शांत करायच असेल तर आधी शरीराला विश्रांती देणं गरजेचं आहे.
♦ हलका आणि पोषक आहार-अनेकदा खाण्याकडे दुर्लक्ष केलं जातं.योग्य आहाराचाही आपल्या मनावर परिणाम होत असतो म्हणूनच अशावेळी योग्य आहारही स्त्रियांना घेणं आवश्यक आहे.
♦ नियमित व्यायाम, योगा करा.व्यायाम आणि मेडिटेशन सारखा दुसरा चांगला पर्याय असूच शकत नाही. दिवसभराची सगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास व्यायाम आणि मेडिटेशन खूप सहाय्यक ठरते.
♦ आवडीचे छंद जोपासा.शिवणकाम,विणकाम यांसारख्या कामात स्वतःला गुंतवून ठेवा.
♦ नियमित चालायला जा.
♦ आवडीची छान गाणी ऐका.
♦ हल्ली सिरिअल्समध्ये कितीतरी निरर्थक गोष्टी दाखवल्या जातात. त्यामुळे काहीही उगाचच निरर्थक आणि मनाला घाबरघुबरं करणारा कोणताही कार्यक्रम पाहू नये.ज्याने मनाला शांतता मिळेल,प्रसन्नता वाटेल अशाच गोष्टी पहाव्यात.
♦ अतिविचार-चिंता करणे सोडून द्यावे. कारण यामुळेच मन जास्त अस्वस्थ होतं.
♦ निसर्गाशी हितगूज करा.निसर्गातील पाना-फुलांशी संवाद साधा.फुलांच्या सुगंधाने मनाची अस्वस्थता दूर होण्यास मदत होते.
♦ सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला विसरू नका.
♦ “आपण एकट्या नाहीत” ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.
कोमेजलेल्या कळ्यांंनी बाग कधीच सुंदर दिसत नाही. कळ्या फुलल्या की बागही सुंदर दिसते….म्हणून स्त्रियांनो नेहमी हसत रहा.तुमच्यामुळे घरही ताजंतवानं राहील.
Very nice
Chan lekh aahe. Guidance chan kele aahe
It’s really nice
Very very nice
Good guidance
chhan ahe lekh..mst..thank u..
Nice