कोणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करूया..!!
हर्षदा पिंपळे
“अहो,अहो,अहो ऐकलत का….???? अहोssss…त्या मालतीने बघा डबलडोअरचा फ्रीज घेतलाय.उद्या काय तर ते ओव्हन का बिव्हन आणणार आहेत.मला एक कळत नाही इतका खर्च करायची काय गरज होती. म्हणजे त्यांच्याकडे तर दोन महिन्यापूर्वीच सिंगल डोअर फ्रीज आला होता.
मग आता काय जागा पुरत नाही की काय….म्हणून डबल डोअर फ्रीज आणलाय कोण जाणे… ते सगळं जाऊद्या, इतके पैसे आले कुठून….??? नवरा तर मेला जाम उधळपट्टी करतो.कमवतो तर कमवतो वर सगळं जुगारावर घालवतो. मग मला सांगा हीने फ्रीज आणलाच कसा…??? आणि तुम्ही…. तुम्हाला बोलले साधा एक कुलर घ्या.तर तोही तुम्ही घेत नाही.ती मालती सतत काहीतरी घेत असते.आणि मला टोमणे मारत असते.मला तर वैताग आलाय तीचा.”
“ती डॉक्टर झाली, तीने दोन पुस्तकही प्रकाशित केली.घर घेतलय,गाडीही घेईल काही दिवसांनी.खूप पैसे आहेत यांच्याकडे.यांनी सगळ घेतलं तर आम्ही काय घ्यायच…?”
वगैरे वगैरे…. अशी अनेक उदाहरणं आपण आपल्या रोजच्या जीवनात पाहत असतो.हे खरं आहे की, हे जग स्पर्धेच आहे.जगात स्पर्धा दिवसागणिक वाढतच आहे.अगदी राहणीमानापासून ते करिअर ,मान-सन्मान या सगळ्या गोष्टींमध्ये केवळ स्पर्धा दिसून येते. सगळे एखाद्या रेसमध्ये धावताएत असं चित्र आज पहायला मिळतय.आता स्पर्धा म्हंटल तर हार-जीत येतेच.
आपण किती पाण्यात आहोत हे आपल्याला समजतं.पण इतकच नाही. या स्पर्धेच्या जगात आपण इतके भरडत चाललोय की पुढे जाणाऱ्याचा आपण द्वेष करायला लागलोय.तो माझ्यापुढे जाऊच कसा शकतो…? ती ते कसं करू शकते..? त्याने हे केलच कसं…ते केलच कसं…?? वगैरे वगैरे हल्ली सर्रासपणे ऐकायला मिळतं.
कोणीतरी आपल्या पुढे जातय हे कित्येकांच्या डोळ्यांना पाहवतच नाही.आता आपण जर स्वतः मागे राहिलो तर त्यात दुसऱ्या व्यक्तीचा काय दोष…?आपल्या पुढे जाणाऱ्या व्यक्तीचा द्वेष करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे…? आणि सतत कुणीतरी आपल्या पुढे जातय,प्रगती करतय हे पाहून आपल्या मनात द्वेषाची भावना कुठून येते…? आपली प्रगती होत नाही तर त्याला कारण पुढे जाणारी लोकं…?
खरतरं, असा विचार करणाऱ्यांच्या बुद्धीला गंज चढला असावा असं वाटतं.खरतरं आपण मागे राहतो ते या अशा विचारांमुळे. आणि जेव्हा आपण असे नको ते विचार करत असतो तेव्हाच ती प्रगती करणारी माणसं प्रगतीसाठी धडपड करत असतात. आणि म्हणून ती पुढे जातात.प्रगती करणारी माणसं इतर लोकं पुढे जाताएत म्हणून कधीच त्यांचा द्वेष करत बसत नाही.याऊलट ती लोकं स्वतःच कुठे चुकतय,काय कमी पडतय याकडे लक्ष देतात.आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणत्या दिशेने जायला हवं याचा विचार करतात. विचारांना कृतीची जोड देतात.
मग आपणही असं का करू शकत नाही…..?आपणही स्वतःशी स्पर्धा का करू शकत नाही….?इतरांबरोबर स्पर्धा करून काय होणार आहे…?या गोष्टीचा जरा बारकाईने विचार करून पहा.आपलं काय चुकत आहे याची जाणीव होईल. आपण मागे का आहोत हेही समजेल.आणि पुढे काय करायला हवय हेसुद्धा नक्कीच समजेल.कदाचित तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल.
मित्रांनो, आयुष्यात पुढे जायच असेल , काहीतरी चांगल करायच असेल तर हे असे लोकांबद्दल चुकीच विचार करून चालत नाही. इतरांना सतत दोष देऊन, इतरांचा द्वेष करून आपली प्रगती कधीच होत नाही.आपण आपला वेळ अशा ठिकाणी घालवतो.तोच वेळ जर स्वतःच्या प्रगतीसाठी वापरला तर काही बिघडेल का…?अजिबात नाही. काहीही बिघडणार नाही.आपला वेळ आपल्या प्रगतीसाठी द्यायचा की इतरांच्या प्रगतीवर द्वेषाचे रंग उडवण्यावर घालवायचा हे प्रत्येकाला कळायला हवं.आवाजाची ,द्वेषाची उंची वाढवण्याऐवजी विचारांची , कृतीची उंची वाढवण्यावर भर दिला पाहिजे. तरच आपण पुढे जाण्यात यशस्वी होऊ शकतो. आपण आपली प्रगती करू शकतो.
विचार बदला,दृष्टिकोन बदला.झाडाला एक ना एक दिवस फळं नक्की लागतील. खरचं कोणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करूया..आणि प्रगतीच्या दिशेने चार पावलं उचलूया.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
खरंच खूप अप्रतिम असा लेख आहे हा