Skip to content

स्वतःला कमी लेखणाऱ्या लोकांचा टक्का वाढत चाललाय !

स्वतःला कमी लेखणाऱ्या लोकांचा टक्का वाढत चाललाय !


कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे


स्वतःला कमी लेखणाऱ्या लोकांचा टक्का वाढत चाललाय !/? खरतरं या वाक्यापुढे प्रश्नचिन्ह द्यावं की उद्गारवाचक चिन्ह द्यावं हेच कळत नाही. कदाचित यासाठीच दोन्ही बाजू समजून घेणं आवश्यक आहे. कारण आजची जीवनशैली , आजच आयुष्य पाहता एकमेकांमध्ये स्पर्धा खूप वाढत चालली आहे.आयुष्य म्हणजे जणू एक शर्यत…! असच काहीसं चित्र पहायला मिळतय.आणि या शर्यतीत धावणाऱ्या घोड्यासारखी आपली अवस्था झाली आहे.

जीवाच्या आकांताने जितकं धावता येईल तितकं आपण धावतोय.पण यामध्ये मला धावताच येत नाही असं म्हणणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. स्वतःला ‘explore’ करणाऱ्यांची संख्या जितकी वाढली आहे तितकीच स्वतःला कमी लेखणाऱ्यांची संख्याही हल्ली वाढताना दिसते.मला वाटतं , याच एक कारण स्पर्धा नक्कीच असु शकतं.कारण वाढत्या स्पर्धेपुढे आपण कुठेतरी कमी पडतोय असं कित्येकांना वाटतय.

आपल्यात काहीतरी कमी आहे. समोरच्या व्यक्तीकडे सगळ्या गोष्टी आहेत. माझ्याकडे मात्र यातील अर्ध सुद्धा नाही. असा विचार करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते.मला हे येत नाही , जमत नाही ,जमणारही नाही. असं म्हणताना ही लोकं कचरत नाहीत का..?इतकं का स्वतःला कमी लेखायच..??म्हणजे ही स्पर्धा इतकी जीवघेणी आहे का..??

खरचं ही स्पर्धा म्हणजे एकमेकांशी असलेली जीवघेणी स्पर्धा वाटते.मी त्याला कसं मागे टाकेन आणि मी कसं पुढे जाईल असा विचार या स्पर्धेमध्ये दिसून येतो. स्वतःशी स्पर्धा करणं यांनी कदाचित सोडलं असावं…म्हणून प्रतिस्पर्ध्याला इथे जास्त महत्त्व दिलं जातय आणि या होणाऱ्या ओढाताणीमध्ये स्वतःला मात्र कमी लेखलं जातय.

कधी कधी कळतच नाही की यामागे केवळ स्पर्धा आहे की आणखी काही…??गोंधळ उडतोच या सगळ्याचा विचार करताना…पण..स्पर्धा हे कारण असलं तरी हे एकमेव कारण मुळीच नाही. यामागे स्पर्धेसारखीच विविध अशी कारणं आहेत.ज्यामुळे लोकं स्वतःला कमी लेखत आहेत. स्पर्धा वाढली त्यामुळे ‘comparison’ वाढली. ती जास्त सरस आहे , ती जास्त परफेक्ट करू शकते , ती परफेक्ट आहे. माझ्या गोष्टींच तसं काहीच नाही , कशातच काही नाही.

असं म्हणून स्वतःच स्वतःची तुलना इतरांबरोबर करण्याच प्रमाण वाढत आहे. इतकच नाही तर ‘दुसऱ्यांना कमी लेखणे’ या प्रकारामुळे तर कित्येकांच्या मनात एक वेगळाच न्युनगंड निर्माण होतो की खरच आपल्यात नक्कीच काहीतरी कमी आहे.आणि याच न्युनगंडामुळे आधीच असणारा आत्मविश्वासही डळमळीत होऊ लागतो.आणि आपण खरच कुठेतरी कमी पडल्याची जाणीव त्यांना होत असते.

म्हणजे असा हा तुलनात्मक दृष्टिकोन कुठेतरी या परिस्थितीला जबाबदार आहे असं मला वाटतं. माझं कुठे चुकतय किंवा मी कुठे कमी पडतोय याऐवजी त्याचं किती..? , कुठे..? ,कसं…? चुक आणि बरोबर आहे हे पाहण्यावरच जास्त लक्ष केंद्रित करणाचा जणू लोकांना छंदच जडलाय की काय असं क्षणभर तरी मनाला वाटून जातं.अगदी छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत हल्ली ही गोष्ट निदर्शनास येतेय.छोट्यांच्या बाबतीत बोलायच झालं तर विशेषतः गुणांवरून ते स्वतःची पारख करून स्वतःला कमी जास्त च्या तराजूत बसवत आहेत.

तिला जास्त गुण मिळाले , मला ‘कमी’ मिळाले…या भावनेने ही लहानगी मुलसुद्धा अगदी टोकाची पावलं उचलताना दिसतात.(कुठेतरी काही अंशी पालकसुद्धा याला जबाबदार असतात…काही पालकांनाही तुलना करताना पाहून खरच खूप वाईट वाटतं.कारण , समोरच्यांचा मुलगा इतका हुशार , इतका स्मार्ट …आणि आमचं मात्र कशातच काही नाही… असं सर्रासपणे बोलणारे पालक तुम्हीही बघितले असतील.

पण पालकच अशावेळी तुलनात्मक विचार करतात तेव्हा मुलांनाही वाटतं की ते खरच कुठेतरी कमी पडत आहेत. अशावेळी नकारात्मक परिणामच जास्त होतो…) गरिब-श्रीमंत हा भेदभाव आजपर्यंत कुणाला चुकला नाही….?? कधी वाटतं इथेच तर सगळा घोळ आहे. जो पैशाने श्रीमंत तो श्रेष्ठ असा चुकीचा समज…..काही अंशी त्या गोरगरिबांना कमी लेखण्यास भाग पाडतो.त्यांना असच वाटतं आपण खूप कमी आहोत यांच्यापेक्षा.. ही खूप मोठी लोकं आहेत. वगैरे वगैरे…

पण मग या सगळ्यात ती लोकं स्वतःतील काही सुप्त गुण मात्र विसरून जातात. थोडक्यात काय तर…वाढती स्पर्धा , तुलनात्मक दृष्टिकोन , दुसऱ्यांनी कमी लेखने आणि त्यातूनच नवा न्युनगंड निर्माण होणे , जो पैशाने श्रीमंत तो श्रेष्ठ असा चुकीचा समज…यासारख्या अनेक गोष्टी या परिस्थितीला जबाबदार आहेत. यामुळेच लोकं स्वतःला कमी लेखण्याचा टक्का दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

आणि या परिस्थितीला बदलण केवळ आपल्याला शक्य आहे. आणि आपण ते बदलायला हवं.दुसऱ्यांना कमी न लेखता तु हे छान करतोस असं म्हणून प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. स्वतःशी स्पर्धा करणं माणसाला जमायला हवं. कालपेक्षा आज मी अजून काहीतरी चांगल करण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास स्वतःच स्वतःमध्ये रुजवला तर…. स्वतःला कमी लेखणाऱ्यांची संख्या निश्चितच कमी होईल….!

 


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!